उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग २ ) समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी या भागात रवींद्रनाथ टागोरांना आपल्या घरातच समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी कशी लाभली ते आपण पाहणार आहोत. त्यातूनच त्यांचे विविधांगी आणि अत्यंत समृद्ध असे व्यक्तिमत्व कसे विकसित होत गेले हेही आपल्या लक्षात येईल. टागोरांच्या काळात ब्रिटिश सत्ता भारतात स्थिरस्थावर झाली होती. बंगालमधील शहरी भागात इंग्रजांच्या अनेक गोष्टींचे अनुकरण करण्यात धन्यता मानणारा नवशिक्षित वर्ग होता. बंगालमधील लोककला, लोकनाट्ये, लोकगीते इ. गोष्टींना इंग्रजी नाटकांप्रमाणे अत्याधुनिक स्टेज, पडदे, सजावट आदी गोष्टी नव्हत्या. पण त्यातील कला, अभिनय आणि शब्दफेक मात्र पहिल्या दर्जाची होती आणि प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारी होती. पण इंग्रजांना याची जाण नसल्याने आणि त्यांना ते जाणून घ्यायचेही नसल्याने त्यांनी या ग्रामीण बंगालमधील लोककलांना ग्रामीण, उठवळ आणि रानटी अशा प्रकारचा शिक्का त्यावर मारला. इंग्रजी शिक्षण घेऊन नुकतेच शिक्षित झालेल्या शहरी लोकांना सुद्धा मग आपल्या देशातील, प्रांतातील ही लोककला ' क्रूड, अनपॉलीश्...