मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’ (भाग १)

 उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा |

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा |

नमू शारदा मूळ चत्वार वाचा |

गमू पंथ अनंत या राघवाचा |१|

अर्थ :

जो गणांचा अधिपती आहे, जो सर्व गुणांचा स्वामी आहे आणि निर्गुण परब्रह्माचा मुळारंभ आहे, अशा श्रीगणेशाला वंदन. तसेच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाणींचे मूलस्रोत असलेल्या देवी शारदेला नमस्कार करून आपण राघवाच्या अर्थात ईश्वराच्या अनंत मार्गावर वाटचाल सुरू करूया.

मनाच्या श्लोकांतील पहिला श्लोक मंगलाचरणाचा आहे. कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यासाठी ईश्वरकृपेची आवश्यकता असते. म्हणून कोणत्याही चांगल्या कार्याचा प्रारंभ मंगलभावनेने अर्थात ईश्वर प्रार्थनेने आपण करतो.  समर्थ रामदासांनीही मनाच्या या महाग्रंथाची सुरुवात गणेश व शारदा यांच्या वंदनाने केली आहे. सर्वात आधी आपण श्रीगणेशाचे स्मरण करतो. समर्थांनीही मनाच्या श्लोकांचा प्रारंभ श्रीगणेशाच्या नमनाने केला आहे. श्रीगणेश हा विघ्नहर्ता आहे. आपल्या कार्यातील अडथळे तो दूर करतो, मार्ग सुकर करतो आणि साधकाचे रक्षण करतो.

समर्थ श्रीगणेशाला “सर्वा गुणांचा ईश” म्हणतात. येथे केवळ सत्त्व, रज, तम हे त्रिगुण अभिप्रेत नाहीत, तर चांगले–वाईट, त्याज्य–ग्राह्य असे सर्व गुण येतात. मुळात सृष्टीत कोणतीही गोष्ट स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते; तिचा उपयोग आपण कसा करतो, यावर तिचे स्वरूप ठरते. अग्नी स्वयंपाकासाठीही उपयोगी पडतो आणि जाळण्यासाठीही. शस्त्र एखाद्याला जखमी करू शकते, तसेच शस्त्रक्रियेतून प्राण वाचवूही शकते. दैनंदिन व्यवहारात त्याज्य मानले जाणारे विष अनेक रोगांमध्ये औषध ठरते. सृष्टीत शुद्ध तत्त्वच विराजमान आहे आणि त्या तत्त्वांचा अधिपती गणपती आहे.

गणेशवंदनेनंतर समर्थ विद्येची देवता असलेल्या शारदेचे म्हणजेच माता सरस्वतीचे स्मरण करतात. “नमू” हा शब्द गणेश आणि शारदा या दोघांनाही उद्देशून आहे. दैनंदिन जीवनात असो वा अध्यात्ममार्गावर, प्रगतीसाठी ज्ञान अत्यावश्यक आहे; आणि ज्ञानाची अधिष्ठात्री देवता म्हणजे शारदा. तिच्या कृपेअभावी कोणतेही ज्ञान संपादन शक्य नाही. म्हणूनच तिलाही वंदन. 

शब्दाचे मूळ स्फुरण परा, त्याचा भावार्थ पश्यंती, त्याचा नाद मध्यमा आणि प्रत्यक्ष उच्चार वैखरी या चारही वाणींचे मूलस्थान शारदा आहे. कोणत्याही वाङ्मयाची, विचारांची किंवा अभिव्यक्तीची निर्मिती तिच्याशिवाय शक्य नाही. म्हणूनच समर्थांनी या मनोपनिषदाच्या प्रारंभी शारदेला वंदन केले आहे. शारदाच आदिमाया, आदिशक्ती आहे.

या वंदनाचा हेतू स्पष्ट आहे. आपली ही वाटचाल निर्विघ्नपणे पार पडावी. आपल्याला ज्या मार्गावर चालायचे आहे, तो मार्ग म्हणजे श्रीरामांचा मार्ग. येथे श्रीराम म्हणजे केवळ दशरथपुत्र नव्हे, तर परमात्मस्वरूप. हा मार्ग अनंत आहे, न संपणारा आहे. या मार्गावर स्वयं भगवान शंकरही चालत आहेत; तेही अखंड रामनामाचा जप करत आहेत.

समर्थांचे दैवतच श्रीराम आहे. ते स्वतःला रामदास म्हणतात म्हणजे श्रीरामाचे दास. श्रीराम जणू त्यांना प्रत्यक्ष समोर उभे दिसतात. म्हणूनच ते म्हणतात, “गमू पंथ अनंत या राघवाचा.” या अनंत मार्गावर चालण्यासाठी समर्थ श्रीगणेश आणि शारदेचे आशीर्वाद मागतात आणि ते आशीर्वाद आपल्यासाठीही आहेत. कारण आपल्यालाही समर्थांनी सांगितलेल्या या अनंत पंथावर वाटचाल करायची आहे. आपणही भक्तिभावाने त्यांना वंदन करून, या राघवाच्या अनंत मार्गावर चालण्यासाठी सज्ज होऊ या.

स्वसंवाद 

१. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना माझ्या मनात मंगलभाव आहे का, की केवळ घाई?

२. माझ्यातील गुणांचा उपयोग मी साधनेसाठी करतो की बंधनांसाठी?

३. शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यामागील भाव आणि अर्थ समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो का?

४. श्रीरामांचा “अनंत मार्ग” हा माझ्यासाठी बाहेरचा आहे की अंतर्मनातून सुरू होणारा?

(क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव

४/२/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...