उगवतीचे रंग वक्ता दशसहस्त्रेषु बऱ्याच वेळा टीव्ही वरचे रटाळ कार्यक्रम पाहिले की माझ्या मनात असा विचार येतो की खरोखर एखादे टीव्ही चॅनेल आपल्या मालकीचे असायला हवे होते. खरं तर हे एक अत्यंत प्रभावी माध्यम. पण व्यापारी आणि स्पर्धात्मक मनोवृत्तीने यातली मजा आणि आनंद हरवला आहे. बोटांवर मोजण्याइतके क्वचितच काही चांगले कार्यक्रम बघायला मिळतात. विनोदी कार्यक्रमातही तेच ते रटाळ विनोदी प्रसंग,अचकट विचकट आणि अश्लीततेकडे झुकणारे विनोद बघायला मिळतात. कधी कधी हे विनोदी कार्यक्रम हाच एक मोठा विनोद वाटावा अशी परिस्थिती आहे. पण अशा वेळी दोनच पर्याय तुमच्या हातात असतात आणि ते म्हणजे मुकाट्याने हे कार्यक्रम पाहणे ( ते छान आहेत असा समज करून घेऊन पाहणे ) आणि दुसरा पर्याय म्हणजे रिमोट तुमच्या हातात असते. तुम्ही ते बंदही करू शकता. बरेच वेळा हा दुसरा पर्याय मला अवलंबावा लागतो. आपण मराठीतील काही दर्जेदार विनोदी लेखकांचे साहित्य वाचले असेल तर आपल्या लक्षात येईल तो दर्जा आता राहिला नाही. पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, द मा मिरासदार, राम गणेश गडकरी ( बाळकराम ), चिं वि जोशी आदींच्या विनोदातील ख...