उगवतीचे रंग
आपण आहोत तोवर...
दिवाळी सुरू आहे. काल नरक चतुर्दशी होती. भल्या पहाटे एका जवळच्या नातेवाईकांचा फोन आला. त्यांनी प्रेमाने शुभेच्छा दिल्या,“ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ” आणि लगेचच थोड्या खिन्न स्वरात म्हणाले, " आता सकाळी लवकर उठणारी, पहाटे अभ्यंग स्नान करणारी बहुदा आपलीच पिढी आहे. कारण मुलांना कितीही सांगितले तरी त्यांना त्याचे महत्त्व नाही. त्यांची कारणे वेगळी असतात."
" बरोबर आहे "मी म्हणालो. त्यांनी फोन ठेवला पण ते जे काही म्हणाले त्यावर माझे मन विचार करू लागले. खरंच, आपणच ती पिढी आहोत जी अजूनही पहाटे उठून उत्साहाने या सगळ्या गोष्टी करते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे पाच वाजताच रेडिओवर कीर्तन लागायचे ते ऐकूनच जाग यायची. एक वेगळाच उत्साह असायचा. आपल्याकडे घरात वृद्ध आई असेल तर ती अजूनही आपल्याला लवकर उठवते. आपण सगळे उत्साहाने उठतो. आंघोळीपूर्वी अंगाला सुगंधी तेल लावतो. अंघोळ करताना सुगंधी उटण्याचा खरखरीत स्पर्श अनुभवतो, अंगणात दिवे लावतो, देवघर उजळवतो. घराघरात अजूनही आई-वडील, आजी-आजोबा यांचे प्रेमळ स्वर आणि त्यांच्या पावलांचा नाद ऐकू येतो. देवाला नमस्कार केल्यानंतर त्यांना नमस्कार करतो. मागच्या पिढीने आपल्याला सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपण पाळतो आहोत. पण पुढच्या पिढीचे काय ? ते जपतील का या परंपरा ?
माझी सौ. मला नेहमी म्हणते, “ अहो, आपण आहोत तोपर्यंत हे सणवार टिकतील. पुढचं काही सांगता येत नाही.” तिचं म्हणणं खरं आहे. आपली पिढी अजून काही प्रमाणात तरी परंपरा जपते आहे. पण असं वाटतं की आजच्या पिढीसाठी दिवाळी म्हणजे बहुधा ऑफर्स, सेल्स आणि रील्सचा सण !
एक गोष्ट विशेषत्वाने जाणवते ती ही की
नातेसंबंध टिकवून ठेवणारी, संपर्क साधणारी, सणाच्या दिवशी “ तुम्ही कसे आहात ?” हे विचारणारी अजूनही आपलीच पिढी आहे. आपल्या नातेवाईकांशी संबंध जपणं, त्यांचं सुख-दुःख विचारणं हे आपल्याला आपल्या संस्कारांनी दिलं आहे.
पण पुढची पिढी जपेल का हे मायेचे आणि प्रेमाचे हळुवार बंध ? ही शंका कधी कधी मनाला बेचैन करते.
आपण अपेक्षा करतो त्यांच्याकडून पण त्यांचीही काही एक बाजू असू शकते. कदाचित त्यांना वेळ मिळणार नाही.
किंवा त्यांना तसं गरजेचं वाटणारही नाही.
कारण त्यांच्या आयुष्यात गती आहे, कामाचा ताण आहे, स्पर्धा आहे. जगण्याची व्याख्या वेगळी होत चालली आहे.
त्यांच्याकडे एकमेकांशी जोडणारं वेगवान नेटवर्क आहे, पण नात्यांचंजाळं विरळ होत चाललं आहे.
आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा डोळ्यांतले भाव बोलतात. फार काही सांगावं लागत नाही. स्पर्शाची भाषा खूप बोलकी असते. पाठीवरचा आश्वासक हात, प्रेमळ मिठी सगळं काही सांगून जातात. पण पुढच्या पिढीची भाषा स्क्रीनवर इमोजीमध्ये व्यक्त होताना दिसते आहे. कधी कधी प्रश्न पडतो की आपले हे संस्कार, परंपरा कायम राहतील का ? की हा एक इतिहास बनून जाईल ?
पण मी याबाबत आशावादी आहे. काळया ढगाला एक रुपेरी किनार असते. तसाच हा आशावाद ! मला वाटतं सगळं नाहीसं होणार नाही. परंपरा आणि नाती दोन्ही हळुवार धाग्यांनी काळाशी जुळत राहतात. आजची पिढी कदाचित वेगळ्या रूपात, वेगळ्या माध्यमातून हे सण साजरे करेल हे नक्कीच. पण जर त्या उत्सवात आपुलकीचा एक दिवा तरी पेटला, तर या आपल्या उज्वल परंपरांचा प्रकाश कमी होणार नाही.
पण फक्त असं म्हणून भागणार नाही. स्वस्थ बसून चालणार नाही. आपण आहोत तोवर ही परंपरा जिवंत ठेवायची जबाबदारी आपलीच आहे. ही करताना आपण पुढच्या पिढीला इतकंच सांगायचं की बाळांनो,
सण साजरा करणं म्हणजे फक्त विधी किंवा औपचारिकता नव्हे. सण म्हणजे नात्यांना उजाळा देण्याची, आजच्या भाषेत सांगायचे तर नातेसंबंध रिन्यू करण्याची सुवर्णसंधी आहे.”
आणि आता ही संध्याकाळ येते आहे. आपण हातात दिवे घेऊन उभे आहोत, त्यांच्या ज्योती अजूनही प्रकाशमान आहेत. हा प्रकाश आपण उपभोगला, आता तो वारसा पुढे द्यायचा आहे. आपल्या हातातील हे दिवे, हा प्रकाश पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायचा आहे.
त्यांच्या हातात तो गेला की, आपल्या जगण्याचे सार्थक झाले असे म्हणता येईल.
मग आपल्याला म्हणता येईल -
दिवे लागले रे दिवे लागले
तमाच्या तळाशी दिवे लागले.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२१/१०/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा