उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ४२
बहुतांपरी हेचि आता धरावे |
रघुनायका आपुलेसे करावे|
दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे|
मना सज्जना राघवी वस्ती कीजे|४२|
अर्थ: हे मना, तुला वेगवेगळ्या प्रकारे सांगून झाले. आता ही एकच गोष्ट लक्षात ठेव की रघुनायकाला म्हणजे रामाला तू आपलेसे कर. तो अनाथांचा नाथ आहे असा त्याचा लौकिक सर्वत्र गाजतो आहे. तेव्हा तू मनाने भगवंतपाशीच कायमचा निवास कर.
( बहुतांपरी - वेगवेगळ्या प्रकारे, धरावे - लक्षात ठेव, तोडर - पायातील किंवा हातातील एक अलंकार/तोडा/तोरड्या )
विवेचन
सगळ्या गोष्टींचा ( आपल्या कर्तव्याचा किंवा स्वधर्माचा नव्हे ) म्हणजे माया, मोह इत्यादींचा त्याग करून भगवंताला शरण जावे हे वेगवेगळ्या प्रकारे सांगून झाले असे समर्थ आपल्याला सांगतात. इथे बहुतांपरी या शब्दाचे दोन अर्थ घेता येतात. पहिला अर्थ म्हणजे नाना परीने, निरनिराळ्या प्रकारे. जी लहान मुले ऐकत नाहीत त्यांना आपण निरनिराळ्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तसेच समर्थ देखील आपल्याला हे वेगवेगळ्या शब्दात समजावून सांगतात. चांगल्या गोष्टी या परोपरीने पुन्हा पुन्हा सांगून मनावर ठसवाव्या लागतात. तसेच समर्थ या ठिकाणी करतात परंतु अशा गोष्टींनाही एक मर्यादा असते. म्हणून ते निर्वाणीचे सांगतात की आता तू रघुनायकाला म्हणजे भगवंताला आपलेसे कर.
बहुतांपरी या शब्दाचा दुसराही अर्थ असा घेता येतो की परमेश्वराचे जे अनेक भक्त झाले, त्यांच्याप्रमाणे तू वाग आणि परमेश्वराला आपलेसे करून घे. रामायणातील कैकयी, रावण यासारखी काही मोजकी पात्रे वगळली तर बहुतेक इतरांनी श्रीरामांना भक्तीने आपलेसे करून घेतले आहे. हनुमान, बिभीषण, शबरी, गुहक असे अनेक जण त्यांचे भक्त होते. सुदामा, कुंती, द्रौपदी, पांडव, विदुर यासारखी अनेक मंडळी श्रीकृष्णाची भक्त होती. त्यांनी श्रीकृष्णाला आपलेसे करून घेतले होते. श्रीकृष्ण त्यांना आपला सखा, मित्र, बंधू, मार्गदर्शक, तारणहार असे सगळे काही वाटत होता.
रावणाला श्रीरामांबद्दल सर्वांनी सांगितले. परंतु त्याला ते कधी आपलेसे वाटले नाहीत. त्याला स्वसामर्थ्याचा अहंकार होता. पांडवांना श्रीकृष्ण जसा आपला वाटला, तसा दूर्योधन आणि अन्य कौरवांना कधी वाटला नाही. ज्यांना ज्यांना भगवंत आपला वाटला नाही, त्यांचा मार्ग चुकला. ते नको त्या मार्गाने गेले आणि शेवटी त्यांचा विनाश झाला.
जसा अहंकारी माणूस व्यवहारातही कोणाला आवडत नाही. तसा तो भगवंताला सुद्धा आवडत नाही. अहंकार हा अध्यात्मात फार मोठा शत्रू आहे. म्हणून आपण आपला सर्व अहंकार टाकून भगवंताला शरण जावे आपल्याला तो आपलासा वाटला पाहिजे.
तो ' दीनानाथ ' आहे, हे त्याचे ब्रीद सर्वत्र गाजते आहे. इथे आपण 'दीनानाथ 'या शब्दाचा अर्थ केवळ दीनदुबळ्यांचा नाथ असा न घेता शरणागताला आश्रय देणारा असा घ्यायचा आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर भगवंताशिवाय ज्यांना आपले दुसरे कोणी नाही असे वाटते अशांचा तो नाथ आहे. संत मीराबाई म्हणतात," मेरे तो गिरीधर गोपाल दूसरो न कोई." तेव्हा हे मना तू केवळ एका राघवाचा म्हणजेच भगवंताचा आश्रय घे.
भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, तर भगवंताशी जोडलेले एक जिव्हाळ्याचे, आत्मीय असे नाते आहे. ज्याला भगवंत “आपला” वाटतो, त्याचा जीवनप्रवास सुकर होतो. आणि ज्याने भगवंताला “आपलेसे” केले, त्याला दुसऱ्या कोणत्याही आधाराची गरज उरत नाही.
स्वसंवाद :
१) माझे भगवंताशी नाते कसे आहे ? त्यात प्रेम, समर्पण भाव आहे का? की ते गरजेपोटी आहे ?
२) माझ्या स्वभावातील अहंकार मला जाणवतो का ? तसे असेल तर तो कमी करण्यासाठी मी काय करतो?
३) संकटाच्या वेळी खरोखर एकमात्र भगवंतच मला तारील असा त्याच्यावर विश्वास ठेवतो का? (क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
३/४/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा