मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ४७

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ४७

मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे|

जनी जाणता भक्त होऊनि राहे|

गुणीं प्रीति राखे क्रमूं साधनाचा |

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |४७|

अर्थ : ज्या साधकाला आपल्या देहाच्या आत आणि बाहेर एकमात्र भगवंतच दिसतो, जो जाणता म्हणजे ज्ञानी भक्त म्हणून जगात वावरतो, जो सगुणाचे प्रेम टिकवतो आणि साधनेचा क्रम कायम राखतो असा भक्त म्हणजे सर्वोत्तमाचा (भगवंताचा )दास हा खरोखरीच जगात धन्य होय.

विवेचन 

या ४७ व्या श्लोकापासून ते ५६ व्या श्लोकापर्यंत जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे अंतिम चरण आहे. यात समर्थ ज्ञानी साधकाचे किंवा भक्ताचे गुण सांगतात.

या श्लोकाच्या पहिल्या ओळीत समर्थ म्हणतात," मनी लोचनी श्रीहरी तो चि पाहे" यामध्ये जो परमेश्वराचा भक्त असतो तो मनात आणि लोचनात म्हणजे डोळ्यांमध्ये परमेश्वराचे रूप पाहतो. इथे दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात. मनामध्ये त्याचे निर्गुण रूप असते आणि नेत्रांना म्हणजेच बाह्य जगतात त्याचे दृश्य रूप किंवा सगुण रूपाचे दर्शन होते. तात्पर्य म्हणजे आत बाहेर सर्वत्र त्याला परमेश्वराचेच दर्शन होत असते. भक्त हा शब्द जर आपण पाहिला तर जो परमेश्वराशी जोडलेला आहे तो भक्त. विभक्त म्हणजे वेगळा. जो परमेश्वराशी जोडलेला नसतो तो भक्त कसा असेल ?

खऱ्या भक्ताला देव सर्वत्र दिसतो. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी. प्राणीमात्रात सर्वत्र तोच भरलेला आहे. त्याची दृष्टी सम होते. मग भेद राहत नाही. जो आपल्या अंतरात आहे तोच बाहेर देखील आहे हे त्याला लक्षात येते. मग द्वैत राहत नाही. तो अद्वैताचाच एक भाग होतो. तो परमेश्वराशी तदाकार होतो. परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे हे त्याला सांगण्याची आवश्यकता राहत नाही. तरी देखील जेव्हा कधी तो सगुण मूर्तीचे दर्शन घेतो, तेव्हा देखील तो परमेश्वराच्या दर्शनाने भाव विभोर होतो. त्याचे नेत्र पाणावतात. 

समर्थांनी "मनी लोचनी तो चि पाहे" असे जे म्हटले आहे, त्यातील "चि "म्हणजेच तोच परमेश्वर त्याला सर्वत्र दिसतो. जसा तो भक्त प्रल्हादाला दिसत होता. आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीला निर्जीव दिसणाऱ्या खांबामध्येही प्रल्हादाला परमेश्वराचे अस्तित्व दिसत होते. 

खऱ्या भक्ताच्या डोळ्यासमोर परमेश्वराची सगुण मूर्ती नसली तरी काही बिघडत नाही. त्याच्या अंतर्यामी ती मूर्ती ठसलेली असते. सगुण निर्गुणाने त्याला काही फरक पडत नाही. "सगुण निर्गुण एकू गोविंदु रे ". अशी त्याची अवस्था असते. त्याला परमेश्वराचे अस्तित्व सर्वत्र जाणवते. अशा भक्ताला समर्थ ज्ञानी भक्त म्हणतात. भक्तीतून ज्ञान होते पण ज्ञान झाल्यानंतरही भक्ती संपत नाही. असा भक्त हा ज्ञानी भक्त असतो.

पण ज्ञानी भक्त म्हणजे भोळा भक्त नव्हे. हा फरक आपण समजून घ्यायला हवा. आपला असा सोयीस्कर समज असतो की भक्त हा भोळा असतो, त्याला व्यवहार कळत नाही. काही लोक अशा लोकांना मूर्ख किंवा बावळट देखील समजतात. परंतु ज्ञानी भक्ताचे असे वागणे समर्थांना अपेक्षित नाही. त्यांच्या दृष्टीने चातुर्य अखंड सावधानता हे मोठे गुण आहेत. त्यांना अपेक्षित असलेला ज्ञानी भक्त व्यवहारात देखील चातुर्याने वागतो. तो लबाडी करत नाही, तो स्वार्थी नसतो परंतु लोकांकडून फसवला जाईल एवढाही भोळा नसतो.

तिसऱ्या ओळीचा अर्थ पाहूया. तिसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात गुणी प्रीती राखे क्रमूं साधनाचा." ही खऱ्या भक्ताची लक्षणे आहेत. परमेश्वराचे जे गुण आहेत की तो सर्वव्यापी आहे, शरणागताला आश्रय देणारा आहे, यासारख्या त्याच्या अनेक गुणां प्रति भक्ताची प्रीती म्हणजे प्रेम असते. परमेश्वराच्या गुणांवरच ज्याची प्रीती नाही, तो परमेश्वरावर प्रेम कसे काय करू शकेल ? असा भक्त साधनेचा क्रम देखील पाळत असतो म्हणजे जिवापाड जपत असतो. साधनेचा क्रम याचा अर्थ भक्त हा पायरीपायरीने परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतो ते. उदा. परमेश्वराच्या नामाचे स्मरण, मनन, सदैव त्याचे चिंतन आणि मग पुढे त्याच्याशीच तो एकरूप होऊन जातो. या सगळ्या विविध पायऱ्या आहेत. या ओळीतील राखे हा शब्द गुणांबद्दल प्रीती राखणे आणि साधनेचा क्रम राखणे या दोन्हींसाठी लागू पडतो.

चौथ्या ओळीत समर्थ अशा भक्ताबद्दल म्हणतात," जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा." सर्वोत्तम म्हणजे सर्वात उत्तम !कोण बरं असेल मग ? तर एक परमेश्वरच सर्वोत्तम आहे आणि अशा या सर्वोत्तमाचा दास होण्यामध्ये जी धन्यता आहे ती अन्य कशातच नाही. म्हणून अशा सर्वोत्तम असलेल्या परमेश्वराचा भक्त खरोखरच धन्य असतो. तसाच भक्त होण्याचा प्रयत्न आपणही करावा हेच समर्थांचे सांगणे आहे.

स्वसंवाद 

१) माझ्या दृष्टीत "समदृष्टी" आहे का ? माझ्या भोवतालच्या माणसांमध्ये, निसर्गात मला परमेश्वर दिसतो का ?

२) मी "ज्ञानी भक्त" आहे की "भोळा भक्त" ? व्यवहारात चातुर्य राखून भक्ती करण्याचा माझा प्रयत्न आहे का ?

३) माझ्या साधनेचा "क्रम" आहे का ? नामस्मरण, मनन, चिंतन या पायऱ्या मी नियमितपणे पाळतो का ? (क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

८/४/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...