मुख्य सामग्रीवर वगळा

शब्दांच्या पाऊलखुणांतून देश जोडणारा तपस्वी

उगवतीचे रंग
शब्दांच्या पाऊलखुणांतून देश जोडणारा तपस्वी
माझं लहानपण एका खेड्यात गेलं. माझी आई फार शिकलेली नव्हती पण तिला लिहिता वाचता येत होतं. त्या जोरावर ती वाचायला शिकली. अनेक पुस्तके तिने वाचली. ती बहुश्रुत होती. बोलताना तिच्या तोंडातून सहज बोलीभाषेतील अर्थपूर्ण म्हणी आणि वाक्प्रचार बाहेर पडत. सुरुवातीला त्या म्हणींचा किंवा वाक्प्रचारांचा सखोल अर्थ कळण्याइतके माझे वय नव्हते. पण जसजशी समज वाढू लागली, तसतसा त्यांचा अर्थ कळू लागला. पानातली चटणी कशी चटकदार असते तशाच या छोट्याशा अर्थपूर्ण म्हणी. खेडेगावातील लोकही विशेष करून बायका अशा म्हणी वापरत. त्या सहजच कानावर पडत. त्यामुळे नाही म्हटलं तरी भाषिक जाण समृद्ध व्हायला मदत झाली. 
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे अशाच एका अवलियाची जन्मशताब्दी या वर्षी आहे. कोण बरं हा अवलिया ? तर त्याचं नाव आहे विश्वनाथ दिनकर नरवणे. संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी भारतीय कहावत कोष आणि भारतीय व्यवहार कोष तयार केला. तोही सोळा भाषांमध्ये. ज्या काळात संगणक, इंटरनेट यासारख्या गोष्टी आजच्यासारख्या उपलब्ध नव्हत्या त्या काळातील त्यांचे हे कार्य एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आहे. विश्वनाथजी म्हणजे एकखांबी तंबू होता. साध्या बसने किंवा मिळेल त्या वाहनाने त्यांनी अवघा देश पिंजून काढला. 
विविधता असणाऱ्या भारतासारख्या देशात फिरताना भाषांची अडचण त्यांना जाणवली. पण अशी अडचण आपल्या देशबांधवांना येऊ नये, भाषा हा देशाच्या प्रगतीतील अडसर बनू नये अशा तळमळीतून त्यांनी हे प्रचंड कार्य उभे केले. विविध लोकांना ते भेटले. देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. नेताजींनी देशवासियांना जसे," तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा "असे आवाहन केले होते. त्या धर्तीवर त्यांनी लोकांना, " तुम मुझे शब्द दो,  मै तुम्हे धन्यवाद दूंगा," असे म्हणून लोकांकडून शब्द आणि म्हणी गोळा केल्या. त्यांचे तीन खंड प्रकाशित केले. या तीन खंडांची पृष्ठसंख्या तब्बल तीन हजार पाने एवढी प्रचंड आहे. आपल्या या कार्यामुळे ते डॉ श्रीधर व्यंकटेश केतकर, वा शि आपटे, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यासारख्या मान्यवर कोशकर्त्यांच्या पंक्तीत आदराने जाऊन बसले. 
 रत्नागिरी जिल्ह्यात नाखरे या गावी १८ ऑगस्ट १९२४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण अतिशय खडतर होते. आधीच आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य. त्यात वडील बालपणीच वारले. आता घरात येणारी आर्थिक आवक बंद झाली. गावातील लोकांनी आणि नातेवाईकांनी त्यांना शिक्षणासाठी मदत केली. 
त्यांचं आरोग्य अत्यंत उत्तम होतं. सर्व प्रकारच्या खेळांमध्ये त्यांना गती होती. मैदानी खेळांसोबतच मल्लखांब, पोहणे आदी क्रीडाप्रकारांवर त्यांचे प्रभुत्व होते. शाळेतील शिक्षक त्यांना विद्यार्थ्यांची कवायत घेण्यास सांगत. राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमान त्यांच्या नसानसात भिनला होता. एकदा ते अशीच कवायत घेत असताना एका ब्रिटिश अधिकाऱ्याचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांच्या कौशल्यावर तो बेहद्द खुश झाला आणि त्यांना म्हणाला, " सैन्यात भरती होण्यास तयार आहेस का ?" तेव्हा देशभक्ती रक्तातच असलेल्या विश्वनाथने त्या अधिकाऱ्याला बाणेदारपणे उत्तर दिले. " आमच्या देशाला गुलाम करणाऱ्या ब्रिटिशांची चाकरी मी कदापिही करणार नाही." 
शालेय शिक्षण रत्नागिरीत पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांनी बडोदा गाठले. तेथे त्यांनी खेळांचे प्रशिक्षक म्हणून काम केले. त्यातून मिळणाऱ्या पैशातून शिक्षण घेतले. याच सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. ते त्याच्याशी जोडले गेले ते कायमचेच ! दादरा -नगर-हवेलीच्या मुक्तिसंग्रामात त्यांनी भाग घेतला होता. संघाचे प्रचारक म्हणून देशाच्या विविध भागात भ्रमंती केली. स्वामी विवेकानंदांच्या कार्याबद्दल त्यांना अतीव आदर होता. कन्याकुमारीच्या समुद्रात ज्या खडकावर ध्यानस्थ बसल्यानंतर पुढील कार्याची प्रेरणा मिळाली, त्या खडकाचे दर्शन त्यांनी पाच ते सहा वेळा पोहून तिथपर्यंत जाऊन त्यांनी घेतले. 
भारतातील विविध प्रांतात फिरताना त्या त्या भागातील शब्द, वाक्प्रचार त्यांनी गोळा केले. भारतातील कोणत्याही प्रांतात फिरताना कोणालाही अडचण येऊ नये म्हणून विविध भाषांतील समानार्थी वाक्ये त्यांनी एकत्र केली. त्यांच्या या सगळ्या प्रचंड खजिन्याचे रूपांतर भारतीय व्यवहार कोशात त्यांनी केले. विशेष म्हणजे देवनागरी लिपी ज्या कोणालाही वाचता येते, त्याला हा कोश वाचून कोणतीही भाषा शिकता येईल. कोठे काही अडणार नाही आणि देशातील बहुतेक सर्व प्रांतात सहजतेने वावरता येईल. तामिळ असो की तेलगू, बंगाली असो की आसामी... प्रत्येक भाषेतील शब्दाला त्यांनी देवनागरीचे सुंदर अस्तर लावले. जणू काही वेगवेगळ्या रंगांची फुले त्यांनी देवनागरीच्या एकाच सुवासिक धाग्यात ओवून भारताची एक सुंदर भाषिक माला तयार केली!
विश्वनाथजींचा शिकण्याचा आणि काम करण्याचा आवाका प्रचंड होता. इंग्रजीसह सोळा भारतीय भाषा त्यांना अवगत होत्या. ज्या भाषा त्यांना येत नव्हत्या, त्या शिकून घेण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. बडोद्यात शिक्षण घेतल्याने गुजराती भाषा त्यांना उत्तम येत होती. बंगाली शिकण्यासाठी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात ते राहिले आणि बंगाली भाषा आत्मसात केली. उर्दू शिकण्यासाठी लखनौ, हैदराबाद इ. ठिकाणी राहिले. काश्मीरी, पंजाबी, मल्याळम, कानडी या भाषादेखील अशाच प्रयत्नपूर्वक आत्मसात केल्या. 
त्या काळी ते भाषेच्या संवर्धनासाठी घेत असलेल्या कष्टांची जाणीव फारच थोड्याना होती. सरकारकडून मदत मिळणे तर दूरचीच गोष्ट ! स्वतःच प्रांताप्रांतात फिरणे, मिळालेली माहिती लिहून ठेवणे, तिचे वर्गीकरण करणे, छापून आणण्यासाठी प्रयत्न करणे या सगळ्या गोष्टी कोणाच्याही मदतीशिवाय त्यांना एकट्यालाच कराव्या लागल्या. मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे, मिळेल ते खाणे यासारख्या गोष्टी त्यांनी आनंदाने स्वीकारल्या. शिवाय त्याचे भांडवल केले नाही. हातामध्ये एक जुनी सॅक, डोळ्यांत एक अद्भूत स्वप्न आणि अंत:करणात भारताच्या विविध भाषांबद्दल  अपार आदर घेऊन या माणसाने सतत एक तप देशाच्या कानाकोपऱ्यात पायपीट केली. एका राज्याची सीमा ओलांडून दुसऱ्या राज्यात जाताना बदलणारी माती, तिथली संस्कृती आणि त्या संस्कृतीच्या कुशीत जन्मलेले 'शब्द' गोळा करण्याचा हा प्रवास एखाद्या महाकाव्यापेक्षा कमी नव्हता. त्यांच्या या अफाट कार्यात त्यांना आणखी एका व्यक्तीचे मात्र सहकार्य मिळाले. ती व्यक्ती म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती प्रा. कविता नरवणे. कविताबाई या विद्वान तर होत्याच पण आपल्या पतीच्या कार्याचे मोल जाणणाऱ्या होत्या. 
त्यांच्या कार्याची दखल घेणारी आणखी एक व्यक्ती त्यांना योगायोगाने मिळाली. ती व्यक्ती म्हणजे एक भाषाशास्त्रज्ञ होती. त्या व्यक्तीने त्यांचा गौरव भारतीय डॉ जॉन्सन म्हणून केला. ही बातमी लंडन टाइम्समध्ये प्रकाशित झाली. योगायोगाने ती तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरूंच्या वाचनात आली. त्यांनी विश्वनाथजींच्या कार्याची दखल घेऊन अत्यंत आदरपूर्वक विश्वनाथजींना बोलावून घेतलं. त्यामुळे त्यांना पुढील कार्यात मदत प्राप्त होऊन सरकारी पातळीवर आपल्या कोशाची विक्री करता आली. आपल्या या कार्यामुळे त्यांचे अनेक थोर मान्यवर व्यक्तींसोबत संबंध आले. त्यामध्ये डॉ राजेंद्रप्रसाद, स.का.पाटील यांच्यासारख्या व्यक्ती होत्या. परंतु त्यांच्या संबंधाचा वैयक्तिक फायदा त्यांनी कधीही करून घेतला नाही. आपल्या कामाच्या संदर्भात मात्र त्यांचे आवश्यक ते सहकार्य अवश्य घेतले. काही काळ त्यांनी अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. प्रेमचंद, शरदचंद्र आणि सरोजिनी नायडू यांच्या साहित्यावर त्यांनी केलेले लेखन त्यांच्यातील प्रगल्भ रसिकतेची साक्ष देते. 
विश्वनाथजींनी कोषनिर्मितीचे एवढे प्रचंड कार्य केले तरी त्यांची वृत्ती एका कवीची होती. शेष सुंदर हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या देशभक्तीचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत आपल्याला पाहायला मिळते. आपल्या काव्यसंपदेखेरीज मुन्शी प्रेमचंद यांचे चरित्रही त्यांनी लिहिले आहे. भारतीय व्यवहार कोश आणि भारतीय कहावत संग्रह हे तर त्यांचे चिरंतन प्रेरणादायी असे कार्य ! आज पुण्यातल्या एसएनडीटी महाविद्यालयाच्या जवळून जाताना रस्त्यातील एका पाटीवर लक्ष स्थिरावते—'कोशकार विश्वनाथ दिनकर नरवणे रस्ता'. गजबजलेल्या शहरातील त्या पाटीकडे पाहून मन क्षणभर थबकते. नुकतीच त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली. ही पाटी आपल्याला ओरडून सांगतेय की, ही केवळ एका व्यक्तीच्या नावाची पाटी नाही, तर ती साक्ष आहे एका माणसाच्या निस्सीम, मूक, एकहाती आणि झाकोळलेल्या महातपस्येची!
कलंदर आणि रसिक असे हे विश्वनाथजी आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी अखेरपर्यंत धडपडत राहिले. वयाच्या ७८ व्या वर्षी दि. ८ मे २००३ मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचे अनेक संकल्प मात्र मृत्यूमुळे अपूर्ण राहिले. परंतु असे असले तरी आपल्या अद्वितीय आणि हिमालयाएवढ्या कार्यामुळे ते अजरामर आहेत.अशा या महान व्यक्तिमत्वाला त्यानिमित्ताने वाहिलेली ही आदरांजली. 
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
३१/५/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 
















टिप्पण्या