उगवतीचे रंग खरोखरच आपण सुखी आहोत का ? खरोखरच आपण सुखी आहोत का असा प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारतो, तेव्हा खरं तर आपण त्याबद्दल साशंक असतो. मानवी जीवनात सुख आणि दुःख यांचा पाठशिवणीचा खेळ सुरूच असतो. कधी कधी तर एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशीही परिस्थिती असते. पण परिस्थिती कशीही असली तरी आनंदी राहणे, समाधानी राहणे आपल्याच हातात असते. सुख आणि दुःख हे बाहेरील घटनांवर जरी अवलंबून असले तरी सुख आणि दुःख या आपल्या मनाच्या अवस्था आहेत. सुख आणि दुःख या गोष्टी सापेक्ष आहेत. एका व्यक्तीला ज्या परिस्थितीत सुख वाटेल, त्यात दुसऱ्याला वाटेलच असे नाही. उदाहरण सांगायचं झालं तर मला प्रवास आवडतो, गाणी ऐकायला आवडतात. पण सगळ्यांना या गोष्टी आवडतीलच असे नाही. पण आपण सुखी आहोत का यापेक्षा आपण समाधानी आहोत का असा प्रश्न खरं तर आपण स्वतःला विचारायला हवा. कारण आपल्या सुखाच्या कल्पना याच बहुधा आपल्याला त्रासदायक ठरतात. सुखाचा पाठलाग कधीच संपत नाही. पण समाधान मात्र कोणत्याही परिस्थितीत मिळू शकते. आज सायकल ही माझी गरज आहे. ती मिळाली की मी आनंदी होईन असे मला वाटते. मला सायकल मि...