*उगवतीचे रंग*
( *आजचे उगवतीचे रंग खास छोट्या दोस्तांसाठी ! आपल्या घरातील लहान मुलांना जरूर वाचायला द्या किंवा वाचून दाखवा*.)
*हुशार बबू माकड*
उन्हाळ्याचे दिवस होते. कडक ऊन पडले होते. जंगलात सगळीकडे कोरडं कोरडं झालं होतं. पाणी मिळणं कठीण झालं होतं. जंगलातील पाण्याचे सगळे स्रोत आटले होते. हरणं, ससे, पक्षी आणि माकडं सगळेच तहानलेले होते. जंगलातील एका तलावात मात्र पाण्याचा भरपूर साठा होता.
एके दिवशी माकडांची एक टोळी पाणी पिण्यासाठी त्या तलावाकाठी आली.
“चला चला… आधी पाणी पिऊया,” टोळीचा म्होरक्या म्हणाला.
सगळी माकडं आनंदाने तलावातलं थंडगार पाणी प्यायला. पाणी पिऊन झाल्यावर सगळी माकडं जवळच असलेल्या जांभळीच्या झाडावर चढली. झाडावर भरपूर गोड जांभळं लागलेली होती.
या टोळीत बबू नावाचं एक छोटं माकड होतं. बबू खूप हुशार होता पण तसाच खोडकरही...! जांभळीच्या झाडाची एक फांदी तलावावर झुकली होती आणि त्या फांदीला भरपूर जांभळं लागली होती. पण ती फांदी नाजूक आणि कमजोर होती.
“अरे बबू, फार टोकाला जाऊ नकोस!”
“ती फांदी कमजोर आहे!”
सगळी माकडं त्याला सांगत होती.
पण बबू कुठला ऐकतोय ?
“मला फांदीच्या टोकावरची ती मोठी, टपोरी गोड जांभळं हवीत!” असं म्हणत तो झाडाच्या अगदी टोकावर गेला.
आणि सगळ्यांना जी भीती होती तीच खरी ठरली. मोठ्याने धपकन असा आवाज झाला
फांदी तुटली… आणि बबू थेट तलावात पडला!
तलावात चिखल होता, तुटलेल्या फांद्या होत्या.
बबू प्रचंड घाबरला.
तो हातपाय हलवत होता. तलावाच्या बाहेर येण्यासाठी त्याची धडपड सुरू होती.
“अरे बापरे! आता काय करायचं?”
खूप हातपाय मारून झाल्यावर तो कसाबसा एका मोठ्या दगडापर्यंत जाऊन पोहोचला.
तो खूप थकला होता. दम लागला होता.
थोडावेळ तो शांत बसला आणि विचार करू लागला. मग त्याला आईचे शब्द आठवले. आई त्याला सांगायची " बबू अरे ,कोणताही कठीण प्रसंग आला तरी घाबरायचं नाही. थोडा वेळ शांत बसायचं. शांत डोक्याने विचार करायचा मग आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग नक्कीच सुचतो."
“खरं आहे. घाबरून उपयोग नाही,” बबू मनात म्हणाला.
“आधी शांत व्हायचं… मग मार्ग सापडतो!”
आणि अचानक…
टक्!
त्याला एक युक्ती सुचली!
जांभळीचं झाड अगदी जवळच होतं. त्या झाडाची दुसरी एक मजबूत फांदी तलावावर झुकलेली होती.
बबूने एक मोठा श्वास घेतला. आणि घेतली झेप त्या फांदीकडे. जणू हनुमान उडीच ! आपल्या दोन्ही हातांनी फांदी घट्ट पकडून बबू आता झाडावर चढला होता.
“अरे वा बबू! शाब्बास!”
सगळी माकडं आनंदाने ओरडली.
बबूला आपली चूक कळली होती. तो म्हणाला,
“ मला माझी चूक कळली आहे. आता तुम्ही सांगितलेलं मी लक्षात ठेवीन. सगळी मोठी माणसं माझ्या हितासाठीच सांगतात हे मला आता कळलं आहे. "
मग सगळी माकडं एकत्र हसत-खेळत जंगलात निघून गेली.
© *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.*
२१/१/२०२६
*प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२*
( *कृपया कथा नावासहित अग्रेषित करावी* )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा