मुख्य सामग्रीवर वगळा

कागज के फूल

उगवतीचे रंग 

कागज के फूल 

परवा मला एका गृहस्थांचा सकाळी सकाळी फोन आला. माझा लेख त्यांना आवडला होता म्हणून त्यांनी फोन केला. मग त्यांनी माझ्या पुस्तकांची चौकशी केली. कोणती पुस्तके आहेत, कोणत्या विषयावर लिहिलेली आहेत वगैरे. मला आनंद झाला पण तो आनंद क्षणिकच टिकला. कारण ते मला म्हणाले मला पुस्तके नकोत. मला असे लेख असतील तर पाठवत जा. मला त्यांच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले आणि वाईटही. माझे पुस्तके नकोत म्हणून वाईट नाही वाटले. परंतु पुस्तकांना नाकारण्याची ही प्रवृत्ती मला योग्य वाटली नाही. परंतु मी म्हटले की ठीक आहे मी तुम्हाला लेख पाठवत जाईन. 

दुसरे एक गृहस्थ माझ्या गावातीलच होते. ते देखील माझ्या लेखांचे वाचक होते. एकदा ते मला भेटले आणि म्हणाले की तुमचे लेख मी नेहमी वाचतो. खूप छान असतात. तुमची पुस्तके कुठे मिळतील ? मी त्यांना म्हटलं की माझ्याकडे पुस्तके आहेत. तुम्हाला देऊ का ? मग म्हणाले," मला विकत नको. लायब्ररीत पुस्तके आहेत का तुमची ? म्हटलं हो आहेत. मग म्हणाले," मी तिथून घेऊन वाचेन. " मी स्वतःशी म्हणालो," हरकत नाही. कुठून का होईना, पुस्तक घेऊन वाचल्याशी कारण !" 

काही दिवसांपूर्वी मी पुण्यात गेलो होतो. गणेशोत्सवापूर्वीचे ते दिवस होते. एका ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त सजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन भरले होते. त्या प्रदर्शनाबाहेर एका प्रकाशकाने आपल्या प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेली पुस्तके प्रदर्शित केली होती. सजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन पाहण्याआधी किंवा नंतर लोकांनी येऊन किमान आपल्या स्टॉलवरील पुस्तके चाळावीत अशी त्यांची अपेक्षा होती. काही प्रमाणात तसे झालेही. पण पुस्तक विक्रीचा प्रतिसाद मात्र फारसा आशादायी नव्हता.  त्या स्टॉलवर एक वृद्ध जोडपे आले. त्यांनी बराच वेळ तेथील पुस्तके चाळली. मग म्हणाले," अहो, हल्ली मराठी पुस्तके कोणी वाचत नाहीत. " म्हणजे त्यांनी एखादे पुस्तक तर घेतले नाहीत परंतु अशा प्रकारचे उद्गार काढून मराठी माणसांचा आणि त्या प्रकाशकाचा एक प्रकारे अपमानच केला. एका बाजूला आपण मराठी वाचवली पाहिजे, जगवली पाहिजे असे म्हणतो. मराठी अभिजात भाषा आहे म्हणून तिचा अभिमान बाळगतो आणि दुसऱ्या बाजूला हे असे विपरीत वागणे...?

त्या उलट बंगालमधील माणसे. बंगालमधील माणसांच्या घराघरात रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चॅटर्जी, शरदचंद्र आदी तेथील प्रख्यात साहित्यिकांची पुस्तके हटकून आढळतील. मराठी माणूस मात्र याबाबतीत खूप मागे आहे असे म्हणावे लागेल.

काही दिवसांपूर्वी मात्र एक आशादायक गोष्ट घडली. आमच्या शाळेतील एक ज्येष्ठ शिक्षक वृद्धापकाळमुळे वारले. त्यांना स्वतःला आणि त्यांच्या मुलाला वाचनाची खूप आवड. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ जमलेल्या लोकांना आपण पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृती जोपासावी असे वाटले आणि त्याने त्यांच्या उत्तरकार्याच्या दिवशी जमलेल्या लोकांना माझी पुस्तके भेट म्हणून वाटली. हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम त्याने केला. 

या लेखाचे शीर्षक मी ' कागज के फूल ' असे दिले आहे. खरंतर कागदी फुलांना सुगंध नसतो. परंतु माझ्या दृष्टीने पुस्तके म्हणजे कागदाची सुंदर फुले. त्यांना रंग, रूप, सुगंध सगळे काही आहे. पुस्तक हातात घेतल्याचा आनंद म्हणजे एखाद्या नाजूक फुलाचा सुगंध घेतल्यासारखा असतो. 

जेव्हा मी स्वतःचे पुस्तक पहिल्यांदा हातात घेतले तेव्हा मला वाटले – जणू हे कागदाचे फूल उमलले आहे आणि माझ्या परिश्रमांचा गंध पसरवत आहे. त्या पानापानांत माझ्या डोळ्यांचे स्वप्ने होती, जागरणाच्या रात्री होत्या, आणि स्वप्नांचे रंग होते.

आजही आठवतो तो क्षण – माझ्या गावातल्या एका वाचकाच्या घरी मी गेलो होतो आणि माझेच पुस्तक त्यांच्या कपाटात ठेवलेले पाहिले. जणू त्या घरात माझ्या शब्दांचे फूल उमलले होते. लेखकासाठी याहून मोठा आनंद काय असू शकतो? पण या आनंदासोबत काही हळवे क्षणही आले. जेव्हा काही वाचकांनी म्हटले," आम्हाला पुस्तके नकोत. आम्हाला नुसते लेख पाठवत जा."

हे ऐकताना मनाला चटका बसला. आपण हॉटेलमध्ये सहज हजार-दोन हजार रुपये खर्च करतो, एका कॉफीसाठी दोनशे रुपये देतो, मोबाईल रिचार्जवर शेकडो रुपये घालवतो, पण पुस्तकासाठी दोनशे-पाचशे रुपये खर्च करताना मात्र विचार करतो. माझी पुस्तके कोणी घेतली किंवा न घेतली म्हणून मला वाईट वाटत नाही. परंतु एक प्रकारे वाचन संस्कृतीलाच आपण अशा रीतीने नाकारतो आहोत म्हणून वाईट वाटते. शिवाय जी व्यक्ती आपल्याला लेखनाद्वारे आनंद देते, नवीन विचार देते अशा व्यक्तीसाठी दोन पाचशे रुपये खर्च करायला आपण इतका विचार का करतो ?

कोणत्याही लेखकाला हे पैसे केवळ मोबदला म्हणून नको असतात, तर ते त्याच्या परिश्रमांचे आणि भावविश्वाचे मानपत्र असते. पुस्तक प्रकाशित झाले की अभिनंदनाचे मेसेज येतात – "छान!" "शुभेच्छा! अभिनंदन ! " पण " मला हे पुस्तक हवे आहे " असे म्हणणारा वाचक विरळाच.

पुस्तक प्रकाशन समारंभाला येणारे अनेक जण फक्त भाषण ऐकून, चहापाणी करून निघून जातात. कागदाचे हे फूल तेव्हा एकाकी आणि उदासवाणे वाटते. 

पण मला वाटते –

हे फूल म्हणजे काही उत्तम आणि  दर्जेदार पुस्तके सर्वांच्या घरात असावीत.  मग ती माझीच नव्हे तर इतर कोणत्याही मान्यवर लेखकांची असली तरी चालतील.

पुस्तक म्हणजे केवळ विचारांचा संच नाही, तर एक अमूल्य ठेवा आहे.

आपल्या मुलांना, नातवंडांना दाखवण्याजोगा वारसा आहे.

जसे आपण घरात शोभेच्या वस्तू ठेवतो, तशा या विचारांच्या फुलांनी घर सजले पाहिजे.

संध्याकाळच्या चहासोबत हे पुस्तक हातात घेऊन वाचले पाहिजे.

कुटुंबात त्यावर चर्चा झाली पाहिजे.

कारण विचारांवर केलेला खर्च हा सर्वांत सुंदर आणि टिकाऊ गुंतवणूक आहे.

आणखी एक गोष्ट –

पुस्तके ही वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा कोणत्याही विशेष दिवसासाठी देण्यास सर्वोत्तम भेट आहेत.

फुले दुसऱ्या दिवशी कोमेजतात, गिफ्ट रॅपर फाडून फेकला जातो, पण पुस्तकाचे आयुष्य दीर्घ असते. ते वारंवार उलगडले जाते, पुन्हा पुन्हा वाचले जाते आणि घरातल्या प्रत्येकाला नवा विचार देऊन जाते. अशा भेटीमुळे तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या नात्यात एक नवा बौद्धिक सुगंध पसरतो.

वाचनसंस्कृती वाचवायची असेल, तर पुस्तकासाठी केलेला खर्च हा सवय आणि जबाबदारी दोन्ही झाला पाहिजे. कारण पुस्तक विकत घेणे म्हणजे फक्त लेखकाचा सन्मान नाही, तर आपल्या मनात विचारांचे फूल उमलवणे आहे.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१४/९/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...