मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ९३

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ९३

जगी पाहता देव हा अन्नदाता । 

तया लागली तत्त्वता सार चिंता ।

तयाचे मुखी नाम घेता फुकाचे ।

मना सांग पा रे तुझे काय वेचें ।।९३।।

अर्थ : खरे पाहिले तर जगामध्ये परमेश्वर हा सर्वांचे भरणपोषण करणारा आहे असे दिसते. त्याला खरोखरच सर्वांची काळजी आहे. तेव्हा, हे मना, त्याचे फुकटचे नाम घेण्यासाठी तुला काही खर्च करावा लागतो का ? 

( तत्त्वता - वास्तविक पाहता, सार - सगळी, वेचे - खर्च होणे )

विवेचन 

या जगात आपण जन्माला आलो आहोत, तेव्हा आपल्या उदरनिर्वाहाची काळजी परमेश्वराला असतेच. कोणत्याही जीवाला जन्माला घालण्यापूर्वी त्याच्या जगण्याची व्यवस्था तो करतो. मूल जन्माला येण्यापूर्वी आईच्या स्तनात दूध निर्माण होते. मूल थोडे मोठे होईपर्यंत मग त्याला बाहेरचे काही द्यावे लागत नाही. आई त्याचं सर्व प्रकारचं भरणपोषण करते. जशी त्याची शारीरिक भूक ती भागवते, तसेच आईच्या सहवासात बाळाचे मानसिक आणि भावनिक देखील भरणपोषण होते. पुढे मग ती आपल्याजवळ उपलब्ध असणारे अन्न त्याला भरवते. जशी आई, तशीच परमेश्वर ही आपली माउली आहे. तिला आपली चिंता असतेच. आपल्याभोवती असणारा निसर्ग आपल्याला फळे, फुले देतो. शेतातील अन्न आपले भरणपोषण करते. ते पिकवण्यासाठी लागणारी बुद्धीदेखील आपल्याला त्यानेच दिली आहे.  आईप्रमाणेच निसर्ग सुद्धा आपल्याला मानसिक, भावनिकदृष्टया समृद्ध करीत असतो. निसर्गातील नदी, वृक्ष, समुद्र असा प्रत्येक घटक आपल्याला कसे वागावे याचा काही ना काही संदेश देत असतो. 

पण परमेश्वराने जरी व्यवस्था केलेली असली तरी कोणतेही अन्न आपल्याला जागेवर बसून मिळत नाही. ते मिळवण्यासाठी हालचाल, कष्ट करावेच लागतात. ही धडपड हेच त्याच्या जगण्याचे बळ आहे. या धडपडीतूनच सजीवाला जगण्याचे ध्येय आणि जीवन जगण्यासाठीची ऊर्जा प्राप्त होत असते. पण होते काय की इतर प्राणी सोडले तर या जगण्याच्या शर्यतीत मनुष्य कमालीचा स्वार्थी बनतो. तो आपल्या गरजेपुरते न घेता इतरांच्या वाट्याचेही ओरबाडून घेतो. निसर्गालाही ओरबाडतो. त्यामुळे परमेश्वराने निर्माण केलेल्या या सुंदर जगात कोणाजवळ संपत्तीचा प्रचंड साठा केंद्रित होतो, तर कोणाला दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडते. ही विषमता मानवनिर्मित आहे. सध्या जगात सुरु असलेली युद्धे याच संपत्तीच्या आणि सत्तेच्या हव्यासापायी होताना दिसत आहेत. 

या जगात आपण मोजू शकणार नाही इतके अगणित प्राणी आणि जीवजंतू आहेत. त्यांची जगण्याची व्यवस्था आपण करतो का ? तो परमेश्वरच त्यांना जन्माला घालतो, तोच त्यांचे भरणपोषण करतो. इतके असूनही माणसाला आपल्या कर्तृत्वाचा किती अहंकार असतो ! घरात एखादा कुटुंबप्रमुख एकटा कमावता असेल तर त्याला वाटते मी कमावतो म्हणून या सर्वांना बसून खायला मिळते. माझ्यामुळेच घर चालले आहे. आपण नोकरी करतो. जिथे काम करतो तो मालक किंवा ते व्यवस्थापन आपल्याला त्याबद्दल पगार देते. पण त्या मालकाला देखील देणारा कोणीतरी असतोच ना ! थोडक्यात म्हणजे मालकाचा देखील कोणीतरी मालक आहेच. त्या मालकाला तुम्ही आम्ही का ओळखत नाही ? हा मालक म्हणजे परमेश्वर. व्यापक अर्थाने तो सर्वांचे हित पाहणारा आहे. 

नवऱ्याने एखादा दागिना घेतला तर बायकोला कोण आनंद होतो ! ती मोठया कौतुकाने सगळ्यांना सांगत सुटते. आपल्या नवऱ्याची तारीफ करते. पण ज्या भगवंताने तो दागिना घालण्यासाठी तुला हे सुंदर शरीर दिले आहे, त्याची कधी आठवण येते ? त्याची तारीफ तू करतेस का ? म्हणूनच समर्थ म्हणतात की परमेश्वर जर सर्वांची काळजी घेतो, पालनपोषण करतो, तर त्याचे स्मरण आपण का करत नाही ? जेवल्यानंतर आपण ' अन्नदाता सुखी भव ' असे म्हणून जेवण देणाऱ्याला धन्यवाद देतो. मग खरा अन्नदाता तर तो आहे. त्याला देतो का आपण धन्यवाद ? त्याचे नाम घेण्यासाठी तर काही पैसे खर्चावे लागत नाहीत. ' कृतघ्नता ' हे सर्वात मोठे पाप आहे. अन्नदाता असणाऱ्या भगवंताबद्दल आपण कृतज्ञ राहून त्याचे नित्य स्मरण करायला हवे. त्यासाठी काही खर्च करावा लागतो का ? तुकाराम महाराजांचा अभंग फार सुंदर आहे. ते म्हणतात 

का रे नाठविसी कृपाळू देवासी । पोसतो जनासी एकला तो ।
बाळा दुधा कोण करितें उत्पत्ति । वाढवी श्री-पति सवें दोन्हीं ॥ 

फुटे तरुवर उष्ण-काळ-मासीं । जीवन तयांसी कोण घाली ।

तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहें त्या अनंता आठवूनी ।

तुका म्हणे ज्याचे नांव विश्वंभर । त्याचे निरंतर ध्यान करीं ॥

स्वसंवाद 

१. "माझ्यामुळेच माझे घर आणि कुटुंब चालले आहे" अशा कुठल्या खोट्या अहंकाराच्या ओझ्याखाली मी वावरत आहे का? 

२. रोज जेवताना 'अन्नदाता सुखी भव' म्हणताना, चराचरातील अनंत जीवांचे विनासायास पालनपोषण करणाऱ्या त्या खऱ्या 'विश्वंभराची' मला आठवण होते का?

 ३. ज्या भगवंताने मला हे सुंदर शरीर, बुद्धी आणि जगण्याची साधने दिली, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विनामूल्य असणारे नाम घेताना माझे काय 'वेचते' (खर्च होते)?

 ४. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे उन्हाळ्यात वाळलेल्या झाडांनाही पालवी फुटणारे पाणी देणारा तो 'अनंत' जर माझी काळजी वाहण्यास समर्थ आहे, तर मी संसाराची व्यर्थ चिंता का करत बसलो आहे? ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१३/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )





 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...