मुख्य सामग्रीवर वगळा

 उगवतीचे रंग 

सुख पर्वताएवढे!

​सध्या थंडीचे दिवस आहेत. परवाचीच गोष्ट ! मी बाहेर माझ्या पोर्चमध्ये आरामखुर्ची टाकून पेपर वाचत बसलो होतो. कोवळे, सुखद आणि उबदार ऊन अंगाला सुखावत होते. माझ्या मनात सहज विचार आला की मी किती भाग्यवान आहे ! कोवळ्या उन्हात बसण्याचं हे सुख अनुभवतो आहे. काही काही सुखांची पैशात तुलना करता येत नाही. पैसे देऊनही असे सुख विकत घेता येणार नाही. आज अनेक लोक असे आहेत की ज्यांना साधं हे उन्हात बसण्याचं सुख देखील अनुभवता येत नाही. या छोट्याशा परंतु मौल्यवान सुखाला ते पारखे झाले आहेत. कोणाच्या घरात ऊनच येत नाही तर कोणाला उंचच उंच इमारतींमुळे सूर्यदर्शन घडत नाही. कामाच्या धावपळीत अनेकांना त्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. कोणी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेला असतो तर कोणी फायलींच्या ढिगार्‍यात. 

संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, 'सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे'. पिढ्यानपिढ्या आपण हेच ऐकत आणि मानत आलो आहोत. पण कधीकधी वाटतं, आपण दुःखाच्या पर्वताकडे इतकं टक लावून पाहतो की, हाताच्या तळव्यावर असलेल्या 'जवा'एवढ्या सुखाच्या अस्तित्वाचाच आपल्याला विसर पडतो. आणि या दुःखाच्या जाणिवेने आपण विनाकारण स्वतःला गंभीर करून घेत असतो. खरंतर, जर आपण जीवनाकडे डोळस दृष्टीने पाहिलं, तर लक्षात येईल की आपण ज्याला ' जवा 'एवढं म्हणतोय, ते सुख खरं तर पर्वताएवढं विशाल आहे. सुख ही अशी गोष्ट आहे की जी कोणत्याही चलनात मोजता येणार नाही. सुख आणि समाधान विकत मिळत नाही, ते फक्त ' अनुभवावे ' लागते.

आपण अनेकदा सुखाची व्याख्या ' वस्तूंमध्ये ' शोधत असतो. आपण जर  कुणाला त्याला आवडणाऱ्या गोष्टींची यादी करायला सांगितली, तर बहुतेकांच्या यादीत मोठी गाडी, आलिशान बंगला, गडगंज संपत्ती हीच नावे येतील. पण खरंच असं असतं का ? जर संपत्तीतच आनंद असता, तर जगातले सर्व श्रीमंत लोक सर्वात आनंदी दिसले असते. पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. पैशाने सुविधा विकत घेता येतात, पण समाधान नाही. बिछाना विकत घेता येतो, पण शांत झोप नाही.

​खरा आनंद कुठे असतो? तो साध्या साध्या गोष्टींमध्ये दडलेला असतो. बाहेर सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेत असताना आणि पेपर वाचत असताना बायकोने प्रेमाने वाफळलेला चहाचा कप समोर ठेवावा, त्याचा आस्वाद घ्यावा. तो केवळ चहा नसतो. त्यात असतं प्रेम आणि काळजी ! आपल्या माणसाची. आपल्या आवडत्या लेखकाचं पुस्तक वाचताना त्यात पूर्णपणे हरवून जावं. मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा मारताना सगळे मुखवटे काढून ठेवून काळ-वेळ विसरावा.  लहान मुलांच्या खेळात रमून स्वतःही बालपण अनुभवावं. पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवावा. आपलं आवडतं एखादं गाणं ऐकावं. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी प्रचंड ऊर्जा देणाऱ्या असतात. 

पण या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे आपण पाहतो का ? बऱ्याच वेळा आपण उजळणी करतो ती दुःखाच्या क्षणांची. हा माझ्याशी असं वागला, तो मला असंच बोलला, हीच का माझ्या उपकारांची परतफेड...  असे विचार करून आपण स्वतःला दुखी करून घेत असतो. पण जीवनात पदोपदी येणारे हे सुखाचे छोटे क्षण आपण डोळे भरून पाहतो का ? त्यांचा आनंद घेतो का ? हे सुखाचे छोटे छोटे क्षण जेव्हा आपण एकत्र करतो, तेव्हा सुखाचा एक भलामोठा पर्वत उभा राहतो.

 पाऊस पडून गेल्यावर पानांवर पडलेला पाण्याचा थेंब जसा सूर्यप्रकाशात हिऱ्यासारखा चमकतो, तसंच आपलं आयुष्य आहे. फक्त आपली दृष्टी 'डोळस' हवी. ज्या दिवशी आपल्याला साध्या साध्या गोष्टींमधलं सौंदर्य आणि आनंद दिसायला लागेल, त्या दिवशी आपल्याला जाणवेल की, दुःख कदाचित तात्पुरतं असेल, पण 'सुख' हे खरोखरच पर्वताएवढं अथांग आणि विस्तीर्ण आहे. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं असं एक गाणं आहे. पण खरोखरच सुख म्हणजे नक्की काय ते शब्दात सांगता येणं कठीण आहे कारण ती अनुभवण्याची गोष्ट असते. 

चिनी आणि जपानी संस्कृतीतील एक सुंदर कल्पना आहे. ते लोक एकमेकांना शुभेच्छा देताना " तुम्हाला सर्व सहाही सुखे प्राप्त होवोत " असे म्हणतात.  यातली पहिली पाच सुखे म्हणजे आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगला जोडीदार आणि चांगली मुले ही आहेत. तर सहावे सुख म्हणजे वैयक्तिक गोष्ट आहे हे सुख प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगवेगळे असते ते ज्याचे त्याने शोधून काढावे लागते असाच आपल्या जीवनातील आनंद देखील आपल्याला शोधता आला पाहिजे तेच आपले सहावे सुख असू शकेल !

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१७/१/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...