उगवतीचे रंग एक काळ ऐसा होता… लिहिता लिहिता सहज काही ओळी सुचल्या… एक काळ असा होता— जेव्हा गुणवत्तेला मोल होते. एक काळ असा होता— जेव्हा कलेचे मोल होते, हृदयातून उमटलेले गाण्याचे बोल होते. एक काळ असा होता— जेव्हा पैसा होता छोटा, पण माणूस होता मोठा. एक काळ असा होता— विचारात मतभेद होते, पण माणसाबद्दलचा आदर अविचल होता. एक काळ असा होता— जात अन् धर्म किरकोळ होते, पण माणूस सर्वांत महत्त्वाचा होता. या ओळी सुचण्याचं कारण म्हणजे आज आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक घटना. तरीही, पूर्वी सर्व काही चांगलेच होते आणि आज सर्वच वाईट आहे, असा माझा हेतू अजिबात नाही. आजही इमानदार आणि आदर्शांनी जगणाऱ्या असंख्य माणसांमुळेच समाजाचा तोल टिकून आहे. फरक एवढाच आहे की त्यांचा आवाज गोंगाटात हरवून जातो. मला आठवतात—महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. विचारांत फरक असूनही एकमेकांबद्दलचा आदर कधीच ढळला नाही. नेहरू आणि सरदार पटेल—वेगवेगळ्या मतांचे, पण राष्ट्रकार्यासाठी परस्परांचा आदर राखणारे. सावरकर–सुभाषबाबू, सावरकर–गांधीजी—मतभेद असले तरी टीका कधीच वैयक्तिक पातळीवर गेली नाही. स्वातंत्र्याच्या काळात हे अग्रगण्य नेते ह...