उगवतीचे रंग कर्तव्याने घडतो माणूस कधी कधी आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की माणूस अगदी खडबडून जागा होतो. स्वतःबद्द्दल फिरून विचार करायला लागतो. गेल्या आठवड्यात अशाच दोन घटना घडल्या. त्या घटना सांगण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी आपल्याला सांगणे आवश्यक आहे. सध्या पावसाळा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही नुकतेच पुण्याहून आलो होतो. आमच्या भागात येथील नगरपालिकेने काही दिवसांपूर्वीच भूमिगत गटारांचे काम केले होते. त्यासाठी रस्त्याच्या मधोमध खड्डे खोदून पाईपलाईन टाकण्यात आली होती आणि चेंबर्स बांधण्यात आले होते. नगरपालिकेचे आणखी काही नियोजन असेल, ते माहिती नाही पण त्यांनी ते खोदलेले रस्ते नीट न करता वरवर केवळ माती लोटून ते भरले होते. व्हायचे ते झाले. आधीच रस्ते वेगवेगळ्या कारणांनी खराब झालेले होते. तशात हे काम. थोडाफार पाऊस झाला आणि रस्त्यांना चिखलाचे स्वरूप आले. एवढा प्रचंड गारा आणि चिखल झाला की गाड्या त्यात फसू लागल्या. काही टू व्हीलर चालवणारे तोल जाऊन पडले. घरासमोर इतका चिखल की पाय टाकण्याचीही पंचाईत. तेथून कसेबसे बाहेर पडावे तर चारही बाजूला रस्त्यांची तीच अवस्था....