उगवतीचे रंग
सोडा रेडी टू इट, खा घरचेच नीट
काही दिवसांपूर्वी अमरावती येथील डॉक्टर अविनाश सावजी चाळीसगावला आमच्या शेठ ना बं वाचनालयात व्याख्यानासाठी आले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात दुकानात तयार मिळणारे खाद्यपदार्थ आपल्या आरोग्यासाठी कसे हानिकारक आहेत हे उदाहरणासहित समजून दिले. त्याचा श्रोत्यांवर मोठा प्रभाव पडला. सांगणारी व्यक्ती एक तज्ज्ञ डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या बोलण्याला महत्त्व होते. रेडी टू इट पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांची बनवेगिरी अशी की ते आपल्या पदार्थांच्या वेष्टनावर जे काही लिहितील त्याचा समावेश त्यात असेलच असे सांगता येत नाही. दिसते तसे नसते. जे आपण पाहू नये किंवा वाचू नये असे त्यांना वाटते ते कुठेतरी बारीक अक्षरात लिहिलेले असते.
आपल्या घरच्या पदार्थांमध्ये जास्त तेल, जास्त मसाले आपण वापरत नाही. त्यात प्रिझर्वेटिव्ह चा वापर करत नाही. या पदार्थांची चव हॉटेलमधील पदार्थांसारखी लागली नाही तरी आरोग्यासाठी ते सर्वोत्तम असतात म्हणून आपल्या जिभेला घरात बनवलेले पदार्थ खाण्याची सवय लावून घ्यावी. स्वयंपाकात कुशल असणाऱ्या गृहिणींना घरातील सदस्यांना आवडतील असे अन्नपदार्थ कसे बनवायचे याची कला अवगत असते.
पूर्वी एकदा अशीच एक बातमी मी पेपरमध्ये वाचली होती. न्यूझीलंडमधील एक सुखवस्तू कुटुंब आहे. लिडिया ही पती व चार मुलांसोबत राहते. दोघेही नोकरी करीत असल्याने स्वयंपाक बनवण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे नेहमी फास्टफूड किंवा रेडी टू ईट फूड घेत . काही दिवसांनी त्यांना आढळले की त्यांचा लहान मुलगा ॲस्टन हा खूप आजारी असून त्याला असह्य वेदना होत आहेत. आणि तो दोन घासही खाऊ शकत नाही. त्या डॉक्टरकडे त्याला घेऊन गेल्या. डॉक्टरांनी केमिकल अलर्जीचे निदान केले. अलर्जीतील रासायनिक घटक खाद्यपदार्थांमध्ये आढळत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हापासून त्यांनी आपल्याला कळत नसलेल्या घटकांची माहिती गुगल सर्चवरून शोधली. अनेक मंहिन्यांच्या प्रयत्नानंतर त्यांना धक्कादायक निष्कर्ष मिळाले. आपण जे पाकिटबंद अनेक पदार्थ खातो त्यामध्ये त्यांना अनेक धोकादायक रसायने आढळली. त्यांना असे आढळले की आपण जे खातो ते खाद्यपदार्थच नाहीत. तेव्हापासून त्यांनी बाहेरील खाद्यपदार्थ आणणे बंद केले . आपली नोकरी सोडली आणि घराजवळ शेती खरेदी केली. घरासाठी लागणाऱ्या भाज्या, फळे इ. तेथे लावण्यास सुरुवात केली. लिडिया व त्यांच्या पतीने हे काम आव्हान म्हणून स्वीकारले आहे. त्यांनी याला बॅक टू बेसिक्स असे नाव दिले असून या नावाचे त्यांचे फेसबुक पेजही आहे. ( संदर्भ: दिव्य मराठी दि. ११/२/२०१७ )हे पाकिटबंद पदार्थांचे आणि रेडी टू ईट पदार्थांचे लोण आपल्याकडेही मोठ्या प्रमाणात पसरत चालले आहे. आज भारतातील मुंबई पुण्यासारख्या अनेक शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या स्रियांना वेळ नसल्यामुळे असे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे सध्या जी मॉल संस्कृती निर्माण झाली आहे ती पण काही अंशी याला कारणीभूत आहे. मॉलमध्ये जाणे आणि खरेदी करणे हे गरजेपेक्षा जास्त हौशीचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे. मॉलमध्ये फिरत असताना आपण अशा अनेक पदार्थांची खरेदी करतो की जे आवश्यक नसतात. त्यामध्ये खाण्याच्या पाकिटबंद पदार्थांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यात आपल्या आवडीचे अनेक पदार्थ असतात. काही तयार पदार्थ आणि काही रेडी टू कूक . जसे ढोकळे, बाकरवडी ,गुलाबजाम इ. अनेक भाज्यांची पाकिटेही मिळतात. असे अनेक पदार्थ दुकानांमध्ये मिळतात. मंडळी, या पदार्थांचे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्यात अनेक धोकादायक रसायने ,म्हणजेच प्रिझर्वेटिव्हज वापरलेले असतात. तेव्हा भरमसाठ पैसे देऊन असले पदार्थ खरेदी करून आपण आपल्या आरोग्याची हानी करून घेत असतो.
आपल्या व्याख्यानात डॉ. अविनाश सावजी असे म्हणाले की या संदर्भात गांधीजींनी सांगितलेले एक साधे सोपे सूत्र आपण लक्षात ठेवू या. गांधीजी म्हणाले होते जे पदार्थ नाशिवंत असतात किंवा लवकर नासतात ,कुजतात ते पदार्थ आरोग्यास चांगले असतात. मी जेव्हा हे प्रथम ऐकले तेव्हा मला सुरुवातीला त्यांचे विधान विचित्र वाटले. की नाशिवंत पदार्थ आरोग्याला चांगले कसे असतील ? हा वरवर पाहता विरोधाभास वाटतो. पण ते खरे आहे. उदा. आपल्या घरी बनवलेली भाजी, पोळी,भाकरी लवकर खराब होते. दुसऱ्या दिवशी ते पदार्थ शिळे होतात. हे नाशिवंत पदार्थ आहेत. ते ताजे असतानाच आपण खातो आणि खाल्ले पाहिजेत. जेवढे आपण घरी बनवलेले ताजे पदार्थ खाऊ तेवढे आपले आरोग्य चांगले राहील.
तेव्हा शक्य तो घरी बनवलेले पदार्थच खाऊ या. शिवाय ते पदार्थ मोठ्या प्रेमाने आपल्या आईने, पत्नीने बनवलेले असतात त्याची सर बाहेरच्या पदार्थाना कशी येणार ?
©विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा