उगवतीचे रंग
एक लढा असाही - भाग चार
महिलांचा आंदोलनातील सहभाग - गौरा देवी
हिमालयातील जंगले जसजशी नष्ट होत गेली तसतशी तेथे राहणाऱ्या स्थानिक लोकांवर संकटे एकामागून एक येत राहिली. सुरुवातीला त्यांचा रोजगार आणि उपजीविकेची साधने हिरावून घेतली गेली. पुराच्या पाण्याने शेतीची वाताहत झाली. दरडी कोसळून गावांची, घरांची वाट लागली. गंगा, यमुनेसारख्या नद्या अंगावर खेळणाऱ्या हिमालयात तेथील जंगलात राहणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची देखील मारामार पडू लागली यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही पण हे वास्तव आहे. या सगळ्या परिस्थितीचे चटके जेवढे पुरुषांना बसले, त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त स्त्रियांना सोसावे लागले. कामाच्या शोधार्थ गावातील बरीचशी पुरुषमंडळी शहराकडे निघून गेली. कोणी सैन्यात भरती झाले. वर्षातून एकदा ही मंडळी गावाकडे येत. पण त्यांच्या अनुपस्थितीत स्त्रियांनाच तेथील सगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागे. मुलांचे लटांबर सांभाळत तुटपुंज्या शेतीवर राबावे लागे किंवा ठेकेदाराकडे मोलमजुरी करावी लागे. त्यातील बऱ्याचशा स्त्रिया तर कधी शाळेतही जाऊ शकल्या नव्हत्या. त्यांच्या मुलाबाळांना देखील त्या भागात शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती. अशा रीतीने शिक्षणाची प्रचंड आबाळ होत होती. पण जगता जगता आणि निसर्गाशी दोन हात करता करता आयुष्य नावाच्या शाळेत मिळणारी अनुभवाची शिदोरी या महिलांच्या गाठी जमा झाली होती.
अशाच प्रतिकूल परिस्थितीतून चिपको आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी काही महिला पुढे आल्या. त्यात गौरा देवी प्रमुख होती. गौरा देवीचा जन्म १९२५ मध्ये चमोली जिल्ह्यातील लाता गावात झाला. ती कशीबशी पाचवीपर्यंत शाळेत जाऊ शकली. ती ११ वर्षांची असतानाच तिच्या वडलांनी तिचे लग्न रैणी गावातील मेहेरबान सिंह यांच्याशी करून दिले पण पुढे दहा वर्षांनी तिच्या पतीचे निधन झाले. वयाच्या केवळ २२ व्या वर्षी गौरा देवी विधवा झाली. यावेळी तिचा एकुलता एक असलेला मुलगा केवळ अडीच वर्षांचा होता. त्या मुलाला सांभाळणे, सासू सासऱ्यांची सेवा करणे याशिवाय उपजीविकेसाठी शेतावर काबाडकष्ट करणे असा समस्यांना तिला तोंड द्यावे लागले.
१९७० मध्ये अलकनंदा नदीला पूर येऊन उत्तराखंडमध्ये प्रचंड नुकसान झाले. यावेळी चंडिप्रसाद भट, गोविंद सिंह रावत आदी मंडळींनी गावोगाव फिरून लोकांना पुराची कारणे सांगून पर्यावरण रक्षणासाठी चळवळीचे आवाहन केले. रैणी गावातही त्यांच्या सभा झाल्या. १९७४ मध्ये रैणी गावातील अडीच हजार देवदार वृक्षांची तोड करायचे नियोजन व्यापारी आणि ठेकेदारांनी केले होते. त्यासाठी जी झाडे तोडली जाणार होती, त्या झाडांवर खुणा ( मार्किंग ) करण्यात आल्या होत्या. यावेळी गौरा देवी तेथील महिला मंडळाची अध्यक्ष बनली होती. तिने गावात अनेक सभा घेऊन महिलांना जागृत केले.
गावातील पुरुष मंडळी देखील या चळवळीत सक्रिय होतीच पण याच सुमारास त्यांना त्यांच्या शेतीची भरपाई देण्यासाठी चमोलीला बोलावून घेण्यात आले. गावात आता केवळ स्त्रिया उपस्थित होत्या. याच परिस्थितीचा फायदा घेऊन ठेकेदारांनी झाडे तोडण्यासाठी मजुरांना आणले. गौरा देवीला हे कळताच गावातील स्त्रियांना तिने एकत्र केले. सगळ्यांनी मिळून जी झाडे तोडली जाणार होती, त्या झाडांना मिठी मारली. झाडे तोडण्याआधी आधी करवत आमच्या अंगावर चालवा, मगच झाडे तोडा असे आवाहन त्यांनी केले. झाडे वाचली. गौरा देवीने या आंदोलनाचे नेतृत्व केले त्यामुळे तिला चिपको आंदोलनाची जननी समजले जाते. तिच्या कार्याचा गौरव १९८६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते तिला प्रथम वृक्ष मित्र पुरस्कार प्रदान केला गेला. गौरा देवी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, ' हे जंगल आमची माता आहे. आमचं माहेर आहे. तेच आम्हाला फळे, फुले आणि उपजीविकेची साधने पुरवते. जर जंगल तोडाला तर पुरासारख्या आपत्ती येणारच. ' आज गौरा देवी हयात नाहीत पण तेथील गावागावात प्रत्येक महिलेच्या मनात आपल्या विचाराने गौरा देवी जिवंत आहे. या चळवळीत योगदान देणाऱ्या आणखी काही स्त्रियांबद्दल पुढील भागात माहिती घेऊ या. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१७/०९/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा