उगवतीचे रंग
एक काळ ऐसा होता…
लिहिता लिहिता सहज काही ओळी सुचल्या…
एक काळ असा होता—
जेव्हा गुणवत्तेला मोल होते.
एक काळ असा होता—
जेव्हा कलेचे मोल होते,
हृदयातून उमटलेले गाण्याचे बोल होते.
एक काळ असा होता—
जेव्हा पैसा होता छोटा,
पण माणूस होता मोठा.
एक काळ असा होता—
विचारात मतभेद होते,
पण माणसाबद्दलचा आदर अविचल होता.
एक काळ असा होता—
जात अन् धर्म किरकोळ होते,
पण माणूस सर्वांत महत्त्वाचा होता.
या ओळी सुचण्याचं कारण म्हणजे आज आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक घटना.
तरीही, पूर्वी सर्व काही चांगलेच होते आणि आज सर्वच वाईट आहे, असा माझा हेतू अजिबात नाही.
आजही इमानदार आणि आदर्शांनी जगणाऱ्या असंख्य माणसांमुळेच समाजाचा तोल टिकून आहे.
फरक एवढाच आहे की त्यांचा आवाज गोंगाटात हरवून जातो.
मला आठवतात—महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
विचारांत फरक असूनही एकमेकांबद्दलचा आदर कधीच ढळला नाही.
नेहरू आणि सरदार पटेल—वेगवेगळ्या मतांचे, पण राष्ट्रकार्यासाठी परस्परांचा आदर राखणारे.
सावरकर–सुभाषबाबू, सावरकर–गांधीजी—मतभेद असले तरी टीका कधीच वैयक्तिक पातळीवर गेली नाही.
स्वातंत्र्याच्या काळात हे अग्रगण्य नेते होते, पण सभ्यता हीच त्यांची भाषा होती.
अगदी अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी यांची शैली तर आदर्शच ठरावी—
मतभेद व्यक्त करतानादेखील त्यांनी संयम, शब्दांची शिस्त आणि मर्यादा कधीच सोडली नाही.
दुर्दैवाने आज हा संयम लयाला जाऊ लागला आहे.
शब्दांचा उगम विचारातून नव्हे तर स्वार्थातून आणि रागातून होताना दिसतो.
विरोधकांशी मतभेद म्हणजे शत्रुत्व, आणि टीका म्हणजे चारित्र्यहनन—
असा एक धोकादायक प्रवाह हळूहळू समाजाच्या सर्वच स्तरांवर झिरपत चालला आहे.
निवडणुका आल्या की हा गोंगाट शिगेला पोहोचतो.
विचारसरणी, तत्त्वे, मुद्दे याऐवजी वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांचे नाटक सुरू होते.
हे पाहताना संवेदनशील व्यक्तीच्या मनाला वेदना झाल्याशिवाय राहत नाहीत.
याच काळात, अनेक तरुण आजही समाजकारणात निःस्वार्थ ध्येयाने येतात,
अनेक अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात,
अनेक स्वयंसेवी संस्थांची सेवा आजही प्रेरणादायी आहे.
समाजाचे शांत, निस्वार्थ काम करणारे हात आपल्याभोवती आहेत—
नकारात्मक गोष्टी आपल्यासमोर जास्त प्रमाणात येतात पण अशा गोष्टींकडे मात्र आपले फारसे लक्ष जात नाही.
गुणवत्ता असो वा नसो—सत्ता आपल्या घरातच राहावी, अशी धडपड अनेक ठिकाणी दिसून येते.
कधी योग्य उमेदवार डावलला जातो, तर कधी पैसा आणि जात या निकषांना अतिरेकी महत्त्व दिले जाते.
चित्रपटसृष्टीतील प्रेरणादायी उदाहरणे सांगताना पृथ्वीराज कपूर यांची घटना आठवते—
त्यावेळी राज कपूर यांनी चित्रपटसृष्टीत नुकतेच पदार्पण केले होते. सुरुवातीलाच त्यांना भालज पेंढारकर यांनी आपल्या चित्रपटात काम दिले. भालजी पेंढारकर यांनी राज कपूर यांना त्यावेळी तब्बल ५,००० रुपये मानधन दिले. ५००० रुपयांची किंमत त्यावेळी फार मोठी होती. तेव्हा पृथ्वीराज कपूर यांनी भालजींना विचारले
“ तुम्ही ही रक्कम त्याला त्याच्या गुणवत्तेमुळे दिली की माझा मुलगा आहे म्हणून ?”
आज असे शब्द बोलण्याची नैतिक ताकद कितीजणांत उरली आहे?
देवानंद यांनी मुलाच्या अभिनयक्षमतांचा वस्तुनिष्ठ विचार करून त्याला चित्रपटातून दूर राहण्यास सांगितले.
आजकाळ मात्र अभिनयाची किमान जाण नसलेली मुले–मुली मोठ्या नावांच्या जोरावर पुढे येताना दिसतात.
१९५० मध्ये बांगलादेशातील लाखो निर्वासित हिंदू भारतात आले होते. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती. प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला त्यावेळी केवळ सतरा अठरा वर्षांचीच होती. परंतु या निर्वासितांची अवस्था पाहून मधुबालाचे हृदय द्रवले आणि तिने आपली साठवलेली रक्कम ५१,००० रुपये या निर्वासितांच्या मदतीसाठी दिली. मुस्लिम असलेल्या मधुबालाने धर्माचा विचार केला नाही. तिच्यासाठी माणूस महत्त्वाचा होता. हीच खरी मानवतेची ओळख.
संगीताच्या विश्वात तर शकील बदायुनी, नौशाद आणि रफी
ज्यांनी ‘ओ दुनिया के रखवाले’ सारखी अमर निर्मिती दिली, त्यांच्या गीतात धर्म कुठेच नव्हता. होते ते फक्त भावना आणि सौंदर्य! तर ‘ ऐ मालिक तेरे बंदे हम ’ हे वसंत देसाई–लता मंगेशकर यांचं गीत पाकिस्तानातही प्रार्थना म्हणून गायले गेले. कला आणि मानवता यांना सीमा नसतात. त्या फक्त माणसाला जोडतात.
निसर्ग तर याच गोष्टी आपल्याला सांगतो
चंद्र, सूर्य, पाऊस, वारा—
हे सर्व सर्वांसाठी समान असतात.
झाड झाडासाठी सावली राखून ठेवत नाही.
नदी आपल्या पाण्याचा वेगळे कोणी हिशेब ठेवत नाही.
पण माणूस मात्र अजूनही माणसाला वेगळा ठरवण्यात गुंतलेला आहे.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात
“ हे विश्वची माझे घर ” त्यांचे हे उद्गार फक्त आपल्या ओठांवर असतात पण आपण खरोखर तसेच जगतो का ?
मला माहिती आहे की हे सगळे खूप आदर्शवत आहे. पण त्या दिशेने एक पाऊल टाकल्यासही जग बदलण्याची शक्यता असते.
एक काळ असा होता—
ज्यावेळी भेदभाव कमी, आणि माणुसकी जास्त होती.
तो काळ पुन्हा यावा…
माणसाने माणसाला म्हणावं
मला फक्त तू हवा… तू हवा.
© विश्वास विष्णू देशपांडे, चाळीसगाव
२९/११/२०२५
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा