उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ९२
अती आदरे सर्व ही नामघोषे ।
गिरीकंदरे जाइजे दुरि दोषे ।
हरी तिष्ठतु तोषला नामतोषे ।
विशेषे हरा मानसी रामपीसे ।। ९२ ।।
अर्थ : भगवंताच्या नामाबद्दल अत्यंत आदर बाळगून जो कोणी त्याचे नामस्मरण करतो, त्याचे सर्व दोष दूर गिरिकंदरी म्हणजे लांब निघून जातात. ज्या ठिकाणी आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक भगवंतांचे नामस्मरण सुरु असते, तिथे भगवंत अत्यंत संतुष्ट होऊन वास्तव्य करीत असतो. भगवान शंकरांना रामनामाचे विशेष वेड लागले आहे (आणि ते सतत त्याचे नामस्मरण करीत असतात )
गिरिकंदरी - पर्वतांमधील गुहेत, तिष्ठतु - थांबून राहतो, तोषणे - संतोष/आनंद होणे, पिसे - वेड )
विवेचन
भगवंताचे नाम सर्व दोष हरण करणारे आहे. म्हणून भगवंताच्या नामाचे माहात्म्य स्पष्ट करताना समर्थ म्हणतात की जो कोणी भगवंताचे आदरपूर्वक नामस्मरण करतो त्याचे दोष दूर म्हणजे गिरिकंदरी निघून जातात. आधीच्या श्लोकात आपण पाहिले की समर्थ भोजन प्रसंगी आपल्याला भगवंताचे नाम मोठ्याने गजर करून आदरपूर्वक म्हणायला सांगतात. या श्लोकात ते भगवंताचे नाम आपल्याला मोठ्याने उच्चारून म्हणायला सांगतात. मोठ्याने म्हणणे म्हणजे वैखरीने म्हणणे. आधी सुरुवात वैखरीपासून करावी लागते. मग ते नाम क्रमाक्रमाने मध्यमा, पश्यन्ती या वाणींच्या प्रकारांमार्फत परा वाणीपर्यंत पोहोचते. बऱ्याच वेळा मनातल्या मनात नामजप सुरु असतो. पण त्यावेळी मन दुसरीकडे कुठेतरी असते. म्हणजे मानसिक जपात यांत्रिकता येण्याचा संभव असतो. मुखाने हे नाम उच्चारले तर आपले लक्ष त्या नामाकडे राहते. आपल्या भोवती असणाऱ्या इतर लोकांच्या कानावरही हे नाम आपोआप पडते.
भगवंताचे नाम घेण्यासाठी दूर कुठे गिरिकंदरात जावे लागत नाही. आपण त्याचे नाम घेऊ लागलो की आपल्यातील दोषच दूर गिरिकंदरात निघून जातात. जिथे नाम आहे तिथे दोष राहणे शक्य नाही. जिथे उजेड आहे, तिथे अंधार कसा राहील ? तुकाराम महाराज सुद्धा नामाचे महत्व सांगताना म्हणतात
न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥
ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वदा ॥
स्वये ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥
१. मी माझे दोष दूर करण्यासाठी किंवा शांती मिळवण्यासाठी बाह्य साधनांमागे धावतो आहे, की माझ्याच अंतरी रामनामाचा उजेड पाडून अंधार दूर करण्याचा प्रयत्न करतोय ?
२. मनातल्या मनात नाम घेताना माझे मन संसाराच्या चिंतेत 'यांत्रिकपणे' भटकत राहते का ? माझ्या नामात आदर आणि एकाग्रता आणण्यासाठी मी काय करायला हवे ?
३. गोंदवलेकर महाराजांच्या वचनानुसार, "जेथे नाम तेथे माझे प्राण" यावर माझा विश्वास आहे का?
४. भूपाळीत म्हटल्याप्रमाणे जर प्रत्यक्ष चंद्रमौळी शिवशंकर शैलबाळीसमवेत उठोनिया प्रातःकाळी रामनाम जपत असतील, तर मग माझ्या दिवसाची सुरुवात मी रामनामाने करतो का ?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
११/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा