मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ४१

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ४१

बहु हिंडता सौख्य होणार नाही |

सीणावे परि नातुडे हीत काही |

विचारे मना अंतरा बोधवीजे|

मना सज्जना राघवी वस्ती कीजे|४१|

अर्थ: समाधान किंवा आनंद प्राप्त व्हावा म्हणून खूप हिंडले किंवा फिरले तरी समाधान होणार नाही. त्याने नाहक श्रम मात्र होतील पण हाती काही लागणार नाही. म्हणून हे मना, तू नीट विचार करून स्वतःची समजूत घाल आणि भगवंतापाशीच कायमचा आश्रय घे.

( नातुडे - साध्य होत नाही/ हाती लागत नाही, अंतरा - अंतर्मन )

विवेचन 

हा अतिशय अर्थगर्भ असा श्लोक आहे. "बहु हिंडता सौख्य होणार नाही "या ओळीचे तीन प्रकारचे अर्थ घेता येतात. आपल्या जीवनात आनंद मिळावा, समाधान प्राप्त व्हावे म्हणून आपण वणवण हिंडत असतो. व्यंकटेश स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे "अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा." आपल्या उपजीविकेसाठी सुद्धा आपण आयुष्यभर वणवण करत असतो. उपजीविकेसाठी, पोटासाठी धावपळ करणे हे समजू शकते. हा पहिला अर्थ घेता येईल. 

दुसरा अर्थ असा सांगता येतो की परमार्थात सुद्धा माणसे खूप भटकत असतात पण त्यांच्या हाती फारसे काही लागत नाही. मन:शांती नाही, अनेक गोष्टी मनासारख्या घडत नाही म्हणून लोक बाबा, बुवांकडे हिंडत असतात. देवालये, नाना प्रकारची तीर्थक्षेत्रे, तीर्थयात्रा माणूस आयुष्यभर करत राहतो. पण तीर्थक्षेत्री जाऊन सुद्धा तो कोरडाच राहतो. या ठिकाणी एक पौराणिक कथा आठवते.

 महाभारतातील युद्ध नुकतेच संपलेले असते. युद्ध संपले असले तरी भीम, अर्जुन आपण युद्धात कसा पराक्रम केला त्याच्याच गोष्टी करीत असतात.  हे सगळे ऐकताना श्रीकृष्ण तेथे उपस्थित असतो आणि त्याला हे सगळे ऐकताना गालातल्या गालात हसू येते. युद्धात झालेल्या नरसंहारामुळे धर्मराज युधिष्ठिर अस्वस्थ झालेला असतो. त्याच्या मनात मनःशांतीसाठी तीर्थयात्रेला जायचे असते. तो तीर्थयात्रेचा विषय काढताच भीम आणि अर्जुनही तीर्थयात्रेला जाण्यासाठी तयार होतात. नकुल सहदेव तर तयारच असतात. कृष्ण त्यांना म्हणतो," माझे एक काम करा. मी तुम्हाला एक लिंबाची काडी देतो. तुम्ही ज्या ज्या तीर्थक्षेत्री जाल, त्या त्या ठिकाणी त्या काडीलाही तुमच्याबरोबरच स्नान घाला आणि लवकरात लवकर परत या. "

पांडव मग हरिद्वार, ऋषिकेश इ ठिकाणी तीर्थयात्रा करून परत येतात.  कृष्ण मग भीमाला म्हणतो की मी तुला ती लिंबाची काडी दिली होती, ती परत आणलीस का, तिला स्नान घालत होतात ना ? मग भीम ती काडी घेऊन येतो. कृष्ण त्याला म्हणतो, ' आता या काडीला तुम्ही सगळ्या तीर्थक्षेत्री स्नान घातल्यामुळे ती पवित्र आणि गोड झाली असेल. तेव्हा तू ती खाऊन टाक . ' त्यावर भीम म्हणतो, ' केशवा, आमची चेष्टा करतोस का ? कितीही स्नान घातले तरी लिंबाची काडी गोड कशी होईल ? ' 

तेव्हा कृष्ण ते निमित्त करून त्यांना समजावून सांगतो की आपल्या मनाचेही तसेच आहे. नुसती तीर्थयात्रा केल्याने आपण पवित्र आणि मन शांत होत नाही. त्या ठिकाणी शरीरशुद्धी बरोबरच  मनातील पापे, वाईट वासना सुद्धा नष्ट झाल्या पाहिजेत. आपले मन जर पवित्र आणि शुद्ध असेल तर तीर्थाला जाण्याची सुद्धा गरज नाही. समर्थ आपल्याला या श्लोकात हीच गोष्ट समजावून सांगतात.

तिसरा अर्थ सर्वात महत्त्वाचा वाटतो. तो हा की हिंडत राहणे म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून हिंडत राहणे. विषयवासनांमुळे पुन्हा पुन्हा जन्म घेणे, मृत्यू पावणे आणि पुन्हा जन्म घेणे हे चक्र सुरू राहते. यालाच समर्थ बहु हिंडता सौख्य होणार नाही असे म्हणतात. कारण यातून कोणतेही हीत साध्य होत नाही. अनेक जन्म घेऊनही मुक्ती मिळणार नाही, ईश्वर प्राप्ती होणार नाही. जीवात्मा मात्र जन्ममृत्यूच्या या चक्रात भरडून निघतो.

मग अंतिम समाधान किंवा सौख्य कुठे मिळेल ? तर ते एका परमेश्वराच्याच ठायी आहे. आपण विचार करून आपल्या मनाला या गोष्टीचा बोध करून दिला पाहिजे. आणि त्या राघवाच्या ठिकाणीच आपले मन कायम स्वरूपी एकाग्र केले पाहिजे. "सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर.."असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते यासाठीच !

स्वसंवाद 
१) मी आयुष्यात कशासाठी सर्वाधिक वणवण केली ? पैशासाठी, यशासाठी की मनःशांतीसाठी ? त्यातून खरे समाधान मिळाले का ?
२) लिंबाची काडी स्नानाने गोड होत नाही. माझ्या बाह्य धार्मिक कृतींमागे अंतर्मनाची शुद्धी आहे का ?
३) तीर्थयात्रा, उपवास, पूजापाठ या गोष्टी मी करतो. परंतु माझ्या मनातील वाईट विचार, राग, मत्सर कमी झाले आहेत का ?
४) जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती हे आपले अंतिम ध्येय आहे.माझ्या दैनंदिन जगण्यात या ध्येयाची जाणीव मला असते का ?
(क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३/४/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...