उगवतीचे रंग ज्योत दिव्याची मंद तेवते.... वेळ संध्याकाळची. थोडा अंधार पडायला लागला होता. घरातले दिवे लावले. पण देवाजवळही दिवा लावल्याशिवाय बरं वाटत नाही. किंबहुना आपली परंपराच आहे ती ! थोडा वेळ दिवा लावून देवाजवळच शांत बसून राहावं. त्याच्यासारखं सुख नाही. देवाजवळच्या समईच्या वातींना थोडा गुल ( कार्बन ) आला होता. तो बाजूला केला. समईत थोडं तेल घातलं आणि काडी पेटवली. वातींनी पेट घेतला. समईच्या ज्योतीकडे पाहिलं. सुरुवातीला ज्योत काही क्षण निळसर भासली. नंतर ती पिवळ्या सोनेरी रंगाची झाली. काही वेळानं समईतलं तेल संपल्यानंतर ती जेव्हा मालवली तेव्हा किंचित काळ लालसर होऊन शांत झाली. या ज्योतीकडे पाहत असताना मानवी जीवनासंबंधी मनात विविध विचार आले. सुरुवातीला ती ज्योत निळसर दिसली. हा निळा रंग म्हणजे आपले बाल्य. ती ज्योत जशी क्षण दोन क्षण निळी दिसते तसेच आपले बाल्यही रम्य असते. अल्पकाळ टिकणारे असते. कधी संपते ते कळत नाही. म्हणून तर बालपणीचा काळ सुखाचा असे आपण म्हणतो. निळ्या रंगाचे हे पक्षी केव्हा भुर्रकन उडून जातात ते कळत नाही. पण आठवणी मात्र जन्मभरासाठी ठेवून जातात....