उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ९५
अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।
तया मुक्ति नारायणाचेनि नामे ।
शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।
मुखे बोलता ख्याति झाली पुराणी ।।९५।।
अर्थ : दुराचारी असलेल्या अजामेळाने अंतकाळी आपल्या नारायण पुत्राचे नाव घेतले. त्या मुलाचे सतत नाम घेतल्याने त्याला मुक्ती मिळाली. एका गणिकेने ' राम राम ' हे आपल्या पोपटाचे नाम सतत घेतल्याने तिचा देखील उद्धार झाला. आपल्या अंतकाळी भगवंताचे नाम घेणाऱ्या व्यक्तींच्या या कथा पुराणात प्रसिद्ध झाल्या.
( शुक - पोपट, कुंटणी - गणिका/वेश्या )
विवेचन
भगवंताच्या नामाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्थ या श्लोकात पुराणातील दोन वेगळी उदाहरणे आपल्या देतात. अजामेळ ब्राह्मणाची कथा भागवतात आली आहे. अजामेळ हा दुराचारी होता. आपल्या आयुष्यात त्याने कधी भगवंताचे नाम घेतले नाही. आपला अंतकाळ जेव्हा जवळ आला तेव्हा त्याला आपल्या लाडक्या नारायण या पुत्राची आठवण होऊन तो त्याच्या नावाचा जप करू लागला. तेव्हा विष्णुदूतांनी येऊन त्याला मुक्ती दिली अशी कथा आहे. दुसरी कथा आहे पिंगला या गणिकेची. तिने देखील आपल्या संपूर्ण आयुष्यात परमेश्वराची भक्ती केली नाही. परमेश्वराबद्दल तिला एक प्रकारचा तिरस्कार होता असे म्हटले तरी चालेल. त्याच भावनेतून तिने आपल्या आवडत्या पोपटाचे नाव 'राम ' असे ठेवले. अजाणतेपणी का होईना पण त्यानिमित्ताने ती रामनाम घेत गेली. त्यामुळे तिचा उद्धार झाला.
तर्कशास्त्राच्या कसोटीवर या कथा आजच्या काळात टिकणाऱ्या नाहीत. नास्तिक आणि बुद्धिवादी लोक तर या पुराणातील भाकडकथा आहेत म्हणून सहज उडवून लावतील. पण समर्थांच्या काळात या कथा प्रचलित होत्या. लोकांनी परमेश्वराचे नाम कोणत्याही प्रकारे का होईना पण घ्यावे आणि त्यांना रामनामाचे महत्व पटावे एवढाच समर्थांचा या कथा सांगण्यामागील उद्देश असावा. आपणही तो उद्देश लक्षात घेऊ या. आपल्यासाठी त्या कथांपेक्षा समर्थांचा संदेश महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे आपण धान्य निवडताना आपण फोलपट टाकून देऊन सार आपल्याकडे ठेवतो त्याप्रमाणे बाकी निरुपयोगी फोलपट टाकून सार तेवढे ग्रहण करू या. रामनाम हेच सार आहे. सुज्ञास अधिक सांगणे नलगे.
१. पुराणातील कथांमधील चमत्कारिक गोष्टींवर तर्क लढवत बसण्यापेक्षा, त्यामागे संतांनी दिलेला 'नामस्मरणाचा' मूळ संदेश (सार) मी स्वीकारू शकतो का?
२. "अजाणतेपणी किंवा मुलाच्या ओढीने घेतलेले नाम जर अजामेळाला तारू शकते," तर मग मी जाणीवपूर्वक आणि मनापासून नाम घेतले तर माझ्या आयुष्यात किती सकारात्मक बदल घडू शकेल?
३. संसाराच्या वेगवेगळ्या विवंचनेत अडकलेला असतानाही, मी माझ्या रोजच्या बोलण्यात किंवा व्यवहारात भगवंताच्या नामाचे अधिष्ठान ठेवतो का?
४. संतांनी सांगितल्याप्रमाणे, "रामनाम हेच अंतिम सार आहे" हे स्वीकारून मी मनातील निरर्थक शंकांचे 'फोलपट' टाकून द्यायला तयार आहे का? ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१३/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा