उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग ८
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी |
मना सज्जना हेची क्रीया धरावी |
मना चंदनाचे परी त्वां झिजावे |
परी अंतरी सज्जना नीववावे |८|
अर्थ : हे मना ( सज्जन माणसा ), तुझी वागणूक अशा प्रकारे असू दे की मृत्यू पावल्यानंतरही तुझी कीर्ती मागे राहील. सुगंध देण्यासाठी चंदन ज्याप्रमाणे स्वतःला झिजवते अशाच प्रकारे तू देखील इतरांसाठी झिजून सज्जनांना संतोष होईल अशा प्रकारे वागावे.
माणसाचा देह नाशिवंत आहे. जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यू निश्चित आहेच. जीवन आणि मृत्यू यांच्या दरम्यानचा कालावधी म्हणजे आपले आयुष्य. एखादी व्यक्ती किती जगली यापेक्षाही ती कशी जगली हे अधिक महत्त्वाचे. शंभर वर्षांचे दीर्घायुष्य मिळवून आपले आयुष्य मौजमजेत घालवणाऱ्या व्यक्तीपेक्षा अल्पायुष्य लाभलेल्या परंतु इतरांच्या सेवेत आपले जीवन घालवणाऱ्या व्यक्तीचे जीवन कधीही श्रेष्ठ ! स्वामी विवेकानंदांना उणेपुरे चाळीस वर्षांचे आयुष्य लाभले परंतु या आयुष्यात त्यांनी जी मानवतेची सेवा केली ती अनेक जन्म घेऊनही इतरांना करणे कठीण आहे. आपले आयुष्य सत्कारणी लावायचे असेल तर त्यासाठी इतरांसाठी झिजण्याची तयारी हवी. एक सुंदर मराठी गीत आहे...
आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
गाण्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा
झिजूनी स्वतः चंदनाने
दुसर्यास मधुगंध द्यावा...
शीतलता आणि सुगंध हे चंदनाचे गुण आहेत. ते इतरांना देण्यासाठी ते स्वतः झिजत असते. चंदन रोज सहाणेवर थोडे थोडे उगाळले जाते. असे करताना त्याची झीज होत असते. परंतु ही झीज सोसून ते इतरांना सुगंध आणि शीतलता प्रदान करते. आपण असेही म्हणतो की जे हात इतरांना सुगंध वाटतात, त्या हातांनाही सुगंध येतो. तो गंध त्यांना आपोआप प्राप्त होतो.
इतरांसाठी काही करायचे तर फक्त एक दिवस झिजून चालत नाही. ती सवय व्हावी लागते, वृत्तीला तसे वळण लावावे लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात मना सज्जना हेचि क्रीया धरावी. अशा प्रकारचे सेवेमध्ये सातत्य असावे लागते. अशा प्रकारचे सातत्य जर आपल्या सेवेत आणि वागण्याबोलण्यात असेल तर त्यामुळे सज्जन म्हणजे समाजातील सदाचरणी लोक प्रसन्न होतात, संतुष्ट होतात.
समाजातील बऱ्याच लोकांकडे सत्ता आणि संपत्ती असते. त्यातील काही लोक आपल्या सत्तेच्या आणि संपत्तीच्या बळावर विविध संस्थांना देणग्या देऊन आपले नाव द्यायला लावतात. विविध प्रकारे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. तशी ती त्यांना काही काळ मिळते देखील. इमारतीच्या फलकांवर किंवा दगडांवर त्यांचे नाव कोरले गेलेले असते. तरीदेखील काही काळानंतर अशा व्यक्ती विस्मृतीत जातात. परंतु कोणत्याही प्रकारचा स्वार्थ किंवा प्रसिद्धीची हाव न धरता जे सातत्याने समाजासाठी झिजत असतात, अशा व्यक्तींचे नाव समाज कायम आदराने घेत असतो. अशा व्यक्तींचे नाव समाजाच्या मनात कोरले जाते. त्याला कायमस्वरूपी आदराचे स्थान असते. अहिल्याबाईंनी आपला राज्यकारभार करत असताना समाजासाठी घाट बांधले, अन्नछत्रे पाणपोया उभारल्या. यासारखी विविध प्रकारची कामे केली आणि त्यासाठी पैसा खर्च केला. त्यामुळे आपण आजही त्यांचे नाव आदराने घेतो. इतरांची नावे विसरली जातात. म्हणूनच त्यांची कीर्ती आजही जिवंत आहे.
समर्थांचा संदेश स्पष्ट आहे —
कीर्ती मागे राहावी असे वाटत असेल तर आयुष्य इतरांसाठी झिजवले पाहिजे. आणि हे झिजणे एकदाच नव्हे, तर वृत्ती म्हणून अंगीकारले पाहिजे.
“मना सज्जना हेचि क्रीया धरावी” —
ही कृती, ही वृत्ती, ही सातत्यपूर्ण सेवा — हाच खरा साधनेचा मार्ग आहे.
स्वसंवाद
• मी केवळ स्वतःसाठी जगतो आहे की इतरांसाठी झिजून त्यांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करतो आहे ?
• माझ्या कृतींमागे प्रसिद्धीची अपेक्षा आहे का, की निखळ सेवाभाव ?
• हा सेवाभाव मी एक वृत्ती म्हणून अंगीकारला आहे का ?
• माझ्या वागण्याने किंवा सेवाभावाने समाजातील सज्जन किंवा सदाचरणी लोक संतुष्ट होतात का ?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२५/०२/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा