उगवतीचे रंग
एक लढा असाही - भाग दोन
जंगलतोडीचे भीषण दुष्परिणाम
वाचकहो, मागील पहिल्या भागात आपण पाहिले की हिमालयातील विशेषतः उत्तराखंडातील समृद्ध जंगले इंग्रजांनी कशा प्रकारे नष्ट करण्यास प्रारंभ केला. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा ही जंगलतोड थांबली नाही. तेथील वनखात्याने, सरकारने ब्रिटिशांचाच वारसा पुढे चालवला. आपल्या हाताने आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ लागलो. ब्रिटिशांनी चीड, देवदार, साग, साल आदी वृक्षांच्या लागवडीला आणि वृक्षतोडीलाही उत्तेजन दिले कारण ते त्यांच्या व्यावसायिक उपयोगाचे होते. आम्हालाही तेच वृक्ष महत्वाचे वाटले. पण जंगलात राहणाऱ्या स्थानिक आदिवासी आणि पहाडी लोकांच्या गरजा भागवणारे पमनी, बांज, बुरांझ यासारख्या रुंदपर्णी जीवनदायी वृक्षांकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. जंगले साफ करण्यासाठी या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाली. या वृक्षांवर रोजीरोटी अवलंबून असणारा स्थानिक गरीब माणूस आपल्या अन्नपाण्याला मुकला. या प्रचंड जंगलतोडीने स्थानिक लोकांचा रोजगार हिरावून घेतला. अनेकांना स्थलांतर करण्याची वेळ आली. पोटाला अन्न, हाताला काम उरले नाही. आपल्या कच्च्याबच्यांना घेऊन अनेकांना शहरांचा रस्ता धरावा लागला. जंगलचा राजा असणारा हा पहाडी माणूस कुठेतरी रोजंदारी करू लागला, राखण करू लागला, हॉटेलात कपबशा विसळण्याची वेळ त्याच्यावर आली. लहान मुले हॉटेलात, चहाच्या टपऱ्यांवर कामे करू लागली. स्त्रिया बांधकाम आदी ठिकाणी कष्टाची कामे करू लागल्या.
कोणी केली ही जंगले साफ ? आमच्याच माणसांनी. कधी शेतीसाठी तर कधी व्यापारी फायद्यासाठी. ज्या वृक्षांना वाढण्यासाठी अनेक वर्षे लागतात ते डौलदार वृक्ष केवळ पाच दहा रुपयांसाठी आमचा स्थानिक माणूस गरजेपोटी तोडून आडवे करू लागला. अनेक वर्षांचे वाढलेले, निसर्ग, प्राणी संपत्तीने समृद्ध असलेले आमचे हिरवेगार जंगल केवळ काही दिवसात, काही तासात आडवे होऊ लागले. वृक्षांची हत्या होऊन त्यांचे निर्जीव कलेवर जागोजागी दिसू लागले. धरतीच्या या निष्पाप लेकरांचा शाप पुढे मानवाला भोवल्याशिवाय राहिला नाही.
पहाडात राहणारे लोक जंगल उतारांवर शेती करत. पण त्यासाठी झाडे तोडण्याचे प्रमाण सुरुवातीला मर्यादित होते पण या भागात जसजसा आपल्या नागर संस्कृतीचा प्रवेश झाला, तसतसा इथेही निसर्गाचा विध्वंस व्हायला सुरुवात झाली. या पहाडी भागातील लोक वर्षानुवर्षे परंपरेनुसार आपली शेतीची अवजारे अंगू वृक्षाच्या लाकडापासून बनवत. अंगू वृक्षाचे लाकूड वजनाला हलके पण चिवट आणि मजबूत असते. त्यामुळे या वृक्षाच्या लाकडापासून केलेली अवजारे शेतकऱ्यांना वापरण्यासाठी सोयीची असत. पण येथील वनखात्याने ही अंगूची झाडे खेळणी बनवणाऱ्या कंपनीला कराराने विकून टाकली. स्थानिक लोकांना अंगूची झाडे तोडण्यास मज्जाव केला आणि आपल्या शेतीच्या औजारांची गरज इतर वृक्षांचे लाकूड तोडून भागवावी असा अनाहूत सल्ला दिला.
१९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. आमच्या सीमाभागात सैनिकांना त्वरेने पोहोचण्यासाठी, रसद पुरवण्यासाठी तातडीने रस्ते करणे आवश्यक होते. सीमावर्ती भागात रस्ते करण्यासाठी काही भागातील जंगल तोडणे अपरिहार्य होते. त्यामुळे बऱ्याच भागात रस्त्यांसाठी वृक्षतोड झाली. याचा दुसरा एक तोटा असा झाला की या दुर्गम भागात नागरी संस्कृतीचा सहज प्रवेश या रस्त्यांमुळे होऊ लागला. मग साहजिकच कस्तुरीमृगापासून ते दुर्मिळ वनौषधी हस्तगत करण्याची माणसांमध्ये स्पर्धा लागली. जंगले आणखीनच ओरबाडली जाऊ लागली. माणसाच्या हावरटपणाला अंत नव्हता. त्यापायी निसर्गाचा मात्र बळी जाऊ लागला.
याचे दुष्परिणाम लवकरच जाणवायला लागले. नद्यांना महापूर येऊन प्रचंड नुकसान व्हायला सुरुवात झाली. दरडी कोसळू लागल्या. पावसाचे ढग साधारणपणे पाच ते दहा किमी उंच अंतरावर आकाशात असतात. तेथून पडणारे पावसाचे थेंब पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने खाली येऊ लागतात. जंगलात जेव्हा झाडांचे प्रमाण मुबलक होते तेव्हा हे वेगाने आदळणारे पावसाचे थेंब आधी झाडांची पाने झेलत. त्यांचा वेग तेथे कमी होऊन ते खाली जमिनीवर पडत असत. तेथे त्यांचा वेग शून्य होई, झाडाखालची माती, गवत यात ते जिरून जात. झाडांमुळे त्यांच्या भोवतालची माती मुळांभोवती पकड धरून असायची. जेव्हा पाऊस खूपच जास्त असे तेव्हाच फक्त तेथून ते खालच्या भागाकडे नदी किंवा प्रवाह बनून वाहत जात.
पण जंगले नष्ट होऊ लागली. पावसाचे पाणी झाडे नसलेल्या उघड्याबोडक्या जमिनीवर वेगाने कोसळू लागले. आता या पाण्याचा खालच्या भागाकडे वाहण्याचा वेग प्रचंड वाढला. हे पाणी नुसते वाहत नव्हते तर जाताना डोंगर उतारावरील माती आपल्यासोबत घेऊन जात होते. यामुळे आधीच उघड्या झालेल्या डोंगरांचे मातीचे, खडकांचे संरक्षक आवरण नष्ट होत होते. केवळ एक हेक्टर परिसरातली साठ ते सत्तर टन माती किंवा गाळ नद्या आपल्यासोबत वाहून नेत होत्या. यावरून नद्यांचा वेग आणि त्यामुळे होणारी जमिनीची धूप केवढी प्रचंड होती याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल.
१९७० मध्ये उत्तराखंडला अलकनंदेच्या पुराने जबर तडाखा हाणला. नदीचे पूर, दरडी कोसळणे, गाळ वाहून येणे, जमिनीची धूप होणे या गोष्टी तशा स्थानिकांना नवीन नव्हत्या. पण १९७० च्या पुराने या सगळ्या लोकांची भीतीने अक्षरशः पाचावर धारण बसली. या पुराचे रूप अत्यंत विनाशकारी आणि भयचकित करणारे होते. या पुराच्या राक्षसी प्रवाहात कित्येक पूल वाहून गेले, शेकडो बसेस वाहून गेल्या, शेकडो एकर शेतजमिनीतली पिके नष्ट झाली, शेतातील माती वाहून गेली, गुरेढोरे वाहून गेली, माणसे बेघर झाली. शेकडो लोकांचा मृत्यू झाला. ( अशाच प्रकारची दुर्घटना २०१३ मध्ये केदारनाथ परिसरात घडली. या परिसरातील गावे, घरे वाहून गेली. तर महाराष्ट्रातील माळीण गावातही २०१४ मध्ये अशी दुर्घटना घडली. यात दरड कोसळून त्याखाली संपूर्ण गाव गाडले गेले होते. ) यातूनच पुढे माणसे कशी एकत्र आली आणि या नैसर्गिक ( खरे तर मानवनिर्मित ) संकटाशी कशा प्रकारे लढा द्यायला त्यांनी सुरुवात केली हे पुढील भागात पाहू या. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१३/०९/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा