उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३३
वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा|
शशी सूर्य तारांगणे मेघमाला|
चिरंजीव केले जनी दास दोन्ही |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३३|
अर्थ
ही सृष्टी म्हणजे भगवंताची लीला आहे. त्यासृष्टीत मेरूमांदार आदी पर्वत आहेत. चंद्र, सूर्य आणि तारांगणे आहेत. मेघमाला आहेत. ही सृष्टी आहे तोपर्यंत हनुमान आणि बिभीषण दोन्ही चिरंजीव आहेत. प्रभू रामचंद्रांनी आपल्या या दोन्ही दासांना चिरंजीव केले आहे. दासाभिमानी असलेला भगवंत आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.
( मेरू - स्वर्ग, मत्यू, पाताळ यांना आधारभूत असलेला सोन्याचा पर्वत. मांदार - समुद्रमंथनाचे वेळी या पर्वताचा रवी म्हणून वापर केला गेला )
विवेचन
समर्थांनी आपल्याला मागील श्लोकात भगवंताच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करून सांगितले आहे या श्लोकात ते आपल्याला सांगतात की आपल्याला ही जी सृष्टी दिसते आहे ती म्हणजे केवळ भगवंताची लीला मात्र आहे. मेरू आणि मांदार हे दोन्ही पर्वत, चंद्र, सूर्य, अगणित तारे आणि तारका, असंख्य अशा आकाशमाला, बरसणारे ढग या सगळ्या गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत.
मेरू पर्वत, ज्याला सुमेरू असेही म्हटले जाते, एक पौराणिक पर्वत असून हिमालयात स्थित आहे असे मानले जाते. हा पर्वत म्हणजे हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मांचे एक पवित्र स्थान समजले जाते. त्याचप्रमाणे हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर स्थित असून पृथ्वीची नाभी समजला जातो. हा पर्वत सुवर्णप्रमाणे चमकतो.
मांदार पर्वताचा उल्लेख देखील पौराणिक कथांमध्ये येतो. हा पर्वत बिहारच्या बांका जिल्ह्यात असून त्याची उंची सुमारे ७०० फूट आहे. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनादरम्यान देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी वासुकी नागासह या पर्वताला रवीसारखे वापरले होते। हे हिंदू आणि जैन धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. या अद्भुत पर्वतांसारख्या अनेक अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत.
थोडक्यात सांगायचे तर आपल्याला दिसणाऱ्या या अवघ्या विश्वाचा निर्माता भगवंत आहे. या सृष्टीमध्ये सजीवांसाठी आवश्यक असलेल्या हवा, पाणी, अन्न यासारख्या गोष्टी त्यानेच निर्माण केल्या आहेत. त्याची निर्मिती असलेले चंद्र आणि सूर्य आपल्याला प्रकाश देतात. नद्या आपली तहान भागवतात. मेघातून बरसणारा पाऊस आपल्यासाठी अन्न निर्माण करतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या परमेश्वराचीच निर्मिती आहेत.
जोपर्यंत ही सृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत तारे, चंद्र, सूर्य आपल्याला प्रकाश देत राहतील. मेघ जलाचा वर्षाव करत राहतील. ही भूमाता आपल्यासाठी अन्न निर्मिती करील. शतकानुशतके युगानुयुगे या गोष्टी होत आल्या आहेत आणि होत राहतील. परंतु या सृष्टीवर मानवासहित जे सर्व सजीव प्राणी, वनस्पती जन्माला आले आहेत ते सर्व मर्त्य आहेत. त्यांना मृत्यू अटळ आहे.
जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत
या गीतरामायणातील ओळी मानवी जन्म आणि मृत्यू हे कसे एकमेकांशी निगडित आहेत हे सांगतात.
या जगात जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यू आहेच हे निश्चित. पण असे असले तरी भगवंताने आपल्या दोन दासांना चिरंजीवित्व प्राप्त करून दिले. या जगामध्ये सात व्यक्ती चिरंजीव आहेत असे मानले जाते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा