उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १०७
मना कोप आरोपणा ते नसावी ।
मना बुधि हे साधुसंगी वसावी ।
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी ।
मना होई रे मोक्षमार्गी विभागी ।।१०७।।
अर्थ : हे मना, क्रोधाला आपल्यावर स्वार होऊ देऊ नकोस. आपल्या बुद्धीचा वापर साधुसंतांच्या सहवासात राहण्यासाठी कर. हे मना, दुष्ट किंवा वाईट लोकांच्या संगतीचा त्याग कर. ( आणि अशा रीतीने ) मोक्षमार्गाचा वाटेकरी हो.
( कोप - क्रोध/राग, आरोपणा - आरोहण करणे /स्वार होणे, नष्ट - दुष्ट /वाईट, चांडाळ - कर्माने किंवा वागणुकीने नीच मनुष्य, विभागी - वाटेकरी )
विवेचन
साधकासाठी अत्यंत महत्वाचा उपदेश समर्थांनी या श्लोकात केलेला आपल्याला आढळतो. व्यवहारात आणि परमार्थात क्रोध अपार हानी करतो. ज्याला आपल्या क्रोधावर ताबा ठेवता आला, त्याला आपल्या मनावर ताबा ठेवता आला असे म्हणायला हरकत नाही. व्यावहारिक जीवनात क्वचित प्रसंगी क्रोध येणेही जरूर असते. पण त्याला आपल्या डोक्यावर किती स्वार होऊ द्यायचे हे आपल्याला ठरवता आले पाहिजे. साधकाने तर क्रोधरहित व्हायला शिकले पाहिजे. कारण अति क्रोधामुळे सर्वनाश होऊ शकतो. क्रोधाचा भर ओसरल्यावर होणाऱ्या पश्चातापाचा मग काही उपयोग होत नाही.
त्यासाठी समर्थ म्हणतात की आपली बुद्धी साधुसंगी वसावी. म्हणजे संत किंवा सज्जन व्यक्तींच्या सहवासात आपण राहिले पाहिजे. आपण कोणाचा संग करतो त्यावरही आपले चारित्र्य अवलंबून असते. " Man is known by the company he keeps." अशी एक इंग्रजी म्हण आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात सज्जनांचा संग करा. सज्जनांच्या किंवा सद्गुरूंच्या सहवासात केवळ देहाने असता उपयोगी नाही. मनाने आणि बुद्धीने देखील त्यांच्या सोबत राहायला हवे. बऱ्याच वेळा थोर पुरुषांच्या सहवासात आलेले त्यांचे नातेवाईक किंवा अनुयायी त्यांची शिकवण न घेता, त्यांचा फायदा आपल्या प्रपंचासाठी करून घेतात. स्वामी समर्थांच्या चरित्रात त्यांचे भक्त म्हणवणाऱ्या अशा अनेक ढोंगी व्यक्तींची उदाहरणे आपल्याला वाचायला मिळतात. तेव्हा संतांच्या सहवासात मनाने आणि बुद्धीने त्यांचेच होऊन जावे.
मोरोपंत सुद्धा " सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो " असे म्हणतात. तर तुकाराम महाराजांनी " न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा," असे म्हटले आहे. थोडक्यात संतांचा सहवास हा परीस स्पर्श असतो. तो एकदा झाला की आपल्यातील अहंकार, कर्तेपणा, मी पणा गळून पडतो. क्रोधाची जी सामुग्री असते तीच त्यांच्या सहवासात नष्ट होते. प्रत्यक्ष संतांचा सहवास जरी नाही मिळाला तरी आजच्या काळात त्यांच्या ग्रंथांचे वाचन आणि त्यात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे मनापासून पालन करणे हा देखील संतांचा सहवासच आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा यासारख्या कुठल्यातरी एका ग्रंथाचे नियमितपणे वाचन करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांच्या सहवासात राहण्यासारखेच आहे असे म्हणता येईल.
दुष्ट किंवा वाईट व्यक्तींची संगत जाणीवपूर्वक सोडायला हवी. त्यांच्या सहवासात त्यांचे गुण आपल्यालाही लागण्याची शक्यता असते. वाईटाचे, खोट्या गोष्टींचे समर्थन करण्यात मग आपल्यालाही काही वावगे वाटत नाही. ज्यांचे कर्म अत्यंत दुष्टपणाचे असते, समाजाच्या दृष्टीने घातक असते, अशा व्यक्तींसाठी समर्थांनी ' चांडाळ ' असा शब्द वापरला आहे. ज्यांना मोक्षमार्गावर वाटचाल करायची आहे, त्यांनी तर अशा व्यक्तींचा सहवास कटाक्षाने टाळायला हवा. संतांच्या सहवासात वावरताना मनाने आणि बुद्धिनेही त्यांचे आचरण आत्मसात करून त्यांच्याशी एकरूप व्हावे. क्रोधाचा जाणीवपूर्वक त्याग करावा. अशा रीतीने आपण मोक्षमार्गाचे वाटेकरी व्हावे अशी समर्थांची इच्छा आहे.
स्वसंवाद
१. माझ्या मनात येणाऱ्या क्रोधाला (रागाला) मी माझ्या बुद्धीवर आणि नातेसंबंधांवर 'आरोपण' करू (स्वार होऊ) देतो का? राग शांत झाल्यावर मला पश्चात्ताप होतो का?
२. संतांच्या किंवा सज्जन विचारांच्या सहवासात असताना, मी केवळ माझ्या सांसारिक 'स्वार्थाचा' विचार करतो, की माझ्या अंतःकरणाचे शुद्धीकरण करण्यासाठी त्यांचे विचार बुद्धीने आत्मसात करतो?
३. मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे, "सुसंगती सदा घडो," हे माहीत असूनही मी माझ्या दैनंदिन व्यवहारात केवळ स्वार्थासाठी वाईट किंवा नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांची संगत बाळगतो का?
४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, संसाराच्या विवंचनेतून बाहेर पडून अंतरीची शांती मिळवण्यासाठी मी या 'मोक्षमार्गाचा' वाटेकरी (विभागी) होण्यास तयार आहे का? ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२३/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा