मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ९८

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ९८

हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।

बहु तारिले मानवदेहधारी ।

तया रामनामीं सदा जो विकल्पी ।

वदेना कदा जीव तो पापरूपी ।।९८।।

अर्थ : भगवंताच्या नामाने खरोखर पाषाणही तरले आहेत. रामनामाने अनेक माणसे तरून गेली आहेत. पण काही माणसांच्या मनात रामनामाबद्दल नेहमी विकल्प म्हणजे संशय असतो. असे जीव म्हणजे खरोखर पापी समजावे की ज्यांच्या मुखात रामनाम येत नाही. 

( नेमस्त - खरोखर, विकल्प -संशय/शंका, वदेना - बोलत नाही )

विवेचन 

रामनामाचे महत्व वर्णन करताना समर्थ म्हणतात की रामनामाने खरोखरीच पाषाण देखील तरले. पाषाण म्हणजे दगड. बुडणे हाच त्याचा धर्म आहे. जो त्याचा संग करील त्याला देखील तो घेऊन बुडतो. परंतु रामनामाची महती एवढी आहे की पाषाणाच्या या मूळ स्वभावात देखील अंतर्बाह्य बदल झाला. पाण्यात बुडणारा पाषाण चक्क रामनामामुळे पाण्यावर तरंगू लागला. या ठिकाणी रामायणातील सेतुबंधनाचा संदर्भ आहे. श्रीरामांना लंकेला जाण्यासाठी समुद्र उल्लंघून जायचे होते. पण जायचे कसे हा मोठा प्रश्न होता. अशा वेळी वानर सेनेतील नल, नील, जांबुवंत आणि हनुमान यांच्या साहाय्याने हा सेतू बांधण्यात आला. अर्थात यात प्रत्येकाचीच मदत झाली. अगदी खारीची देखील ! रामनाम लिहिलेले दगड सागरावर तरंगू लागले आणि पाहता पाहता चक्क समुद्रावर पूल तयार झाला. हा पूल पार करून रामाची सेना लंकेला पोचली. 

दगड हे रूपक आहे. या संसारसागरात ज्याने रामनामाचा आश्रय घेतला नाही असा मनुष्य देखील पाषाणासमानच आहे. पण जर तो रामनामाचा आश्रय घेईल तर या भवसागरातून तो निश्चितपणे तरून जाईल यात शंका नाही. 

परंतु एवढे उदाहरण डोळ्यासमोर असूनही माणसाच्या मनात रामनामाबद्दल शंका असतात. खरेच रामनामात एवढे सामर्थ्य आहे का ? नुसते रामनाम मला तारील का ? असा माणूस नाम घेण्याचे टाळतो. रामनामाचे विस्मरण होणे हे पाप आहे. पण माणसाची देहबुद्धी अत्यंत प्रबळ असते. बाह्य दृश्यात त्याचे मन रमलेले असते. त्याची दृष्टी अंतराकडे म्हणजे आतमध्ये वळत नाही. अंतरात्म्याला तो जाणून घेऊ इच्छित नाही. अशा माणसाला वेद, पुराणे, शास्त्रे किंवा संतांनी कितीही समजावून सांगितले तरी त्याची खात्री पटत नाही. अशा माणसांच्या मुखी भगवंताचे नाम येत नाही. भगवंताचे नाम मुखी यायला देखील भाग्य लागते. पूर्व जन्मीच्या पापामुळे अशा व्यक्तींना भगवंताचे नाम घेण्याची बुद्धी होत नाही. पण ज्यांना कळते आहे त्यांनी तरी रामनाम अवश्य घ्यावे. कोणाच्या सांगण्याची वाट पाहू नये. 

स्वसंवाद 

१. ज्याप्रमाणे रामनामाने समुद्रावरील जड पाषाणही तरंगले, त्याप्रमाणे माझ्या मनातील संसाराचे जड विचार आणि चिंता दूर करण्यासाठी मी रामनामाची नौका धरली आहे का? 

२. "नुसते नाम घेऊन काय होणार?" अशा कुठल्यातरी 'विकल्पाने' (संशयाने) माझे मन घेरलेले आहे का? हा संशय दूर करण्यासाठी मी कधी नाम घेऊन अनुभव पाहीला आहे का? 

३. सेतुबंधनातील खारीप्रमाणे, मी माझ्या आयुष्यात परमेश्वराच्या कार्यात किंवा सत्कर्मात माझा खारीचा वाटा उचलण्यास तयार असतो का?

 ४. माझी दृष्टी केवळ बाह्य दृश्य विश्वातील आकर्षणांमध्येच गुंतून पडली आहे, की मी माझ्या अंतरात्म्याला जाणून घेण्यासाठी कधी अंतर्मुख होतो? ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१५/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )







 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...