उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७९
मना पावना भावना राघवाची ।
धरी अंतरी सोडी चिंता भवाची ।
भवाची जिवा मानवा भूलि ठेली ।
नसे वस्तूची धारणा वेर्थ गेली ।
अर्थ
हे मना श्रीरामांचे स्मरण पवित्र करणारे आहे. त्यांचे स्मरण कायम आपल्या अंतरात म्हणजे म्हणजे मनामध्ये ठेव. संसाराची चिंता सोडून दे. या संसाररूपी मायेची भूल मानवाला पडते. जी गोष्ट अस्तित्वातच नाही, अशा गोष्टीची कास धरणे व्यर्थ आहे.
( पावना - पवित्र, भावना- विश्वास/स्मरण, धरी - धारण कर, भवाची - संसाराची, भूलि - भ्रम, वेर्थ - व्यर्थ )
आधीच्या श्लोकात आपल्याला समर्थांनी देह, संसाराची व्यर्थ चिंता वाहू नका असे सांगितले. या श्लोकात ते आपल्याला हा संसार कसा नश्वर आहे ते सांगत आहेत. आपल्या मनामध्ये नेहमीच या संसाराबद्दल एक आंतरिक ओढ किंवा ममत्व असते. शिक्षण, नोकरी, विवाह, मुलेबाळे, पैसा, जमीनजुमला यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे असे आपल्याला वाटते. माणूस आयुष्यभर त्यासाठी धडपडत राहतो. परंतु या संसाराची व्यर्थता त्याला शेवटी लक्षात येते. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते.
राघवाचे स्मरण, त्याच्यावरील दृढ श्रद्धा मनाला पवित्र करणारी आहे. कारण तो पतितांना पावन करणारा आहे. आपल्या अंतरात अनेक बऱ्या वाईट भावना, वासना ठाण मांडून असतात. परंतु भगवंताच्या नामाने वासना शुद्ध होत जाते. म्हणूनच समर्थ म्हणतात की हे मना पवित्र करणाऱ्या राघवाची श्रद्धा अंतर्यामी बाळग. त्यासाठी ' धरी अंतरी ' हे शब्द समर्थांनी वापरले आहेत. अंतर्यामी काय धारण करायचे ? तर राघवाचा विश्वास. आणि काय सोडायचे ? तर ' चिंता भवाची ' आपण संसारात असताना एवढे त्यात गुंतलेले असतो, की पुढे माझे कसे होईल, म्हातारपणी मुले मला विचारतील ना ? एक ना दोन अशा अनंत चिंता मन करीत राहते. संसाराची व्यर्थ चिंता करून उपयोग नाही. म्हणूनच ही चिंता टाकून द्यावी असे समर्थ सांगतात.
ही चिंता का टाकून द्यायची ? कारण जी गोष्ट मुळात नाहीच आहे, तिच्याबद्दल चिंता करून काय उपयोग ? मोहमायेमुळे हा संसार आपल्याला खरा वाटतो. त्याची भूल आपल्याला पडते. पण खऱ्या सत्यापासून आपण लांब जातो. वाळवंटातील तहानलेल्या माणसाला मृगजळ दृष्टीस पडते. तिथे आपल्याला नक्कीच पाणी मिळेल या आशेने तो त्याच्या शोधात पुढे पुढे जात राहतो. शेवटी त्याला लक्षात येते की आपल्याला जे पाणी वाटले होते, ते तर केवळ मृगजळ ! मृगजळ म्हणजे भ्रम. पाणी नाही हे सत्य. त्याप्रमाणेच हा संसार ! खरा वाटतो पण अखेरीस त्याची व्यर्थता लक्षात येते. खरी वस्तू एकच. ती म्हणजे भगवंताचे नाम. ते नाम पवित्र करणारे आहे. सत्याची जाणीव करून देणारे आहे. संसाराची व्यर्थता लक्षात आणून देणारे आहे. म्हणून हे मना, असे पवित्र नाम तू हृदयात धारण कर आणि संसाराची व्यर्थ चिंता सोडून दे. जी गोष्ट मुळात नाहीच तिची चिंता करण्यात काय अर्थ ?
तुकाराम महाराज म्हणतात,"हेचि थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची." भक्ती करणे म्हणजे जी गोष्ट आपल्याला अत्यंत प्रिय असते, ती परमेश्वराला अर्पण करावी. संसार, मुलेबाळे या गोष्टी आपल्या अत्यंत प्रिय असतात. त्यांच्यावर आपले जीवापाड प्रेम असते. हेच प्रेम भगवंताला अर्पण करावे. आणि भगवंताचे प्रेम अंतर्यामी धारण करावे.
स्वसंवाद
१. ज्या शिक्षण, नोकरी, संपत्ती किंवा नात्यांना मी माझ्या 'जीवनाचे सार्थक' मानून बसलो आहे, ते खरंच चिरंतन सत्य आहे की केवळ एक तात्पुरता भ्रम (मृगजळ) आहे?
२. "म्हातारपणी माझे कसे होईल? मुले मला सांभाळतील ना?" अशा भविष्यातील 'भवाच्या' (संसाराच्या) व्यर्थ चिंतांमध्ये मी माझा आजचा दिवस आणि मनाची शांतता गमावत आहे का?
३. माझ्या अंतर्मनात साचलेला बऱ्या-वाईट वासनांचा कचरा साफ करण्यासाठी मी 'पतितांना पावन करणाऱ्या' राघवाच्या नामाचा आश्रय किती वेळा घेतो?
४. तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, मी प्रपंचातील माझी सर्व आसक्ती आणि प्रेम भगवंताच्या चरणी अर्पण करून 'निर्वासन' भक्तीचा अनुभव घ्यायला तयार आहे का?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२५/५/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा