मुख्य सामग्रीवर वगळा

वृक्षमाता सालूमरदा थिमक्का

 उगवतीचे रंग 

वृक्षमाता सालूमरदा थिमक्का

काही दिवसांपूर्वी सालूमरदा थिमक्का गेल्याची बातमी आपण सगळ्यांनी वृत्तपत्रात वाचली असेल. सालूमरदा हे त्याचं नाव नाही. कानडी भाषेत त्याचा अर्थ होतो ' झाडांची रांग.' रस्त्याच्या दुतर्फा अशी झाडांची रांग या स्त्रीने उभी केली म्हणून ती सालुमरदा. 

संत तुकारामांच्या 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या उक्तीचा अर्थ हजारो वर्षांनी एका अशिक्षित आणि गरीब स्त्रीने त्यांच्या रूपाने आपल्या कृतीने सिद्ध केला. औपचारिक शिक्षण नाही, पण पर्यावरणाचे सखोल ज्ञान उपजतच होतं.अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेली आणि मोलमजुरी करणारी ही स्त्री. तिचा विवाह बिक्कल चिक्कय्या यांच्याशी झाला. पण दोघांनाही अनेक वर्ष मूल होऊ शकलं नाही. या गोष्टीला त्यांनी नियतीचा शाप न मानता, वृक्षांनाच अपत्य मानण्याचं ठरवलं. त्यांच्या पतीनेही त्यांना या कामात मनापासून साथ दिली.

त्यांच्या गावाजवळून ९४ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जात होता. हुलीकल ते कुडूर या रस्त्यावर त्यांनी वडाची काही रोपे लावली. या रोपांना वाढवणे हा जणू त्यांच्या जीवनात कामचा एक भाग झाला. उन्हाळ्यात दूरवरून पाण्याचे हंडे घेऊन येणे, रोपांभोवती काटेरी कुंपण घालणे—हे त्यांचे रोजचे व्रत होते. ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी हा निस्वार्थ त्याग केला. त्यांच्या या 'सालुमरदा' (झाडांची रांग) मुळेच त्यांना हे आदराचे नाव मिळाले. या वाटेवर तब्बल ३८५ वडाची झाडे त्यांनी लावली. या झाडांवर पक्षी राहू लागले. वाटसरूंना आणि गुराढोरांना रस्त्यावर सावली मिळाली. एक नवीन विश्व उभे राहिले. एखाद्या व्यक्तीने ठरवले तर ती केवढे मोठे कार्य करू शकते हे त्यांच्या या कार्यातून सिद्ध होते.

असे सांगितले जाते की एकदा या रस्त्याने कर्नाटक मधील एक खासदार जात होते. दुपारच्या उन्हामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांनी रस्त्यावरील या वटवृक्षांच्या सावलीत थोडा वेळ विश्रांती घेतली. रस्त्याच्या दुतर्फा असलेली वटवृक्षांची रांग पाहून त्यांना खूप आनंद वाटला आणि हे एवढे मोठे काम कोणी केले असा प्रश्न त्यांना पडला. अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना लोकांनी थिमक्का यांचे नाव सांगितले आणि अशा रीतीने त्यांचे कार्य प्रकाशात आले.​ 

ज्या काळात पर्यावरण संरक्षणाचा फारसा गाजावाजा केला जात नव्हता अशा काळात त्यांनी ह कार्य केले. आज संपूर्ण जग जागतिक तापमानवाढीच्या (Global Warming) भीषण संकटाचा सामना करत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि निसर्गाचे संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर, थिमक्का यांनी केलेले कार्य केवळ एक सामाजिक उपक्रम नाही, तर ते २१ व्या शतकातील पर्यावरण संरक्षणाचे प्रभावी मॉडेल आहे.

​त्यांनी लावलेले प्रत्येक वडाचे झाड आज एक नैसर्गिक 'कार्बन सिंक' म्हणून कार्यरत आहे. ही वटवृक्ष पिढ्यानपिढ्या वातावरणातील कार्बन डायऑक्साइड (CO2) शोषून घेतात आणि त्या बदल्यात ऑक्सिजन बाहेर टाकतात. थिमक्का यांनी आपल्या निष्ठेच्या बळावर एक नैसर्गिक CO2 फिल्टर तयार केला. त्यांच्या कार्यामुळे भूजल संवर्धन झाले आणि मातीची धूप थांबली. त्यांचे कार्य म्हणजे जागतिक तापमानवाढीच्या विरोधात केलेली एक स्थलांतरित (Local) आणि अत्यंत प्रभावी कृती होती.

​थिमक्का यांच्या कार्याला त्यांच्या मानसपुत्र उमेश यांचा मोठा आधार लाभला. उमेश यांनी केवळ थिमक्का यांची वृद्धापकाळात सेवा केली नाही, तर या वृक्षारोपण मोहिमेचे व्यवस्थापन केले. दूरवरून पाणी आणणे असो, की या कार्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणे असो, उमेश हे थिमक्का यांच्या कार्याचे संवर्धक ठरले. त्यांच्या मदतीमुळेच थिमक्का यांच्या निस्वार्थ कार्याला पद्मश्रीसह अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

२०१९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यावेळी त्या १०७ वर्षांच्या होत्या. त्या स्वतः पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेल्या. त्यावेळेस ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांनी तो स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारत असताना त्यांनी आपला हात आशीर्वादासारखा रामनाथ कोविंद यांच्या मस्तकाला लावला. त्यामुळे आपण भारावून गेलो अशा प्रकारचे भावपूर्ण उद्गार राष्ट्रपतींनी काढले.

​सालुमरदा थिमक्का यांना वटवृक्षाप्रमाणेच ११४ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे कार्य आजही जिवंत आहे.

"वृक्ष लावणारे निघूनिया जाती, तळी विसावते सानथोर।"

या उक्तीप्रमाणे, थिमक्का आणि त्यांचे पती आज नसले, तरी त्यांनी लावलेले वटवृक्ष आजही दिमाखात उभे आहेत. त्यांच्या शीतल छायेखाली वाटसरूंना सावली मिळते, प्राणी-पक्षांना आश्रयस्थान लाभते आणि परिसर शुद्ध राहतो.

​थिमक्का यांनी जगाला दाखवून दिले की, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज नाही; त्यासाठी मनापासून इच्छा आणि निसर्गाप्रतीचे वात्सल्य आवश्यक आहे. त्यांचे जीवन चिरंतन प्रेरणास्रोत राहील आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटावर मात करण्यासाठी त्यांची 'वृक्षमाता' म्हणून असलेली भूमिका जगाला नेहमी दिशा देत राहील.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२६/११/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...