मुख्य सामग्रीवर वगळा

सज्जनांचे मौन : एक दाहक वास्तव

 उगवतीचे रंग

सज्जनांचे मौन : एक दाहक वास्तव

परवा टीव्हीवर महाभारतातला द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग पाहत होतो. हा प्रसंग अनेक वेळा पाहिलेला असला तरी प्रत्येक वेळी तो मनाला नव्याने अस्वस्थ करून जातो. खरे तर हा प्रसंग इतका हृदयविदीर्ण करणारा आहे की तो पाहवत नाही. भर दरबारात उभ्या असलेल्या द्रौपदीचा आक्रोश, तिने लज्जा रक्षणासाठी केलेली धडपड, तिचाआकांत, तिच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू आणि तिची असहाय्यता पहावत नाही.

पण त्या प्रसंगात सर्वांत जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट कोणती आहे हे माहिती आहे का? तर ती आहे सभेत बसलेली महान पराक्रमी अशी धुरंधर मंडळी. पितामह भीष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य, विदुर यांसारखे धर्मनिष्ठ आणि विद्वान मानले जाणारे लोक त्या दरबारात उपस्थित असतात. पण त्या वेळी ही सगळी मंडळी आपल्या तोंडात जणू मिठाची गुळणी धरून असतात. अन्याय डोळ्यांसमोर घडत असताना ते हातावर हात धरून शांत बसलेले दिसतात. त्यांची हतबलता पहावत नाही.

त्याशिवाय ज्यांनी अशा प्रसंगी उसळून उभे राहावे असे द्रौपदीचे पराक्रमी म्हणून ओळखले जाणारे पाच पतीदेखील त्या वेळी असहाय्य होऊन बसलेले असतात. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या पत्नीचा अपमान होत असताना ते हात चोळत बसण्यापलीकडे काही करू शकत नाहीत. ज्यावेळी आपल्या पत्नीच्या पदराला कोणी हात घालते आहे अशा वेळी राजशिष्टाचार, द्युताचे नियम इत्यादी सगळ्या गोष्टी बाजूला सारून भीम, अर्जुन यांच्यासारखी धुरंदर मंडळी उभी राहिली असती तर पुढील महाभारत कदाचित घडले नसते. शेवटी द्रौपदीचा कृष्ण सखा मदतीला धावतो.

हे सगळे पाहून अस्वस्थ व्हायला होते. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने गीता फक्त अर्जुनाला सांगितली नाही. अर्जुन हा निमित्त आहे परंतु गीतेचा उपदेश हा सर्वांसाठी आहे. त्याचप्रमाणे मला असे वाटते की हा द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग केवळ द्रौपदी पुरता मर्यादित राहत नाही द्रौपदी ही प्रातिनिधिक आहे. ती केवळ ऐतिहासिक व पौराणिक व्यक्तिरेखा म्हणून सोडून देता येणार नाही. ती जगातील सगळ्या स्त्रियांची प्रतिनिधी आहे. दुर्योधनादि कौरव सोडले तर दरबारात बसलेली सगळी मंडळी म्हणजे सज्जन मंडळी आहेत असे म्हणूया. हे तथाकथित सज्जन देखील सार्वकालिक सज्जनांचे प्रतिनिधी आहेत असे मला वाटते आणि अशा सज्जनांचे मौन किंवा त्यांची निष्क्रियता समाजासाठी किती घातक आहे याचे हे इतिहासाने दिलेले तेव्हापासूनचे उदाहरण आहे.

द्रौपदी वस्त्रहरणाचा महाभारतातील हा प्रसंग केवळ एका स्त्रीच्या अपमानाची कथा नाही, तो समाजातील सज्जनांच्या निष्क्रियतेचा आरसा आहे. अन्याय करणारा दुर्जन नक्कीच दोषी असतो; पण त्याच्याइतकाच दोष त्या सज्जनांचाही असतो, जे आपल्या डोळ्यासमोरअन्याय घडत असताना शांत बसलेले दिसतात. अशावेळी त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा, त्यांच्या पराक्रमाचा काय उपयोग ! त्यांचे शिक्षण व्यर्थच म्हणायचे !

 आता आपल्या लज्जा रक्षणासाठी कोणी येणार नाही हे जेव्हा द्रौपदीला लक्षात आले, तेव्हा तिने अनन्य स्वराने श्रीकृष्णाचा धावा केला. त्याला आर्त हाक मारली. द्रौपदीचा हा सखा त्या हाकेला प्रतिसाद देत धावून आला आणि त्याने तिची लाज वाचवली. तिच्या साडीचे अंतहीन वस्त्र झाले. तिचे वस्त्र ओढणारे हात थकून जमिनीवर पडले आणि भर दरबारात तिचे जे वस्त्रहरण होणार होते ते टळले. 

त्या प्रसंगी संकटाच्या क्षणी श्रीकृष्ण धावून आले. आजही ते तसेच येतील का ? त्यांची वाट पाहायची का ? आजच्या काळात तसे होणे शक्य आहे का ?

आजच्या या काळात कोणा अबलेच्या आर्त हाका ऐकून श्रीकृष्ण धावून येतील आणि तिची दुष्टांच्या तावडीतून सुटका करतील अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.  

आजची परिस्थिती वेगळी आहे. आज प्रत्येक सज्जन माणसालाच स्वतःमध्ये कृष्ण जागवावा लागेल. आपण भगवद्गीता वाचतो. अनेकदा तिचे पारायणही करतो. तिच्या श्लोकांचा आदर करतो. पण गीतेचा संदेश केवळ वाचण्यासाठी नाही; तो आचरणात आणण्यासाठी आहे. अन्यायासमोर उभे ठाकणे, दुर्बलांच्या पाठीशी उभे राहणे आणि अधर्माला विरोध करणे हाच गीतेचा खरा अर्थ आहे. आपल्या कर्तव्यापासून च्युत झालेल्या अर्जुनाला कर्मप्रवृत्त करणे हाच गीतेचा उद्देश होता आपल्याला देखील गीता कर्म प्रवण करते.

समाजात अनेक ठिकाणी स्त्रियांवर वेळोवेळी अन्याय होतो. कधी घराच्या चार भिंतीत, कधी भर रस्त्यावर, तर कधी तिच्या कार्यक्षेत्रात. अशा वेळी अनेकदा सभोवताली उभे असलेले ( सज्जन ) लोक गप्प राहणे पसंत करतात. सत्तेची भीती, पैशाचा मोह किंवा स्वतःच्या सुरक्षिततेची चिंता या कारणांमुळे सज्जन लोक मौन बाळगतात.

पण इतिहास सांगतो की समाजाचे सर्वांत मोठे नुकसान दुर्जनांच्या शक्तीने होत नाही; ते सज्जनांच्या मौनामुळे होते. लोकशाहीत जेव्हा निवडणुका होतात, तेव्हाही बऱ्याचदा सज्जनशक्ती मौन राहते त्यामुळेच नको असलेल्या व्यक्ती सत्तेवर येण्याचा धोका असतो.

८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा होतो आहे. त्या दिवशी आपण स्त्रीशक्तीचा गौरव करतो, तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करतो. तिचे अभिनंदन करून मोकळे होतो. परंतु तिचा खरा सन्मान केवळ अभिनंदनाच्या संदेशांत नाही. तो त्या वेळी सिद्ध होतो, जेव्हा अन्यायाच्या प्रसंगी समाजातील सज्जन लोक धैर्याने उभे राहतात. असे जेव्हा होईल तेव्हाच स्त्रीला आपण सुरक्षित असल्याचा विश्वास निर्माण होऊ शकेल. एक व्यक्ती म्हणून तिला तिचे अधिकार देणे ही त्या पुढची पायरी आहे.

वर उल्लेख केलेला महाभारतातील प्रसंग आपल्याला सांगतो की सज्जनांचे मौन हेही अनेकदा अधर्माला बळ देणारे असते. आजच्या काळात श्रीकृष्ण प्रत्यक्ष येणार नाहीत. कारण त्यांनी गीतेच्या माध्यमातून विवेकाची ज्योत आपल्या हातात दिली आहे.

आता सज्जनशक्ती हीच कृष्णशक्ती व्हावी ही काळाची गरज आहे. कदाचित स्त्रीसन्मानाचा खरा उत्सव तेव्हाच साजरा होईल, जेव्हा समाजातील सज्जनांचे मौन तुटेल.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

६/२/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...