मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग 

एक लढा असाही ( भाग १ )

नुकताच आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. आपण जसा स्वातंत्र्यलढा पाहिला ( अर्थात विशाल अर्थाने हा स्वातंत्र्य संग्राम आहे ) तसे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लढे भारताने अनादी काळापासून अनुभवले आहेत. कधी तो १८५७ चा लढा असेल ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ' १८५७ चे स्वातंत्र्यसमर ' असे म्हटले आहे. कधी लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला विदेशी वस्तूंच्या वापराविरुद्धचा लढा असेल वा पुढे  गांधीजींनी  सुरु केलेली  वेगवेगळी आंदोलनं असतील, गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती लढा असेल, अशा अनेक असंख्य लढ्याची पार्श्वभूमी आपल्या इतिहासाला आहे. आज आपण या सर्वांपेक्षा आगळावेगळा असा एक लढा पाहणार आहोत. हा लढा निसर्गावर होणाऱ्या मानवाच्या आक्रमणाविरुद्ध आहे. या लढ्यात जसे पुरुष सामील आहेत, तशाच  स्त्रियाही सामील आहेत. किंबहुना महान लढवय्या स्त्रियांच्या प्रेरणादायी त्यागाने हा इतिहास भरलेला आणि भारलेला आहे. अशा काही स्त्रियांचा परिचयही या लेखमालेद्वारे करून द्यायचा प्रयत्न असणार आहे. 

खरं तर या लढ्याला ' चिपको आंदोलन ' किंवा ' मिठी मार ' आंदोलन असं म्हणता येईल. पण हा त्या विशाल लढ्याचा केवळ एक भाग आहे. मुख्य म्हणजे त्या त्या ठिकाणच्या स्थानिक जनतेने पर्यावरण वाचवण्यासाठी दिलेला हा लढा आहे. आपण स्वतःला जर भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणवून घेऊ इच्छित असलो, पर्यावरण प्रेमी म्हणवून घेऊ इच्छित असलो तर हा लढा आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. कारण हा लढा आपल्याला जणू इशारा देतो आहे की ' सावध ऐका पुढल्या हाका .' या हाका आपल्याला नाही ऐकू आल्या किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर निसर्ग आपल्याला क्षमा करणार नाही, आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाहीत.  पर्यावरण म्हणजे नेमके काय हे न शिकलेल्या परंतु निसर्ग आणि पर्यावरण ज्यांच्या जगण्याचा एक भाग आहे अशा अशिक्षित अशा लोकांनी घडवलेला हा इतिहास आहे.  तो जर आपण समजून घेणार नसू तर आपल्यासारखे करंटे आपणच असू हे खेदाने म्हणावे लागेल. 

भारताच्या उत्तरेला हिमालयाची विस्तीर्ण पर्वतराजी आहे. हिरवीगार वनराई, उंचच उंच वाढलेली सुरु, देवदार आदी वृक्षांची वने , खळाळत वाहणाऱ्या नद्या, विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी जीवन कोणाला आकर्षित करीत नाही ! पण हे खरंच तसं राहिलं आहे का , राहणार आहे का ? आज तरी नक्की सांगता येत नाही. अनेक ठिकाणची वस्तुस्थिती फार भयानक आहे. आपण सहलीसाठी जातो. हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ वगैरे पाहून येतो. आपण खूप समाधानी असतो. पण हिमालयातील किंवा उत्तराखंडमधील बऱ्याचशा जंगलांची प्रचंड हानी झाली आहे हे विदारक सत्य आपल्याला फारसे जाणवत नाही. चामोली, गढवाल, कुमाऊं, बढयारगड आदी परिसरातील जंगल बऱ्यापैकी नष्ट झाले आहे.  पण एके काळी हा सगळा भाग भरगच्च वृक्षराजीने भरलेला होता. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध होता. तेथे राहणाऱ्या लोकांच्या गरजा भागवणारा होता. 

ही विशाल वृक्षराजी म्हणजे भारताचे वैभव ! पण इंग्रज व्यापारी म्हणून या देशात आले आणि राज्यकर्ते बनले. पण मुळात त्यांची प्रवृत्ती व्यापारीच होती. त्यांची दृष्टी या नैसर्गिक सुबत्ता असलेल्या भागावर पडली आणि येथील डौलदार वृक्षराजी पाहून त्यांच्या व्यापारी वृत्ती जाग्या झाल्या. या वनांवर त्यांनी जणू आपली मालकीच प्रस्थापित केली. येथील स्थानिक रहिवाश्याना बेदखल केले आणि आपल्या स्वार्थासाठी, औद्योगिक उपयोगासाठी बेसुमार वृक्षतोड सुरु केली. डोंगराळ भाग असल्याने वाहतूक करणे कठीण होते. अशा वेळी तोडलेले लाकूड नद्यांच्या खळाळत्या पात्रातून वाहून नेण्याचा सोपा आणि बिनखर्चिक उपाय त्यांनी अवलंबला. या जंगलात राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या समस्यांमध्ये भर पडू लागली. येथील लोकांचे जीवनच या जंगलांवर अवलंबून होते. त्यांना लागणारे अन्न, वस्त्र, निवारा आदी साऱ्या गरजा हे जंगलच भागवत होते. डोंगर उतारांवर ही मंडळी थोडीफार शेती करत होती. सुरुवातीला त्यांना ही वृक्षतोडीची धग जाणवली नाही पण जसजसा काळ गेला, अधिकाधिक वृक्षतोड होऊन नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होऊ लागली तसतशी ही धग त्यांना जाणवायला लागली. हळूहळू ही मंडळी आपल्या हक्कांविषयी जागृत होऊ लागली. अर्थात १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज या देशातून गेले. मग ही बेसुमार जंगलतोड, पर्यावरणाची हानी थांबली का ? त्यांचा हा कित्ता आपण कसा गिरवला हे पुढील भागात पाहू या. 

( क्रमशः ) 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

११/०९/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 










 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...