मुख्य सामग्रीवर वगळा

​मला आवडलेले एक व्यक्तिचित्र : डॉ. वसंतराव डोक्रस

 

उगवतीचे रंग

​मला आवडलेले एक व्यक्तिचित्र : डॉ. वसंतराव डोक्रस

“माणूस असावा तर असा आणि एखाद्या संस्थेचा प्रमुख असावा तर असा” —

​असं वाटायला लावणारी माणसं आयुष्यात फार क्वचित भेटतात. अशाच थोडक्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे डॉ. वसंतराव डोक्रस. व्यक्तीचित्र म्हटलं की सहजपणे पु. ल. देशपांडे यांनी रंगवलेली अंतू बरवा, हरी तात्या, सखाराम गटणे यांसारखी अजरामर पात्रं डोळ्यांसमोर उभी राहतात. पुलंनी माणसांच्या स्वभावरेषा ज्या सूक्ष्मतेने आणि जिवंतपणे रेखाटल्या, ती उंची गाठणं अवघडच. तरीही इतर लेखकांच्या लिखाणातही अशी काही व्यक्तीचित्रं आढळतात, जी वाचकाच्या मनात कायमची घर करून राहतात.

​अशाच लक्षात राहणाऱ्या व्यक्तीचित्रांपैकी एक म्हणजे डॉ. विजय देशपांडे यांनी आपल्या ‘माणूस नावाची शाळा’ या पुस्तकात रेखाटलेले डॉ. वसंतराव डोक्रस यांचे व्यक्तिचित्र. ते वाचताना क्षणोक्षणी असं वाटत जातं की नेतृत्व, विद्वत्ता आणि माणुसकी यांचा सुरेख संगम म्हणजे डॉ. डोक्रस.

​डॉ. वसंतराव डोक्रस हे नागपूरच्या विश्वेश्वरय्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज (व्हीआरसीई) चे माजी प्राचार्य. आज हेच महाविद्यालय विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT) म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे, त्यांच्याबद्दल लिहिणारे डॉ. विजय देशपांडे हेही याच संस्थेतील प्राध्यापक होते. त्यामुळे हे व्यक्तिचित्र अनुभवांच्या प्रामाणिक मातीवर उभं राहिलेलं आहे.

​डॉ. डोक्रस यांच्या कर्तृत्वाचा पाया त्यांच्या विद्यार्थीदशेतच रचला गेला होता. अमरावतीच्या किंग एडवर्ड कॉलेजमधून सुरू झालेला त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यानंतर त्यांना प्रतिष्ठित आय.आय.एस. (IISc - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) मध्ये एम.एस्सी. साठी शिष्यवृत्ती मिळाली. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी एम.एस्सी. 'डिस्टिंक्शन'सह उत्तीर्ण करण्याचा पराक्रम केला होता. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेमुळेच १९४० च्या दशकात त्यांना अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून एम.एस. (MS) आणि पी.एचडी. (Ph.D) साठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांचा त्या काळातील शोधनिबंध आजही गुगलवर उपलब्ध आहे, जो त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीची साक्ष देतो.

​डॉ. डोक्रस मोजकंच, पण नेमकं आणि मार्मिक बोलत. एकदा ते आणि डॉ. विजय देशपांडे राष्ट्रीय प्रयोगशाळेतील एका उपसंचालकांना भेटायला गेले. पद मोठं होतं, खुर्चीही मोठी होती; पण त्या पदावर बसलेली व्यक्ती मात्र सातत्याने आपल्या अडचणींचा पाढा वाचत होती. आपल्याला अपेक्षित असलेलं काही साध्य होणार नाही, हे लक्षात येताच दोघे बाहेर पडले. तेव्हा डॉ. डोक्रस सहज म्हणाले—

“खुर्च्या मोठ्या केल्या तरी त्यात बसणारी माणसं मात्र खुजीच राहतात.”

​त्यांचे हे उद्गार म्हणजे नेतृत्वाच्या संकल्पनेवरची कठोर पण खरी आणि मार्मिक अशी टिप्पणी होती.

​डॉ. डोक्रस हे शिस्तप्रिय होते, पण ती शिस्त जाचक नव्हती. एकदा व्हीआरसीईच्या विद्यार्थ्यांनी एका काश्मिरी पंडित विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखाली हॉस्टेलच्या जेवणावरून संप पुकारला. डॉ. डोक्रस यांनी त्यांना समजावून पाहिले, पण विद्यार्थी ठाम होते. तेव्हा त्यांनी एक अनोखा मार्ग निवडला. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले, "जर मेस बंद झाली, तर तुम्ही जेवणार कुठे?" विद्यार्थ्यांकडे उत्तर नव्हते. अशा वेळी डॉ. डोक्रस यांनी आपल्या पत्नीला घरी स्वयंपाक करायला सांगून तो डबा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. काही दिवसांतच विद्यार्थ्यांचा रोष निवळला आणि तो विद्यार्थी नेता चक्क डॉ. डोक्रस यांच्या पत्नीचे आभार मानायला त्यांच्या घरी पोहोचला. विद्यार्थी हा त्यांचा खरा ‘वीक पॉईंट’ होता. चिडलेल्या विद्यार्थ्यांशी ते असं काही भावनिक संवाद साधत, की क्षणात वातावरण बदलून जाई.

​त्यांची तत्वनिष्ठा केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही दिसून आली. १९६७ मध्ये इराणचे शहा मोहम्मद रझा पहलवी यांच्या राज्याभिषेकासाठी त्यांना खास निमंत्रण होते. त्यांचे पुत्र डॉ. उदय डोक्रस सांगतात की, हे निमंत्रण शहांच्या थेट ओळखीमुळे नव्हे, तर इराणी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षांशी असलेल्या मैत्रीमुळे होते. याच काळात इराणच्या एका मंत्र्याच्या मुलाला (जो अभ्यासात कच्चा होता) पास करण्यासाठी डॉ. डोक्रस यांच्यावर दबाव आला, पण त्यांनी त्याला कसलीही मदत केली नाही. परिणामी त्या मुलाला रिकाम्या हाती इराणला परतावे लागले. डॉ. डोक्रस हे पूर्णपणे प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त होते.

​डॉ. डोक्रस हे विद्वान तर होतेच; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते एक उमदं, सकारात्मक व्यक्तिमत्त्व होते. मध्य प्रदेशात त्यांनी केलेल्या यशस्वी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची व्हीआरसीईच्या प्राचार्यपदी नेमणूक केली. त्यांनी जो मार्ग प्रशस्त केला, त्यावरून पुढे चालणं नंतरच्या प्राचार्य आणि विद्यार्थ्यांसाठी सुकर झालं.

​कामाचा उरक प्रचंड होता. टेबलावर आलेली प्रत्येक फाईल निकाली काढूनच ते घरी जात. डॉ. विजय देशपांडे यांनी एकदा त्यांच्या कामाच्या पद्धतीचं रहस्य विचारलं, तेव्हा ते सहज म्हणाले—

“अरे, कसलं आलंय रहस्य! सारं काही सवयीन जमतं. सवय लावून घ्यायला थोडी बुद्धी, काम करताना लागणारं कसब आणि मुख्य म्हणजे कोणतंही काम पूर्ण करण्याची मानसिक तयारी—या तीन गोष्टी जवळ असल्या की बाकी सगळं आपोआप जमतं.”

​डॉ. उदय डोक्रस सांगतात की, वडील कायम कामात आणि प्रवासात असायचे. पण त्यांच्या लोकप्रियतेची खरी जाणीव त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झाली. नागपूरच्या धंतोली भागातील रस्ते शोकसागरात बुडालेल्या जनसमुदायाने गच्च भरले होते.

​प्रत्येक माणसाला जन्म असतो, तसा शेवटही असतो. माणसाचं मोठेपण त्याच्या पदात नसतं; पदाला मोठं करणारी त्याची उंची असते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचं संस्थापक सदस्यत्व ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व—अशा अनेक सन्मानांनी त्यांचं कर्तृत्व अधोरेखित झालं. त्यांच्यातील ‘वसंत’ सदैव बहरलेलाच राहिला. ज्या ज्या निर्जीव खुर्च्यांवर ते बसले, त्या त्या खुर्च्यांनाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे उंची मिळत गेली.

​असा हा हिमालयाएवढ्या उंचीचा माणूस!

व्यक्तीचं जीवन कसं असावं, याचा हा एक जिवंत आदर्श.

​© विश्वास देशपांडे, चाळीसगाव

८/२/२०२६

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...