उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ८३
जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।
उमेसी अती आदरे गूण गातो ।
बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे ।
परी अंतरी नामविश्वास तेथे ।।८३।।
अर्थ
मदनाला म्हणजेच कामदेवाला ज्या भगवान शंकरांनी जाळून भस्म केले, ते शंकर स्वतः रामाचे ध्यान करतात. श्रीरामांचे गुण अत्यंत आदरपूर्वक पार्वतीला सांगतात. ज्यांच्या ठायी महान सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य हे गुण एकवटले आहेत, अशा भगवान शंकरांच्या अंतरंगात नामाबद्दलचा दृढ विश्वास वास करून आहे.
( ध्यातो - ध्यान करतो, उमा - पार्वती )
विवेचन
या श्लोकातही समर्थ रामनामाचे महत्व आपल्याला पटवून देत आहेत. रती आणि मदन ही जोडी म्हणजे कामभावनेच्या देवता मानल्या जातात. कामभावनेचे मानवी जीवनात काही एक महत्व जरूर आहे. परंतु जेव्हा ही कामभावना अतिरेकी रूप धारण करते, तेव्हा ती माणसाला विनाशाकडे नेते. रावणासारख्या पौराणिक व्यक्तिरेखा आणि नंतरच्या काळातही अगदी आजपर्यंत अतिरेकी कामवासनेने ज्यांचा विनाश घडवून आणला अशा अनेक व्यक्तींची नोंद इतिहासात आढळते. त्यातूनच युद्धे देखील उद्भवली आहेत. कामवासना जर ज्ञान, वैराग्य आणि कर्तव्याच्या आड येत असेल तर तिला जाळून भस्म करणेच योग्य ठरते. तेच भगवान शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून केले. तिसरा डोळा हा ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. त्याचा दुसरा अर्थ असा की ज्ञानाच्या साहाय्याने कामभावनेवर नियंत्रण मिळवावे.
भगवान शंकरांनी त्यांची तपस्या भंग करणाऱ्या कामदेवाला आपला तिसरा डोळा उघडून भस्म केले. एवढे सामर्थ्य असणारे भगवान शंकर पार्वती मातेला श्रीरामांचे गुणवर्णन करून सांगतात. भगवान शंकर म्हणजे सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य यांचे मूर्तिमंत प्रतीक ! माता पार्वती देखील काही कमी नाही. ती देखील ज्ञान, वैराग्य आणि साधना यांचे प्रतीक आहे. पण या दोघांमध्ये एक समानता आहे. दोघांच्याही अंतरात रामनामाबद्दल अतूट श्रद्धा आहे. एवढे प्रचंड सामर्थ्य ठायी असलेले भगवान शंकर आणि पार्वती जेथे प्रभू श्रीरामाचे ध्यान करतात तेव्हा रामनामाची महती सांगण्यासाठी आणखी कोणते उदाहरण द्यायला हवे ?
आपल्या मनातील कामवासना अनियंत्रित होत असेल, तर त्यावर नियंत्रण मिळवण्यास रामनाम हे अचूक आणि अमोघ अस्त्र आहे. परंतु अशा व्यक्तींनीच रामनाम घ्यावे असा याचा अर्थ नाही. ज्यांच्या ठायी ज्ञान, वैराग्य आणि शक्ती आहे अशा व्यक्ती देखील रामाचे ध्यान करतात. किंबहुना ज्ञान, वैराग्य आणि शक्ती प्राप्त होण्यासाठी रामनामासारखा दुसरा उपाय नाही असे देखील म्हणता येते. ज्ञान, वैराग्य आणि शक्ती यांचे अधिष्ठान रामनाम आहे. संत कबीर म्हणतात," कबिरा राम हृदय बसे, काम कहाँ घर होय ?" जिथे हृदयात रामाला स्थान दिले, तिथे कामासारख्या गोष्टींसाठी जागाच कुठे उरते ?
स्वसंवाद
१. भगवान शंकर आणि माता पार्वती अत्यंत आदराने रामगुणांचे गायन करतात तरी देखील रामनामाचे महत्व मला स्वतःला पटवून देण्यासाठी अन्य गोष्टींची आवश्यकता वाटते का ?
२. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य हे गुण माझ्याकडे नसले, तरी या तिन्ही गुणांचे अधिष्ठान असणारे 'रामनाम' घ्यावे असे मला वाटते का ?
३. माझ्या मनात जेव्हा एखादा वाईट विचार किंवा अनावर वासना डोके वर काढते, तेव्हा मी माझ्या 'ज्ञानाचा तिसरा डोळा' (विवेक) उघडून तिला भस्म करतो का ?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा