उगवतीचे रंग
तिरंग्याखालील सावल्या
१५ ऑगस्ट १९४७. भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस...! — त्या दिवशी लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा केवळ झेंडा नव्हता; तो लाखो बलिदानांचे उत्तर, स्वप्नांचे प्रतीक होता. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशभक्तांनी तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठड्या जवळ केल्या, फासावर हसत हसत गेले, आणि आपल्या कुटुंबाचा, सुखाचा, आयुष्याचा होम केला. आज ७८ वर्षे पूर्ण करून स्वातंत्र्याच्या ७९व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत.
आपल्यापैकी बहुतेक जणांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला आहे. ब्रिटिशांची जुलमी सत्ता संपली होती, आणि आपण स्वातंत्र्याच्या श्वासात जन्मलो. परंतु स्वातंत्र्याचा खरा अर्थ — केवळ परकीय सत्तेतून मुक्त होणे नाही. स्वातंत्र्य म्हणजे नव्या विचारांची दिशा, जबाबदारीची जाणीव, आणि विधायक जीवनपद्धती. आज, ही जबाबदारीची जाणीव मात्र कुठेतरी हरवत चालली आहे. भ्रष्टाचार, जातीय भांडणं, प्रदूषण, महागाई, बेरोजगारी — हे सारे प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभे आहेत.
आपला तिरंगा — आपल्या स्वातंत्र्याचा, बलिदानांचा आणि अभिमानाचे जिवंत प्रतीक. तो उंचावर फडकताना आपल्या मनात उत्साह, अभिमान दाटून येतो. आपल्या मनात तो प्रेरणा जागवतो. पण या उंचावलेल्या तिरंग्याच्या खाली, आपल्या तरुणाईच्या भवितव्यावर काही सावल्या गडद होत चालल्या आहेत. त्या अदृश्य शत्रूंच्या रूपाने तरुण पिढीच्या स्वप्नांवर आक्रमण करत आहेत. त्या सावल्या आहेत ताणतणाव, नैराश्य, डिजिटल व्यसन, आणि गळेकापू स्पर्धा यासारख्या भयंकर. जर या सावल्या वाढत गेल्या, तर तिरंग्याखालील तेज आणि स्वातंत्र्य दोन्ही दुर्बल होण्याचा धोका आहे. म्हणूनच आज, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, आपल्याला या नव्या शत्रूंना ओळखून त्यांच्याशी सामना करणे आवश्यक आहे. हे शत्रू बाहेरचे नाहीत; ते आपल्या समाजात, शिक्षणपद्धतीत, आणि जीवनशैलीत लपलेले आहेत. प्रचंड स्पर्धा, त्यातून निर्माण होणारा ताणतणाव, पालकांच्या अपेक्षांचे ओझे, आणि मानसिक गोंधळ — या सगळ्यामुळे आजचा तरुण हतबल होत आहे. काही जण नैराश्यात बुडत आहेत, तर काही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत.
एका अहवालानुसार भारतात दर ५२ मिनिटांनी एक विद्यार्थी आत्महत्या करतो. म्हणजेच, दिवसाच्या प्रत्येक तासात, देशाच्या एखाद्या कोपऱ्यात एक पालक आपलं लेकरू गमावतो. स्पर्धा परीक्षा, आयआयटी, इंजिनिअरिंग, वैद्यकीय अभ्यास — या क्षेत्रांतील आर्थिक, मानसिक दबाव इतका वाढला आहे की अनेक जण त्याला तोंड देऊ शकत नाहीत. यासोबतच, मोबाईलचं व्यसन, व्हिडिओ गेम्स, वेब सिरीज, आणि सोशल मीडियाची आक्रमणं तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर घाला घालत आहेत.
अर्थात, संपूर्ण चित्र निराशाजनक नाही. आजही अनेक तरुण आपापल्या क्षेत्रात चमकत आहेत, समाजाला दिशा देत आहेत, आणि देशाचं नाव उज्वल करत आहेत. पण जे मागे पडत आहेत, किंवा ताणाखाली दबले आहेत, त्यांच्यासाठी मदतीचा, धीराचा आश्वासक हात पुढे करणे ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे.
यासाठी सुरुवात शिक्षण आणि संस्कारांपासूनच करावी लागेल. शिक्षण हे केवळ माहितीचा भडीमार न राहता, सुसंस्कारित आणि मानसिकदृष्ट्या सक्षम माणूस घडवणारे असावे. माहितीचे ओझे कमी करून, मानसिक बळ, सकारात्मक विचारसरणी, आणि कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी वाढवणारा शिक्षणाचा दृष्टिकोन आवश्यक आहे.
अब्राहम लिंकन यांनी आपल्या मुलाच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे — “त्याला जिंकायलाही शिका आणि हरायलाही.” हे शब्द फक्त एका मुलासाठी नाहीत, तर संपूर्ण पिढीसाठी मार्गदर्शक आहेत.
स्वातंत्र्याचे नवे शत्रू ओळखून, त्यांच्याशी लढणं — हीच आजच्या काळातील खरी देशभक्ती आहे. तिरंगा फडकत राहावा, आणि त्याखालील सावल्या नाहीशा व्हाव्यात — हीच आपल्या सगळ्यांची जबाबदारी.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१४/८/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा