मुख्य सामग्रीवर वगळा

जीना यहाँ मरना यहाँ

उगवतीचे रंग 

जीना यहाँ मरना यहाँ  

असं म्हणतात की सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्धाला त्याच्या वडिलांनी जीवनातील दुःखाचं  दर्शन घडू नये म्हणून त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला हवी ती सगळी सुखं दिली. पण जीवनातील सत्याला प्रत्येकाला सामोरं जावेच लागतं. तसे त्यालाही जावं लागलं. पण काही काळ का होईना पण सिद्धार्थला जीवनातील दुःखांपासून दूर ठेवण्यात शुद्धोधन यशस्वी झाला. कारण तो राजा होता. पण आज आपल्याला मात्र असे करणे शक्य नाही. जीवनातील चांगले आणि वाईट, सत्य आणि असत्य, सुंदर आणि बीभत्स अशा सगळ्याच गोष्टी नित्यनियमाने काहीशा एकत्रितपणे आपण अनुभवत असतो. ' जिंदगी के रंग कई रे ' असं एक सुंदर गाणं आदमी और इन्सान या चित्रपटात आहे. खरोखरच डोळे उघडे ठेवले तर आयुष्याचे अनेक रंग अनुभवायला मिळतात. काही रंग आनंद देणारे, काही उदास करणारे, काही भीतीदायक तर काही धीर देणारे. 

झालं असं की परवा एका लग्नानिमित्त आयोजित केलेल्या स्वागत समारंभासाठी गेलो होतो. बड्या घरचं कार्य असल्यानं एका भव्य अशा फार्महाऊसमध्ये सोहळ्याचं आयोजन केलं होतं. प्रवेशद्वारापासूनच कार्यक्रमाची श्रीमंती आणि थाटमाट नजरेत भरत होता. वाळ्याच्या सुगंधाचं अंगावर शिंपण होत होतं. उपस्थितांच्या करमणुकीसाठी आत प्रवेशल्यावर एका बाजूला एक बहारदार अशी ऑर्केस्ट्राची मैफल सुरु होती. वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेजच्या खाली लांबपर्यंत रांग होती. जेवणासाठी तर विविध प्रकारच्या स्वादिष्ट व्यंजनांची रेलचेल होती. आपल्या आवडीनुसार हव्या त्या पदार्थांचा आस्वाद उपस्थित घेत होते. 

जीवनाचं उत्सवी दर्शन या कार्यक्रमातून घडत होतं. जीवन म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य, मौज असाच संदेश हा सोहळा जणू उपस्थितांना देत होता. वधूवरांचे तरुण मित्र मैत्रिणी मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांचे पोशाख, वागणे, बोलणे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. वधूवरांचे जवळचे आप्तही या वेळी उपस्थित राहून उपस्थितांचे स्वागत करीत होते. वधूवरांच्या एका नव्या जीवनाची आनंदी सुरुवात होत होती. 

जिथे हा मंगल सोहळा सुरु होता, त्याच्या पाठीमागेच काही अंतरावर एक स्मशानभूमी होती. तिथे त्याचवेळी कोणाच्या तरी जीवनाचा शेवट होत होता. अल्पशा आजाराने मृत्यूला कवटाळणाऱ्या एका दुर्दैवी जीवाचा अंत झाला होता. त्याची आजाराशी झुंज अयशस्वी ठरली होती. जीवन आणि मृत्यू यांच्यातील संघर्षात मृत्यूचे पारडे जड ठरले होते. हातातोंडाशी आलेला तरुण मुलगा एकाएकी जीवघेण्या आजाराचे निमित्त होऊन हे जग सोडून गेला होता. त्याच्या आईवडिलांचा शोक पाहवत नव्हता. 

एकीकडे ऑर्केस्ट्राचे स्वर वातावरण धुंद करीत होते. दुसरीकडे दुःखाचा आर्त टाहो. एकीकडे आनंद, सुगंधाची लयलूट होत होती, तर दुसरीकडे शोकाकुल वातावरण. एकीकडे मिष्टान्नावर ताव मारणारे लोक होते तर दुसरीकडे एवढे प्रचंड दुःख होते की त्यात कोणाला भूक तहानेची शुद्ध नव्हती. एकीकडे नवीन जीवनाची सुरुवात होत होती तर दुसरीकडे एका उमलू पाहणाऱ्या जीवनाचा शेवट झाला होता. 

त्याच फार्महाऊसच्या बाजूला एक सुंदर बाग आहे. तिथे तर वेगळेच दृश्य बघायला मिळत होते. कुठल्यातरी कोपऱ्यात तरुणतरुणींचे एकमेकांशी हितगुज चालले होते. बागेतल्या बाकांवर काही जोडपी स्थानापन्न झाली होती. ती तेथील वातावरणाचा आनंद घेत होती. कोणीतरी आजीआजोबा आपल्या नातवाला खेळवीत होते. लहान मुले विविध खेळांचा आनंद घेत होती. मुलांसाठीचे झोके, सीसॉ चैतन्याने फुलले होते. 

या तिन्ही दृश्यानी मला विचारप्रवण केले. मी मनात म्हटले, ' बा जीवना, किती विविध रंग तुझे ! एकीकडे तू जगण्याची आस निर्माण करतोस. जीवन म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य असं वाटत असताना दुसऱ्या बाजूला त्याच जीवनाचा फोलपणा सुद्धा तू दाखवून देतोस ! पैशानं, श्रीमंतीनं, सौंदर्यानं वा आणखी कशानंही गर्वाचा फुगा फुगला असेल तर, तो एक दिवस तो फुगा फुटणारच हे निश्चित ! ' असेच तुझे जणू आम्हाला सांगणे असते ना ! 

तुझं सांगणं बरोबरच आहे. तू आम्हाला सुरुवात आणि शेवट दाखवतोस. जीवनाचे खरे स्वरूप नजरेस आणून देतोस. पण तुला म्हणून सांगतो. हा मानव हार मानणारा नक्कीच नाही. तू सांगतोस ' तुमच्या जीवनाची ही आनंदी सुरुवात, आणि हा असा शेवट. तेव्हा काय समजायचे ते समजा. '  पण मी काय करतो ? तू जे सांगतोस ना त्याच्या उलट विचार करतो. मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे मला माहिती आहे पण जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान जीवन नावाचा एक सुंदर प्रवास आहे रे ! तो कसा सुंदर आणि सार्थ करायचा हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. 

तू आम्हाला लाख सांगशील, ' जीना यहाँ मरना यहाँ ' पण आम्ही पडलो जीवनावर प्रेम करणारे. आम्ही म्हणतो, ' या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ' तू दाखवलेल्या जीवनाच्या भयंकर सत्याने निराश होणारे आम्ही नक्कीच नाही. आमचे पाडगावकर  म्हणतात, ' कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी ' आम्ही माणसात परमेश्वर पाहणारे, निसर्गातील फुलात, खेळणाऱ्या मुलात, वाहणाऱ्या झऱ्यात, झुळझुळणाऱ्या वाऱ्यात चैतन्य अन आनंद शोधणारे. परमेश्वर इथेच आहे. त्यामुळे जे जीवन आहे ते आम्ही आनंदानं जगू. कोलंबसाचे गर्वगीत आम्ही शिकलो आहोत. लाख संकटं आली तरी येऊ देत. कुसुमाग्रज म्हणतात, ' अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. ' कर्तव्यमार्गावर सतत कार्यरत राहण्याची शिकवण देणारा भगवान श्रीकृष्ण आमचा आदर्श आहे. तेव्हा हे जीवना, तुझ्या सगळ्या रूपांचे स्वागत आहे. फक्त तू सुद्धा आमच्या पाठीवर हात ठेवून फक्त ' लढ म्हण. ' 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२०/५/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...