मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ५५

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ५५

नसे मानसीं नष्ट आशा दुराशा। 

वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥ 

ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५५॥

अर्थ: ज्याच्या मनातील दुष्ट वासना आणि वाईट विचार नाहीसे झाले आहेत, भगवंताला आपल्या प्रेमपाशात बांधण्याची उत्कट इच्छा ज्याच्या मनामध्ये तीव्रतेने आहे आणि ज्याच्या प्रेमामुळे आणि शरणागत वृत्तीमुळे स्वतः भगवंत त्याचा ऋणी झाला आहे, असा भक्त भगवंताचा जगातील सर्वात उत्कृष्ट किंवा धन्य भक्त आहे. 

( नष्ट -त्याज्य/वाईट,  दुराशा - दुष्ट वासना वासना /इच्छा, प्रेमपाश- प्रेमाने बांधून ठेवणे, पिपाशा - तृष्णा /तहान )

विवेचन 

भगवद भक्तीत जो रंगून गेला आहे, तो मनाने अंतर्बाह्य निर्मळ असतो. आत एक आणि बाहेर एक असे त्याच्याजवळ असत नाही. वासना, विकार आणि दुष्टभावना यांना त्याच्या मनात थारा नसतो. किंबहुना ह्या गोष्टी त्याला सहनच होत नाहीत. जसे आपल्याला शुभ्र वस्त्रावर एखादाही डाग चालत नाही, त्याप्रमाणे त्याचे मन शुभ्र वस्त्रासारखे आणि पारदर्शक असते. अशा भक्त विषयी बोलताना तुकाराम महाराज म्हणतात, " जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे हृदयी. " 

"मना वासना दुष्ट कामा नये रे.." असे समर्थ सुरुवातीच्या श्लोकांमध्ये आपल्याला सांगतात. त्याचे तात्पर्य हेच आहे. रावणाच्या मनामध्ये सीतेची कामना होती. धृतराष्ट्राच्या मनात पुत्रमोह होता. दुर्योधनाच्या मनात राज्याची कामना होती. अशा वाईट आणि दुष्ट विचारांमुळे त्यांचा नाश झाला.

 आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ऐहिक सुखाची कामना असते. सत्ता, पैसा, सोनेनाणे कितीही मिळाले तरी हवेच असते. पण भगवंताचा खरा भक्त मात्र या गोष्टींपासून दूर असतो. तो कामना करतो ती भगवंताचीच!त्याच्या मनात तळमळ असते ती भगवंतप्राप्तीचीच! त्याची समर्पण भावना एवढी तीव्र असते की स्वतः भगवंत त्याच्या ऋणात राहतो. त्यांना कोणतेही ऐहिक सुख नको असते. तुकाराम महाराज म्हणतात, " न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा.. " त्यांचे भगवंताशी प्रेमाचे नाते जोडलेले असते. "तूंचि बापधनी" अशी भावना परमेश्वराबद्दल भक्ताच्या मनात असते. तोच त्यांचे आई-वडील, गुरु सगळे काही असतो. 

भगवंताला देखील अशा भक्तांचा दास व्हावेसे वाटते. आपल्या दासाला कोणताही त्रास झालेला भगवंताला चालत नाही. मग जनाईला तो दळण दळू लागतो, नाथांच्या घरी तो पाणी भरतो, विठू महाराच्या रुपात दामाजींचे कर्ज फेडतो, पुंडलिकासाठी विटेवर उभा राहतो, अर्जुनासाठी त्याच्या रथाचे सारथ्य पत्करतो. यात त्याला कोणताही कमीपणा वाटत नाही.

देव बांधला जात नाही आणि त्याला कोणी बांधू शकत नाही. श्रीकृष्ण लहान असताना यशोदेने त्याला बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु जो जो त्याला बांधायला जावे तो तो दोरी अपूर्ण पडत होती. मग भगवंताने स्वतःच तिच्याकडून बांधून घेतले. असा भगवंत भक्तांच्या प्रेमाने बांधला जातो. हे अदृश्य बंधन असते. देव भावाचा भुकेला असतो.

 सुदामा हा श्रीकृष्णाचा मित्र होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु तो श्रीकृष्णाचा परमभक्त होता. तो जेव्हा श्रीकृष्णाच्या भेटीसाठी  द्वारकेला आला तेव्हा श्रीकृष्णाने स्वतः त्याच्या पायात मोडलेले काटे काढले, त्याचे पाय धुतले, सेवासुश्रुषा केली. अशा रीतीने भगवंत हा भक्तांचा ऋणी होतो. परंतु त्यासाठी भक्ताची देखील तेवढी योग्यता असावी लागते.

 आपले सगळे संत भगवंताचे असेच प्रेमळ भक्त होते. "संतांचीया गावा प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश " असे उद्गार संतांच्या बाबतीत तुकाराम महाराज काढतात. म्हणूनच आपण सगळ्या संतांना माउली म्हणून संबोधतो. अशा संतांचा तर भगवंत देखील ऋणी असतो आपण अशा संतांचे दास व्हावे म्हणजे दासानुदास व्हावे. एवढी समर्पण भावना जर आपल्याजवळ असेल तर भगवंत प्राप्ती दूर नाही.

स्वसंवाद

१) माझ्या मनातील दुराशा आणि वाईट विचार मला जाणवतात का? आणि ते नाहीसे करण्याचा मी प्रयत्न करतो का ?

२) भगवंताला प्रेमपाशात बांधण्याची तळमळ माझ्या मनात आहे का? की माझी भक्ती केवळ ऐहिक गोष्टींसाठीच आहे ?

३) "दासानुदास" होण्याची माझी तयारी आहे का – संतांच्या चरणी नम्रतेने जाण्याइतकी समर्पण भावना माझ्यात आहे का ?

(क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१६/४/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...