*उगवतीचे रंग*
*आपल्या काळात.....!*
मध्यंतरी एक सुंदर गोष्ट वाचनात आली होती. एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती असते. राहण्यासाठी प्रचंड मोठा राजवाडा . भरपूर नोकरचाकर. सर्व सुखे हात जोडून उभी. राजवाड्यात खेळण्यासाठी मोठे उद्यान , पोहण्याचा तलाव , धबधबा इ . गोष्टी. अशा या श्रीमंत माणसाला एकुलता एक मुलगा असतो. त्या मुलाला गरिबी म्हणजे काय, भूक म्हणजे काय काही माहित नसते. अर्थातच माहिती असण्याचे काही कारणच नव्हते. एके दिवशी त्या श्रीमंत माणसाला असे वाटते की आपल्या मुलाला गरिबी म्हणजे काय हे कळले पाहिजे म्हणून तो त्याला एका छोटया गावात एका गरीब शेतकऱ्याकडे पाठवतो. आणि त्याला सांगतो तू आठ दिवस तेथे राहून सर्व निरीक्षण कर, ते लोक आपल्यापेक्षा किती गरीब आहेत हे बघ.
त्याप्रमाणे तो मुलगा खेडेगावातल्या त्या गरीब शेतकऱ्याकडे जातो. पण तेथे जातो तर तो तिथल्या वातावरणात रमून जातो. परत आल्यावर आपल्या वडलांना तेथील वृत्तांत सांगताना तो म्हणतो. " तुम्ही म्हणता ती माणसे गरीब आहेत. पण ती माणसे मोकळ्या हवेत,मोकळ्या वातावरणात राहतात. त्यांच्या घरात पंख्यांची गरज नाही. मोकळी हवा,उजेड त्यांच्या घरात आहे. रात्री झोपल्यानंतर त्यांच्या घरातून चंद्रताऱ्यांचे दर्शन होते. आपल्या महालातून तर वरचे छत फक्त दिसते,आपल्याकडे छोटासा तलाव आहे तर त्यांच्याकडे वाहणारी नदी आहे. ते रोज शेतातील पिकलेलेअन्न , ताज्या भाज्या, फळे सेवन करतात. त्यांचे आरोग्य उत्तम आहे. त्याना कोणतेही औषध लागत नाही. तुम्ही म्हणता, ते गरीब आहेत. पण आपल्यापेक्षा तेच खरे श्रीमंत आहेत. त्यांची घरं छोटी असतीलही पण मनं मोठी आहेत बाबा." मंडळी ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे.
वरील गोष्टीवर काही भाष्य करण्याऐवजी मी दलाई लामांचे एक पत्र आपल्यापुढे ठेवतो. पत्र थोडं मोठं आहे पण जरूर वाचा. दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते. त्यांचे हे जीवनदृष्टी व्यक्त करणारे सुंदर पत्र -
आपल्या काळात...
आपल्या काळात इमारतींची उंची वाढली;पण माणुसकीची कमी झाली का ?
रस्ते रुंद झाले ; पण दृष्टी अरुंद झाली का ?
खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली. घरं मोठी पण कुटुंबं छोटी..
सुखसोयी पुष्कळ, पण वेळ दुर्मिळ झाला.
पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग.
माहितीचे डोंगर जमले; पण नेटकेपणाचे झरे आटले .
तज्ञ् वाढले आणि समस्याही वाढल्या . औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं .
मालकीची भाषा वाढली;मूल्यांची कमी.
आपण बोलतो फार.... प्रेम क्वचित करतो... आणि तिरस्कार सहज करतो...
राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं .
आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली; पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही.
भले आपण चंद्रावर गेलो-आलो ;
पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही.
आपण बाहेरचा परिसर जिंकत चाललो आहोत;पण आतल्या हरण्याचं काय ?
हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा; पण आत्म्याच्या गुदमरण्याचे काय ?
आपली आवक वाढली; पण नीयत् कमी झाली. संख्या वाढली पण गुणवत्ता घसरली .
हा काळ उंच माणसांचा; पण खुज्या व्यक्तिमत्त्वांचा .
उदंड फायद्यांचा ; पण उथळ नात्यांचा .
जागतिक शांतीच्या गप्पांचा; पण घरातल्या युद्धांचा .
मोकळा वेळ हाताशी; पण त्यातली गंमत गेलेली.
विविध खाद्यप्रकार ; पण त्यात सत्व नाही.
दोन मिळवती माणसं ; पण त्यांचे घटस्फोट वाढलेले.
घरं नटली; पण घरकुलं दुभंगली .
दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेलं ; पण कोठीची खोली रिकामीच.
हे पत्र तुमच्यापर्यंत पोहचवणारं तंत्रज्ञान आज आहे.
आणि आज आहे तुमचं स्वातंत्र्यही ... या पत्राकडे लक्ष देण्याचं किंवा न देण्याचं .
यातलं काही वाटलं तर बदला... किंवा... विसरून जा...
© *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.*
*प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२*
( *कृपया लेख नावासह शेअर करावा )*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा