उगवतीचे रंग
वारसा : काय आणि कितीचा
एका उद्योगपतीचं निधन झालं तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेच्या प्रसंगी जमलेली मंडळी चर्चा करीत होती की त्यानं किती धन मागे ठेवलंय ? करोडोंचा बँक बॅलन्स, कित्येक किलो सोनं, कारखाने, बंगले, गाड्या इ. लोकांच्या दृष्टीनं ' किती ' ही गोष्ट महत्वाची होती. एखादा भ्रष्ट राजकारणी देखील आपल्या आयुष्यात प्रचंड ' माया ' कमावतो. ' प्रेम ' नाही. तो गेल्यानंतर लोकांमध्ये चर्चा सुरु होते की त्याने ' किती ' धन मागे ठेवलंय ? लोकांच्या दृष्टीनं ' किती ' महत्वाचा ! खरं तर ' काय ' आणि ' किती ' हे केवळ प्रश्नार्थक शब्द नाहीत. ती जीवनमूल्ये आहेत. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्यानं ' काय ' मागे ठेवलंय हे कितीपेक्षा अधिक महत्वाचं.
एका व्यक्तीला वाचनाची प्रचंड आवड होती. प्रचंड ग्रंथसंग्रह त्याने जमवला. आयुष्यात फारसे धन त्याने कमवले नाही. पण हे ग्रंथरूपी धन मात्र त्याच्याकडे भरपूर होते. आपल्या अंत्यसमयी त्याने आपल्या मुलाला जवळ बोलावून सांगितले, " बाळा, मी तुझ्यासाठी फारशी संपत्ती ठेवू शकलो नाही. पण ही पुस्तके आहेत. हेच माझ्या दृष्टीने धन आहे. हा माझा वारसा आहे. हा जप. " मुलावरही त्या व्यक्तीच्या वागण्याचे संस्कार झाले होते. तो म्हणाला, " बाबा, तुम्ही विचारांचा वारसा मागे ठेवून जात आहात. तो माझ्यासाठी महत्वाचा आहे. पैसा मी माझ्या कर्तृत्वाने मिळवीन. पण तुम्ही दिलेला वारसा जीवापाड जतन करीन, तो वाढवेन. " इथे कितीपेक्षा ' काय ' महत्वाचे !
सामान्य माणसं जेव्हा ' कितीचा ' विचार करतात तेव्हा त्याला जोडून आणखी प्रश्न त्यांच्या डोक्यात यायला हवा. तो म्हणजे ' कसं '. खूप काही कमावलं. पैसा, सोनंनाणं, बंगले, गाड्या इ. आयुष्यात पैसा,धन महत्वाचं तर आहेच ! पण ते ' कसं ' याला महत्व आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ' जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ' असं ते आहे का ?असं धन असेल तर ती लक्ष्मी ! नाहीतर ती नुसतीच संपत्ती. ' किती ' कमावलं याचीच आपण मोजदाद करत बसतो, नाही का ? पण कितीच्या आकड्यांच्या गर्दीत एक महत्त्वाचा प्रश्न राहूनच जातो. तो म्हणजे हे ' किती ' ' कसं ' कमावलं ? ' किती ' चा हव्यास आयुष्यभर संपत नाही. पण ते मिळवण्याच्या नादात आपण खूप काही गमावून बसतो. कितीच्या जगात चमक आहे, गजबज आहे. या जगाला आकड्यांची भूक असते. बँक बॅलन्स किती, जागा किती, प्रतिष्ठा किती ? आणि गंमत म्हणजे किती कमावलं याची माहिती सहज मिळते, पण ते कसं कमावलं याची खबर फार कमी लोक घेतात. कितीला जोडून कसं हा शब्द सहजपणे येतच नाही. कारण कसं मध्ये प्रश्न आहेत… आणि कितीमध्ये गर्व. कसं मध्ये उत्तरदायित्व आहे… आणि कितीमध्ये टाळ्या ! कधी कधी या कितीचा दबदबा इतका वाढतो की ' कसं ' चा प्रकाश दिसेनासा होतो.
फार थोड्या व्यक्ती अशा असतात की ज्यांच्या बाबतीत ' काय ' आणि ' किती ' दोन्हींचे मूल्य अपरंपार असते. सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती. जे आर डी टाटा आणि रतन टाटा. यांच्यासारख्या व्यक्तींच्या संपत्तीचे मूल्य तर कित्येक कोटींच्या घरात जातेच पण त्यांनी आयुष्यभर ज्या मूल्यांचा पाठपुरावा केला, ती मूल्ये चिरंतन आहेत. सर्वांसाठीच मार्गदर्शक आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा