उगवतीचे रंग शब्दांच्या पाऊलखुणांतून देश जोडणारा तपस्वी माझं लहानपण एका खेड्यात गेलं. माझी आई फार शिकलेली नव्हती पण तिला लिहिता वाचता येत होतं. त्या जोरावर ती वाचायला शिकली. अनेक पुस्तके तिने वाचली. ती बहुश्रुत होती. बोलताना तिच्या तोंडातून सहज बोलीभाषेतील अर्थपूर्ण म्हणी आणि वाक्प्रचार बाहेर पडत. सुरुवातीला त्या म्हणींचा किंवा वाक्प्रचारांचा सखोल अर्थ कळण्याइतके माझे वय नव्हते. पण जसजशी समज वाढू लागली, तसतसा त्यांचा अर्थ कळू लागला. पानातली चटणी कशी चटकदार असते तशाच या छोट्याशा अर्थपूर्ण म्हणी. खेडेगावातील लोकही विशेष करून बायका अशा म्हणी वापरत. त्या सहजच कानावर पडत. त्यामुळे नाही म्हटलं तरी भाषिक जाण समृद्ध व्हायला मदत झाली. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे अशाच एका अवलियाची जन्मशताब्दी या वर्षी आहे. कोण बरं हा अवलिया ? तर त्याचं नाव आहे विश्वनाथ दिनकर नरवणे. संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी भारतीय कहावत कोष आणि भारतीय व्यवहार कोष तयार केला. तोही सोळा भाषांमध्ये. ज्या काळात संगणक, इंटरनेट यासारख्या गोष्टी आजच्यासारख्या उपलब्ध नव्हत्या त्या काळातील त्यांचे हे कार्य एखाद्या दीपस्तंभाप्रमाण...