मुख्य सामग्रीवर वगळा

मोल

 उगवतीचे रंग 

 मोल

श्रीमद भागवताच्या दशम स्कंधात आणि श्रीकृष्ण धारावाहिक मध्ये एक सुंदर कथा येते. गावभर फळांचा टोपली घेऊन फिरणारी एक म्हातारी. डोक्यावर उन्हाचा तडाखा, अंगावर श्रमांचा थकवा, पण ओठांवर परमेश्वराचे नाम. तिच्याजवळ ताजी आणि गोड फळे असतात ते संपूर्ण गाव फिरते आणि जी जी व्यक्ती समोर दिसते त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळील फळे घेण्याचा आग्रह करते परंतु दुर्दैव असे की कोणीच तिच्या जवळील फळे घेत नाही. तरीही परमेश्वरावरील तिचा विश्वास ढळत नाही — " ही परमेश्वराचीच इच्छा असावी. कधीतरी तो माझं ओझं हलकं करेल."


फिरता फिरता अखेर तिचे पाऊल अखेर कृष्णाच्या वाड्यासमोर थांबतं. तिथे फळ घ्या फळ म्हणून दोन-तीन वेळा आवाज देऊन ती विश्रांतीसाठी खाली बसते. योजना जणू ईश्वराचीच असावी. विश्रांती तिथेच मिळणार आणि श्रमही तेथेच हरण होणार.


तिचा आवाज ऐकून निरागस गोड असा छोटा कृष्ण घरातून बाहेर येतो. ती कृष्णाला पाहून आनंदते. " बेटा, ताजी गोड फळं आहेत. घे ना. "

कृष्ण म्हणतो, " ती सगळीच फळं मला दे. "

म्हातारी आनंदली. म्हणाली, " हो हो देईन बाळा, पण मोल द्यावं लागेल."

कृष्ण निरागसपणे विचारतो, " मोल म्हणजे काय ?" 

ती समजावून सांगते —

"लल्ला, आपण जेव्हा कोणाकडून काही घेतो, तेव्हा त्याच्या बदल्यात काही तरी देतो, त्यालाच मोल म्हणतात."

कृष्णाचं बोलणं मोठं गोड आणि मन मोहून घेणारं आहे. तो तिला म्हणतो, "माझी आई तर मला रोज दही, दूध, लोणी देते. मला हवं ते सगळं सगळं देते. पण माझ्याकडून कधी काही घेत नाही. मग ती मोल का मागत नाही ? गोपी सुद्धा मला दही दूध लोणी देतात माझ्यावर खूप प्रेम करतात पण त्या माझ्याकडून काही घेत नाहीत. "

त्या बालसुलभ प्रश्नानं  म्हातारी विचारात पडते. हा प्रश्न आपल्यालाही विचारमग्न करतो. आणि सत्य उलगडतं. ' खरं मोल प्रेमाच्या नात्यांत असतं, पैशांत नव्हे. प्रेमाचं मोल किंवा किंमत केली जाऊ शकत नाही.' 


पण तरीही तिला काहीतरी द्यायचं म्हणून बालसुलभ भावनेतून कृष्ण म्हणतो, "मी तुला मिठी मारली, तुला आई म्हटलं, तर चालेल का ?" 

म्हातारी थबकते. तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं.

"मी खालच्या जातीची बाळा, माझं एवढं भाग्य कुठे ?" पण कृष्ण तिच्या जवळ जातो. त्याच्या कोमल हातांची मिठी तिच्या गळ्याभोवती पडते. यापेक्षा दुसरं मोठं भाग्य कोणतं ? तो तिला आपल्या निरागस स्पर्शाने आईचा मान देतो. म्हातारीचे सगळे श्रम हरण होतात. तिला जणू स्वर्ग मिळाल्याचा भास होतो. 

या कथेत पुढे असेही म्हटले आहे की कृष्ण तिला देण्यासाठी घरातून धान्य घेऊन येतो. परंतु आणता आणता बरेचसे त्याच्या हातून सांडते. परंतु जे काही थोडे त्याच्या हातात उरलेलं असतं ते तो त्या म्हातारीला देतो. आणि म्हातारी जेव्हा घरी जाते तेव्हा त्या धान्याच्या मोजक्या दाण्यांचे रूपांतर दुर्मिळ रत्न आणि हिरे माणकांमध्ये झालेले असतं.

हा प्रसंग आपल्याला जणू सांगतो — देवाजवळ जातीपातीचे बंधन नसते. उच्च नीच, लहानथोर असे कुठलंही बंधन नसतं.

जातीपातीच्या भिंती तर आपणच उभ्या केल्या आहेत. मानवाने उभ्या केलेल्या या भिंती परमेश्वरापुढे निरर्थक आहेत. त्याला फक्त भोळा भाव, भक्ती प्रिय आहे.

म्हणूनच त्या म्हातारीची भक्ती, तिचा विश्वास फळाला आला.

गावाने तिला नाकारले पण परमेश्वराने स्वतः तिच्या टोपलीतील फळे स्वीकारली. तिला आईचा मान दिला. तिचे जीवन कृतार्थ झाले.

हीच खरी भक्तीची कमाई.

परमेश्वरापुढे केवळ श्रद्धेचे मोल असते. सोने नाणे, पैसे अडका, उच्च नीच यासारख्या गोष्टी त्याच्यापुढे व्यर्थ ठरतात.

गोपिकाही कृष्णाकडून काहीच घेत नव्हत्या. उलट त्या त्याला दही, दूध, लोणी देत होत्या. त्यांच्याजवळ समर्पण भाव होता.

त्यांच्या भक्तीत "देणं" होतं, "घेणं" नव्हतं.

यातच खऱ्या मोलाची व्याख्या दिसते. आपण सर्वसामान्य माणसं ! आपल्याला घेणं माहिती असतं परंतु देणं फार कमी !

आजच्या दिवसात खरं निरपेक्ष प्रेम दुर्मिळ होत चाललं आहे. आज आपण प्रत्येक नातं, प्रत्येक कृती पैशात मोजतो.

आईच्या मायेचं मोल काय?

मित्राच्या आधाराचं मोल काय?

देशासाठी लढणाऱ्या सैनिकाच्या प्राणांचं मोल करता येईल ?

प्रेमाचा, करुणेचा, सन्मानाचा दर लावता येईल का?

कृष्णाच्या या छोट्याशा प्रसंगातून आपल्याला जाणवतं —

खरं मोल हे भावनेचं, भक्तीचं, नि:स्वार्थ देणगीचं असतं.

देवासाठी आणि जीवनासाठीही.

मोल म्हणजे — पैशाने विकत घेता न येणारी ती आत्मीयता.

कारण खरं मोल हे कधीच नाण्यांच्या खणखणाटात नसतं, ते असतं माणसाच्या हृदयातल्या नि:स्वार्थ भावनेत.

मोल नेहमीच पैशांत नसतं…! पैशात ते करता येतही नाही.

मोल जो जाणेल त्याच्यासाठी असतं.
ते आईच्या डोळ्यातल्या पाण्यात असतं.
ते मित्राच्या खांद्यावरच्या आधारात असतं.
ते भुकेल्याला दिलेल्या अन्नात आणि त्याच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या तृप्ततेत असतं.
ते मनुष्यत्वाच्या स्पर्शात असतं. धीराच्या शब्दात असतं.
प्रेमळ, आश्वासक स्पर्शाचे कधी मोल करता येईल का ?

कुसुमाग्रजांच्या ' कणा ' कवितेतील पाठीवर आधाराचा हात ठेवून लढणाऱ्या गुरुजींच्या आश्वासक स्पर्शाचं मोल होऊ शकेल का ? 

' जगाच्या पाठीवर ' या चित्रपटात एक सुंदर गाणं आहे. सिद्धहस्त कवी ग दि माडगूळकर यांचे शब्द आहेत. आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या अजरामर स्वरात हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतं.

नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम बाई मी विकत घेतला श्याम.

कवडी दमडी किंवा दाम म्हणजे पैसा दिला नाही. मग तरीही हा श्याम कसा विकत घेतला ? तर त्याचं उत्तर गाण्यातच पुढे मिळतं. कवी म्हणतो - 
जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम.

हे त्याचं मोल आहे. आणि हे मोल देऊन ज्याला विकत घेतलं आहे तो कोणी साधासुधा नाही...
हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम... आहे.

तेव्हा मोल द्यायचं तर ते असं. आणि घ्यायची ती अमूल्य वस्तू !
"पैशाचे मोल संपतं, वस्तूचे मोल कमी होतं, पण प्रेमाचं, श्रद्धेचं आणि विश्वासाचं मोल कधीच कमी होत नाही."

खरं मोल हे पैशानं नव्हे, तर भावनेनं मोजायचं असतं. प्रश्न फक्त एवढाच आहे – आपण आपल्या नात्यांत आणि कृतींमध्ये अजूनही ‘मोल’ शोधतो ते नाण्यांत की नि:स्वार्थ प्रेमात ?"
आपल्या जीवनातलं खरं मोल काय – याचं उत्तर आपणच स्वतःला द्यायचं आहे."

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
२१/८/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...