उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ९७
मुखी नाम नाही तया मुक्ती कैंची ।
अहंतागुणे यातना ते फुकाची ।
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा ।।९७।।
अर्थ : ज्याच्या मुखी भगवंताचे नाम येत नाही त्याला मुक्ती कशी मिळणार ? कर्तेपणाच्या अहंकारातून माणसाला विनाकारण यातना भोगाव्या लागतात. शेवटी मृत्यू येतो तो सुद्धा अत्यंत करुणाजनक. म्हणून सर्वानी भगवंताचे नाम घ्यायलाच हवे.
विवेचन
आयुष्यभर भगवंताचे नाम घ्यायचे नाही, भक्ती करायची नाही आणि अंतकाळी भगवंताने आपल्याला मुक्ती द्यावी अशी अपेक्षा करायची. पण काही केलेच नाही तर मुक्ती मिळेल कशी ? मुक्तीची अशी अपेक्षा करणे म्हणजे शेतात धान्य पेरण्याचे श्रम करायचे नाहीत आणि आयते धान्य किंवा पीक आपल्या घरात येईल अशी अपेक्षा करण्यासारखेच आहे. आपल्याला आपल्या कर्तेपणाचा भयंकर अभिमान असतो. मी हे केले, मी ते केले. माझ्यामुळेच सगळे होते आहे असा अभिमान मनुष्य बाळगतो. पण शेवटी एक दिवस हा कर्तेपणाचा फुगा फुटतो. वृद्धापकाळी मुले, सुना विचारत नाहीत तेव्हा मनात निराशा घर करते. मी आयुष्यभर एवढे कष्ट केले, मुलांना शिकवून मोठे केले, त्यांचे लग्न केले. पण एवढे असूनही ते माझ्याकडे लक्ष देत नाहीत. आपण दुर्लक्षित आहोत ही भावना सर्वात जास्त अस्वस्थ करणारी असते.
गोंदवलेकर महाराज म्हणतात, " देहाने कर्म करा, पण कर्तेपण स्वतःकडे घेऊ नका. कर्ता राम आहे असे म्हणा." आपले चुकते ते इथेच. आपण कर्तेपण रामाकडे देत नाही. म्हणून आपल्याला अपेक्षाभंगाचे दुःख भोगावे लागते. त्याशिवाय कर्तेपणाच्या धुंदीत भगवंताचे नाम घेतो कोण ? निदान निवृत्त झाल्यावर तरी भगवन्नामात रमण्याची सवय लावून घ्यावी. ही सवय लागली तर संसाराचा मोह हळूहळू कमी होतो, आसक्ती कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत मृत्यू आला तरी तो सुखाचा होतो.पण ही सवय नसेल तर मृत्यूप्रसंगी देखील संसारातील आसक्ती कमी होत नाही. जो मनुष्य नाम घेत नाही त्याचा अंत दीनवाणा होतो. म्हणून समर्थ म्हणतात प्रत्येकाने देवाचे नाव घ्यावेच घ्यावे. समर्थ आपल्या एका अभंगात म्हणतात, " काळ जातो क्षणक्षणा । मूळ येईल मरणा । काही धावाधाव करी । जंव तो काळ आहे दूरी ।।"
स्वसंवाद
१. माझ्या कुटुंबासाठी किंवा व्यवसायासाठी केलेल्या कष्टांमध्ये मी 'मी केले' हा कर्तेपणाचा अहंकार बाळगून विनाकारण मानसिक यातना तर ओढवून घेत नाहीये ना?
२. गोंदवलेकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, मी माझे कर्तव्य चोख पार पाडताना "या सगळ्याचा कर्ता-धर्ता तो प्रभू श्रीराम आहे" हा भाव मनात ठेवू शकतो का?
३. "मी मुलांसाठी एवढे केले तरी ते मला विचारत नाहीत" या विवंचनेत जगण्याऐवजी, मी आतापासूनच भगवंताच्या नामात रमून संसाराची आसक्ती कमी करण्याचा प्रयत्न करतोय का?
४. समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे जर काळ क्षणोक्षणी पुढे जात आहे आणि मृत्यू अटळ आहे, तर मग माझ्या उद्धारासाठी 'देवराणा' श्रीरामाचे नाव घेण्यास मी अजून उशीर का करत आहे ? ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१५/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा