उगवतीचे रंग ' तेच ते...' बऱ्याच रसिकांना कविवर्य विंदा करंदीकर यांची ' तेच ते...' ही कविता माहिती असेल. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा विंदा चाळीसगावला आले होते. त्यावेळी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ही कविता ऐकण्याचा योग आला होता. त्यावेळी मी लहान असल्याने त्या कवितेतला गहन अर्थ कळला नव्हता. पण आपल्या जीवनात त्याच त्या असलेल्या गोष्टी सारख्या कराव्या लागत असल्याने येणारा वैताग मात्र बालसुलभ मनाला कळला होता. आज विंदा असते तर अजून भरपूर विषय त्यांना या कवितेत भर घालायला मिळाले असते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीवरून कदाचित त्यांना असे वाटले असते - तेच लोक, तीच निवड, तीच आवड तीच नावड तेच विषय तेच वाद, वक्तव्याचे गंभीर पडसाद तीच भाषणे, तेच हारतुरे तेच सत्कार त्याच शाली, तेच हॉल तीच पुस्तके, तेच स्टॉल कोरोनाच्या बाबतीत त्यांना वाटले असते - तोच व्हायरस तेच हाल, तीच लोकांच्या जगण्याची कमाल तोच मास्क तेच टास्क, सॅनिटायझर आणि रुमाल तेच लॉकडाऊन तेच क्वारंटाईन तीच नर्स तीच व्हॅक्सिन त्याच परीक्षा ...