उगवतीचे रंग एक लढा असाही - भाग सहा मागील पाच भागात हिमालयातील विविध भागात होणाऱ्या वृक्षतोडीवर स्त्री पुरुषांनी दिलेला लढा आपण पाहिला. अमृता देवी, गौरा देवी, किंकरी देवी यासारख्या स्त्रियांचे हे वृक्ष वाचवण्यातील योगदान आपण पाहिले. या स्त्रियांच्या नावापुढे देवी हा शब्द आला आहे. खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणासाठी झगडणाऱ्या आणि आपले आयुष्य वेचणाऱ्या या देवीच आहेत. त्यांचे योगदान अमूल्य आहे. दशौली ग्रामस्वराज्य संघ या सारख्या स्थानिक पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या संघाना म्हणजेच त्यातील काही सदस्यांना सरकारने त्यांच्या मागणीनुसार जंगलातील प्रत्येकी एक हेक्टर जमीन ९९ वर्षांच्या कराराने दिली आहे. या जमिनीवर या लोकांनी विविध वृक्षांची लागवड करून पुन्हा जंगलांना त्यांची समृद्धी प्राप्त करण्याचा निश्चय केला आहे. ही झाडे लावताना या लोकांच्या दैनंदिन गरजा भागतील असे वृक्ष लावण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यात अंगू, ओक, भीमल आदी वृक्षांची लागवड केली आहे. हे वृक्ष खाद्य, चारा, सरपण इ गरजा भागवतात. जंगलतोडीने उघडेबोडके झालेले डोंगर या लोकांनी मोठया कष्टाने पुन्हा हिरव...