मुख्य सामग्रीवर वगळा

 उगवतीचे रंग 

एक अनोखा ज्ञानयज्ञ...

​बाहेर प्रचंड थंडी आहे. थंडीचा कडाका वाढल्याने लोक अंगात स्वेटर चढवून घराच्या उबदार कोपऱ्यात विसावले आहेत. कुठे दूरचित्रवाणीवरील मालिकांचा आस्वाद घेतला जातोय, तर कुणी आपल्या मोबाईलच्या आभासी जगात व्यस्त आहे. पण अशा गारठलेल्या संध्याकाळीही चाळीसगावच्या एका कोपऱ्यात दोन-अडीचशे लोक आनंदाने एकत्र आले आहेत. निमित्त आहे एका आगळ्यावेगळ्या यज्ञाचे ! हा यज्ञ म्हणजे 'ज्ञानयज्ञ'. दररोज निरनिराळे वक्ते आपल्या अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या समिधा या यज्ञात अर्पण करत आहेत आणि हे सुंदर दृश्य पाहायला मिळत होते चाळीसगाव येथील आ. बं. हायस्कूलच्या प्रांगणात, जिथे शेठ नारायण बंकट वाचनालयाची 'सरस्वती व्याख्यानमाला'  काही दिवसांपूर्वी दिमाखात सुरू होती. तिची सांगता नुकतीच झाली आहे.

तब्बल ८७ वर्षे एखादा उपक्रम अव्याहतपणे चालवणे ही साधी गोष्ट नाही. महाराष्ट्राला व्याख्यानमालांची मोठी परंपरा आहे. पुण्याची ऐतिहासिक 'वसंत व्याख्यानमाला', नाशिकची 'सार्वजनिक वाचनालयाची व्याख्यानमाला' किंवा सांगलीची 'व्याख्यानमाला' ज्याप्रमाणे शहराची ओळख बनली आहे, त्याचप्रमाणे चाळीसगावची ही 'सरस्वती व्याख्यानमाला' आता उत्तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव ठरली आहे.

​यंदाच्या व्याख्यानमालेत विषयांचे जे वैविध्य होते, त्याने श्रोत्यांना नक्कीच समृद्ध केले.

 ठाण्याच्या डॉ. अरुणा टिळक यांनी आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीवर आयुर्वेदाच्या माध्यमातून सोपे उपाय सुचवले. पुणे येथील मुक्तांगण परिवारातील माधव कोल्हटकर आणि मानवेंद्र जोगदेव यांनी व्यसनाधीनतेच्या सामाजिक प्रश्नावर परखड प्रबोधन केले. जळगावहून आलेले रामचंद्र पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य गुणांचे दर्शन घडवले, तर बारीपाडा येथील पद्मश्री चैतरामजी पवार यांच्या मुलाखतीतून त्यांच्या निस्पृह कार्याची गाथा समोर आली. जबलपूरच्या प्रशांतजी पोळ यांनी 'इंडिया ते भारत' या प्रवासातून देशाच्या प्रगतीचा गौरवशाली आढावा घेतला. 

सातारा येथील प्रा. डॉ. यशवंत पाटणे यांनी 'सुंदर जगण्यासाठी' लागणारे मौलिक विचार मांडले. मुंबईच्या अविनाश कोल्हे यांनी साहित्यिक व कलाकारांच्या आठवणी जागवल्या, तर नागपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी 'समकालीन जीवन वास्तव' प्रभावीपणे मांडले. 'बर्ड मॅन ऑफ ताडोबा' सुमेध वाघमारे यांनी पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढून साक्षात जंगलच उभे केले, तर नाशिकहून आलेल्या प्रवीण मानकर यांच्या ७५ देशांच्या रोमांचक प्रवासाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

​वाचनालयाने या ज्ञानयज्ञाला कृतीची जोड दिली आहे. व्याख्यानांचे सुंदर वृत्तांत लिहिणाऱ्या 'उत्कृष्ट श्रोत्याचा' सन्मान करणे असो, वाचन संस्कृती टिकवण्यासाठी सुरू केलेली 'वाचक वीर योजना' असो किंवा मुलांसाठीची 'वाचन शिबिरे' असोत; शेठ नारायण बंकट वाचनालय केवळ माहिती देत नाही, तर सुजाण नागरिक घडवत आहे. यात फक्त एकच खंत जाणवली ती म्हणजे जी तरुणाई अशी व्याख्याने ऐकण्यासाठी उपस्थित राहायला हवी त्यांची संख्या अत्यंत अपवादात्मक आढळते. 

​पूर्वीच्या काळी कीर्तन-प्रवचनांतून जे संस्कार मिळायचे, तेच कार्य आज ही व्याख्यानमाला करत आहे. या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना या ओळी आठवतात:

​"देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,

घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे!"

हे 'देणे' केवळ पैशांचे नसून विचारांचे आहे. जेव्हा एक वक्ता आपले आयुष्यभराचे ज्ञान दीड तासात देतो, तेव्हा तो समाज घडवत असतो. चाळीसगावचा हा ८७ वर्षांचा अखंड ज्ञानयज्ञ असाच तेवत राहो, हीच सदिच्छा!

"ज्ञान हाच मानवाचा खरा डोळा आहे आणि वाचन हे त्या डोळ्याचे तेज आहे."

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१५/१/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...