मुख्य सामग्रीवर वगळा

उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास - भाग दोन

उगवतीचे रंग 

उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास - भाग दोन 

निसर्ग हा माझा आवडता विषय. निसर्ग कोणाला आवडत नाही ? प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. म्हणून वेळ मिळेल तेव्हा निसर्गाच्या सहवासात आपण जात असतो. जोडून सुट्या आल्या की एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आपण जातो. कोणी गिर्यारोहण करतं, कोणी ट्रेकिंग, कोणी किल्ल्यांची भ्रमंती तर कोणी वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देतं . या सगळ्यातून निसर्गच नानाविध रूपांनी आपल्यासमोर येत असतो. यापूर्वी अनेकदा मी वेगवेगळ्या कारणाने आणि वेगवेगळ्या लेखातून निसर्गाबद्दलची माझी आवड व्यक्त केली आहेच. या सहलीत तर निसर्गाचा अगदी जवळून सहवास मला लाभला. एखादा जिवलग मित्र खूप दिवसांनी भेटावा आणि मग त्याबद्दलचा आनंद कसा व्यक्त करावा असा प्रश्न पडतो. तसेच काहीसे माझेही झाले. माझ्या निसर्गमित्राला मी डोळे भरून हृदयात साठवून घेत होतो. 

आधीच्या लेखात भीमतालच्या अप्रतिम सौंदर्याचे वर्णन मी केले आहे. ताल म्हणजे तलाव किंवा सरोवर. महाभारतातील भीमाच्या नावावरून या तळ्याला भीमताल असं नाव मिळालं आहे. पांडव वनवासात असताना त्यांना कोठे पाण्याचा स्रोत आढळत नव्हता. सगळे तहानलेले होते. अशा वेळी भीमाने आपल्या गदेचा प्रहार या भूमीवर केला. मोठा खड्डा निर्माण होऊन या ठिकाणी पाणी उत्पन्न झाले. म्हणूनच हा भीमताल ! भीमताल हे ठिकाण नैनितालपेक्षाही प्राचीन मानले जाते. या परिसरातील हा सगळ्यात मोठा जलाशय. सकाळी लवकर उठलो. साडेपाचलाच छान उजाडलं होतं. सूर्यदेव आपल्या रथावर स्वार होऊन अवघ्या परिसराला आपल्या सहस्त्र किरणांनी सुवर्णस्नान घालीत होते. उगवतीच्या रंगांनी साऱ्या दिशा उजळल्या होत्या. भीमतालचा परिसर आणि अवघी सृष्टी जागी झाली होती. विविध रंगी फुले फुलली होती. पक्षी गाऊन आपला आनंद व्यक्त करीत होते. इथं शहरातील गर्दी नाही, हॉर्नचे आवाज नाहीत. इथे निसर्गच तुमच्याशी संवाद साधतो. तुम्ही मात्र त्यासाठी तयार असायला हवं. एकदा इथं आलं की इथून निघण्याची इच्छाच होऊ नये असं हे ठिकाण ! नैनिताल तर प्रसिद्धच आहे. पण त्यापेक्षा कमी गर्दीचं हे ठिकाण. इथे खाण्यापिण्याचेही भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. भीमतालच्या तलावात आपल्याला जलविहार करता येतो. आपल्याकडे वेळ असेल तर  इथून जवळच असलेल्या नौकुचियाताल, विक्टोरिया बांध, आणि भीमेश्वर महादेव मंदिर आदी ठिकाणांना आपण भेट देऊ शकतो. 

इथल्या हॉटेलमध्ये आमचा भरपेट नाश्ता झाला. भरपेट म्हणण्याचे कारण म्हणजे येथे नाश्त्यासाठी देखील विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. फळे, फळांचे ज्यूस, पोहे, उपमा, इडली सांबार, वडा सांबार, ब्रेड, चहा कॉफी. ज्याला जे आणि जेवढे हवे ते घ्या. प्रत्येक पदार्थाची नुसती चव घ्यायचे म्हटले तरी पोट भरून जाते. आता आमची बस नैनितालला जाण्यासाठी सज्ज होती. नाश्ता झाल्यावर सगळेजण आपापल्या जागी बसमध्ये जाऊन बसले. आता निसर्गरम्य डोंगर रांगातून आमची बस वाटचाल करीत होती. रस्ते चांगले पण अरुंद होते. सुट्यांमुळे पर्यटकांची गर्दी झालेली दिसत होती. 

नैनिताल इथे जाताना वाटेत कैंची धाम म्हणून एक ठिकाण आहे. या ठिकाणी संत निम करोली बाबा यांचा आश्रम आहे. नीम करोली बाबा २० व्या शतकातील एक महान संत होऊन गेले. त्यांचे वागणे बोलणे अतिशय साधे होते. उत्तर प्रदेशातील नीम करोली या गावी त्यांनी तपश्चर्या केली. म्हणून त्यांना नीम करोली बाबा या नावाने ओळखले जाते. त्यांना कंबलीवाले बाबा म्हणूनही ओळखले जाते कारण त्यांच्या अंगावर कायम पांढऱ्या रंगाची घोंगडी असे. ते हनुमंताचे परमभक्त होते. लोक त्यांना हनुमानाचा अवतार म्हणूनच ओळखत. ते लोकांना रामनामाचा उपदेश देत असत. ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी देखील त्यांचे अध्यात्मिक मार्गदर्शन घेतले होते असे सांगितले जाते. कैंची धामला दरवर्षी बाबांचे लाखो भक्त भेट देतात. आश्रमात श्रीराम आणि हनुमानजी यांच्या सुंदर मूर्ती आहेत. बाबांबद्दल अनेक चमत्कारिक आणि अद्भुत कथा सांगितल्या जातात.  या ठिकाणी थांबून आम्ही दर्शन घेतले. हजारो भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. 

तेथील दर्शन आटोपून आम्ही नैनितालच्या दिशेने निघालो. तिथे थेटपर्यंत बस जात नाही. त्यामुळे साधारण तीन किमी अलिकडे बस उभी करून स्थानिक जीपच्या साहाय्याने तिथे जावे लागते. एका जीपमध्ये साधारण सहा माणसे बसतात. केवळ पंधरा मिनिटांचा प्रवास करून आम्ही नैनिताल शहरात प्रवेश केला. 

पौराणिक कथेनुसार भगवान शंकर सतीचे म्हणजे पार्वती मातेचे शव कैलासावर घेऊन जात असताना तिचे काही अवयव विविध ठिकाणी पडले. त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे निर्माण झाली. सतीचे डोळे या ठिकाणी पडले म्हणून या ठिकाणी नैना देवीचं मंदिर निर्माण झालं. भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी हे एक आहे. भाविकांसाठी हे एक पवित्र आणि जागृत ठिकाण आहे. नयना देवीचे मंदिर असल्याने या ठिकाणाला नैनिताल असं म्हटलं जातं. येथील तळ्याला नैनी असं म्हटलं जातं. अतिशय सुंदर आणि विशाल असा हा तलाव आहे. याच्या जवळपास इतरही अनेक तलाव आहेत. पण याचे सौंदर्य आपल्याला आकर्षित करते. म्हणूनच कदाचित ' तालोमें ताल नैनिताल ' असे म्हटले जात असावे. या ठिकाणी पर्यटक बोटिंगचा आनंद घेतात. या तलावाच्या उत्तर दिशेला नैना देवीचं सुंदर मंदिर आहे. इथे उंच असं हिमालयातील नैनी शिखर आहे. मल्लीताल इथून या ठिकाणी जाण्यासाठी रोपवेची सोय आहे. रोपवेतून आपण निसर्गाचा आनंद घेत या पर्वतशिखरावर पोहोचतो. इथे फिरण्यासाठी साधारण एक तास दिला जातो. आपल्याला परत रोपवेने खाली यावे लागते. 

इथं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे पाळण्याचा किंवा मेरी गो राउंड सारख्या चक्राचा. त्यासाठी वेगळे पैसे भरून आपल्याला त्याचा आनंद घेता येतो. एका खांबाभोवती एक विशाल चक्र आहे. त्यात उभे राहायचे. हे चक्र हळूहळू आकाशाच्या दिशेने वर जाते. अनेक फूट उंचावर जाताना एक वेगळाच थरार अनुभवास येतो. वर जाताना अप्रतिम निसर्ग तर दिसतोच पण वर गेल्यानंतर आणखी एक जादू घडते. हे चक्र हळूहळू ३६० अंशात फिरते. आजूबाजूचा सगळा परिसर आपल्या दृष्टीपथात येतो. जणू बर्ड आय व्ह्यू आपल्याला प्राप्त होतो. आम्ही हाही आनंद घेतला. इथून हिमालयाच्या रांगा, शहरातील वस्ती, तळे, तळ्यातील बोटिंग या साऱ्या गोष्टी दिसत होत्या. या ठिकाणी लंडन आय व्हीलची आठवण झाली. लंडन आय मधूनही असेच सुंदर दृश्य दिसते. 

उन्हाळ्यात इथलं वातावरण आल्हाददायक असतं. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करतात. इथे देखील खाण्यापिण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. इथला मॉल रोड शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे. तसेच टिफिन पॉईंट, चायना पॉईंट, स्नो व्ह्यू पॉईंट यासारखी अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. आपल्याला वेळ असेल तर ही ठिकाणे पाहता येतात. नैना लेकमध्ये जलविहाराचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या भीमताल या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो.( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

९/५/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...