उगवतीचे रंग
कबूतर जा जा जा...
सर्वोच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य टाकण्यास मनाई केल्याचं वृत्त आणि त्यावरून चाललेला वाद, त्याला दिलेला धार्मिक रंग आणि त्यावरून चालणारं राजकारण आपण सगळ्यांनी वर्तमानपत्रातून वाचलं असेल आणि टीव्हीवर बातम्यातून पाहिलं असेल. खरंच एखाद्या गोष्टीचं राजकारण करून किती विचका करतो आपण ! मुंबईच काय पण जवळपास सगळ्याच शहरातून कबुतर नावाच्या पक्ष्यानं ज्याला कपोत, पारवा वगैरे सारखी आकर्षक नावं दिली गेली, त्यानं नाकी नऊ आणलेत. जिकडे पाहावं तिकडे कबुतरं दृष्टीस पडतात. ' समुंदर समुंदर यहांसे वहांतक...' असं एक गाणं आहे. त्या चालीवर ' कबुतर कबुतर यहांसे वहांतक...' असं गमतीनं म्हणावसं वाटतं. एकीकडे कबुतरांचा त्रास होतो म्हणून दारे, खिडक्या, गॅलरीला जाळ्या बसवायच्या आणि दुसरीकडे त्यांना खाद्य द्यायचा पण हट्ट धरायचा अशा तऱ्हेची दुटप्पी भूमिका आपणच घेऊ शकतो.
रस्त्यावरून चालताना एखाद्या चौकात शेकडो कबुतरं दाण्याच्या शोधात पंख फडफडवत एकदम उडाली की वाटतं जणू निळ्या आकाशात पांढऱ्या-राखाडी ढगांचा जल्लोष उठला आहे. डोळ्यांना सुखावणारा तो देखावा, पण आरोग्याच्या दृष्टीने मात्र गंभीर संकटाचा इशारा देणारा आहे. निसर्गाने या पक्ष्यांना उडण्यासाठी पंख दिले, आपलं अन्न स्वतः शोधण्याची प्रेरणा आणि शक्ती दिली आहे. जगण्यासाठी स्वातंत्र्य दिलं आहे. पण आपणच त्यांना आयतं अन्न पाणी देऊन परावलंबी बनवतो आहोत. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन आपण हा एक मोठाच अपराध करतो असंच म्हणावसं वाटतं.
कधी काळी आपल्या पूर्वजांनी कबुतरं पाळली ती संदेशवाहक म्हणून. युद्धात, संकटात ते धावून यायचे. आज मोबाईलच्या युगात त्यांची गरज नाही, शहरातल्या कबूतरखान्यांत आणि विविध चौकात कबुतरं मोफत मिळणाऱ्या अन्नावर जगतात. परिणामी त्यांची संख्या अनियंत्रित वाढली आणि त्यांच्यामागे आजारांची सावली पसरली. कबुतरांच्या पिसांमधून आणि विष्ठेतून सूक्ष्म जीवाणू हवेत तरंगतात. दिसायला निरागस असलेले हे पक्षी फुफ्फुसांवर आक्रमण करणारे अनेक आजार माणसापर्यंत पोहोचवतात. दमा, अलर्जी, डोळ्यांचे विकार वाढतात. आपण ज्यांना शांतीचं प्रतीक मानतो, तीच कबुतरं नकळत अस्वस्थतेचं कारण ठरतात. आज त्यामुळेच कबुतर जा जा जा असं म्हणण्याची वेळ आली आहे.
इमारतींच्या गॅलऱ्या, टेरेस, पाईपलाईन यांसारख्या जागांवर कबूतर-पारव्यांची घरटी आणि त्यांची विष्ठा साचत असल्याने दुर्मिळ, पण जीवघेणे फुफ्फुसाचे आजार वाढीस लागले आहेत. या आजारांमध्ये छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, खोकला, ताप असे लक्षणे दिसून येतात आणि उपचारांअभावी हा त्रास गंभीर स्वरूप धारण करू शकतो. केवळ वृद्ध, लहान मुले किंवा अॅलर्जिक व्यक्तींनाच नव्हे तर मधुमेह, कर्करोग, एड्स यांसारख्या रोगांनी पीडितांसाठीही हे आजार प्राणघातक ठरू शकतात. श्वसनरोग तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, कबूतर-पारव्यांच्या सान्निध्यात राहणाऱ्यांमध्ये अशा आजारांचा धोका ४० टक्क्यांनी वाढतो. असे असूनही अनेक ठिकाणी लोक श्रद्धेने, सवयीने किंवा करुणेने कबुतरांना अन्न घालताना दिसतात. अनेक ठिकाणी तर कबूतरखाने उभारले गेले आहेत. दादर कबूतरखाना बंद करण्याच्या निर्णयावरून विरोध झाला. यासाठी काहींनी आंदोलनही केले. सध्या भटक्या किंवा बेवारस कुत्र्यांचा विषय पण असाच ऐरणीवर आला आहे. अनेक लहान मुलांना किंवा वृद्ध माणसांना या कुत्र्यांनी जखमी केले आहे. त्यांच्या हल्ल्यामुळे काही मुले, लोक मृत्यूमुखी देखील पडले आहेत. तरी देखील काही प्राणीप्रेमींना या भटक्या कुत्र्यांचा कळवळा येतो आणि त्यांना ते अन्नपाणी देतात. पण आरोग्याचा विषय असताना भावनिक दृष्टिकोनाला कितपत प्राधान्य द्यावे, याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
माणसाला पाळीव प्राण्यांविना राहवत नाही. एकटे राहणाऱ्या माणसांना कुत्रा, मांजर, पोपट यांच्यासारखे प्राणी सोबत करतात. त्यांचे सखे सोबती बनतात. ही माणसाच्या जीवनातील पोकळी भरून काढतात. त्यांना जीव लावतात पण त्याचबरोबर हे प्राणी आपल्यासोबत आजारांचा धोका घेऊन येतात. कुत्र्यांपासून रेबीज, मांजरांपासून टॉक्सोप्लाझ्मोसिस, सशांपासून रिंगवर्म, तर पक्ष्यांपासून फुफ्फुसांना बाधणारे आजार होऊ शकतात. माया ठेवणं चुकीचं नाही, पण ती जबाबदारीशिवाय धोकादायक ठरते. आपण पाळलेला प्राणी लसीकरणाशिवाय, स्वच्छतेशिवाय राहिला तर त्याची माया एका संकटाची सुरुवात बनते. त्याची सुरुवात आपल्यापासून होऊ शकते.
अनेकांना कबुतरांना दाणे टाकणं ही पुण्याई वाटते. चौकातल्या कबूतरखान्याभोवती गर्दी करून लोक दाणे टाकतात आणि समाधान मानतात की आपण ‘धर्मकार्य’ केलं. पण प्रत्यक्षात आपण त्यांना स्वावलंबनापेक्षा परावलंबनाची सवय लावतो. जंगलातला पक्षी स्वतः अन्न शोधतो, भूतदया करता करता ही महत्वाची गोष्ट आपण विसरून गेलो आहोत.
आपला धर्म सांगतो प्राणिमात्रांवर प्रेम करा, पण विज्ञान सांगतं – त्या प्रेमात जबाबदारी सुद्धा असली पाहिजे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय हा धार्मिकतेवर गदा आणणारा नसून, नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करणारा आहे असं मला वाटतं कारण सर्वात महत्वाचं आहे ते आपलं आरोग्य. या प्राणिमात्रांवर माया करण्याच्या आपल्या वृत्तीला एक नवीन विधायक वळण आपल्याला देता येईल. त्याचा आपण कधी विचार केला आहे का ? मोकळे चौक, मोकळी मैदाने पक्ष्यांना दाणे टिपताना पाहण्यापेक्षा ती हिरवीगार झालेली पाहणं कोणाला आवडणार नाही ? जंगल तोड करण्याऐवजी जंगलं हिरवीगार करणं, जंगल लागवडीचं दिवसेंदिवस आक्रसत चाललेलं क्षेत्र वाढवणं कोणाला आवडणार नाही ? मग पक्ष्यांना त्यांचं खाद्य जंगलात मिळेल. त्यांचा मधुर किलबिलाट ऐकायला मिळेल. त्यांचं सहजीवन अनुभवायला मिळेल. चिमण्या, कावळे, पोपट, मैना सर्वच पक्षी आनंदी होतील. वाघ, हरणं, माकड, गवे यासारखे प्राणी मानवी वस्तीत येणारच नाहीत. तेव्हा कबुतरांचा कळवळा येणारांनी झाडं लावण्याचा वसा घ्यावा. आणि केवळ कबुतरच नाहीत तर सर्वच पक्ष्यांना त्यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून द्यावा.
न्यायालयाचा निर्णय म्हणजे एखाद्या आरशात आपलं खरं रूप पाहिल्यासारखं आहे. आरोग्याच्या रक्षणासाठी तो अपरिहार्य आहे. श्रद्धा आणि माया या भावना टिकल्या पाहिजेत, पण त्या विज्ञानाच्या प्रकाशात आणि जबाबदारीच्या छायेत. कबुतरांच्या उडीतलं सौंदर्य आपल्याला पाहायचंच आहे, पण त्यामागे लपलेली आजारांची काळी छायाही नजरेआड करून चालणार नाही.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
कबूतर जा जा जा...
सर्वोच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य टाकण्यास मनाई केल्याचं वृत्त आणि त्यावरून चाललेला वाद, त्याला दिलेला धार्मिक रंग आणि त्यावरून चालणारं राजकारण आपण सगळ्यांनी वर्तमानपत्रातून वाचलं असेल आणि टीव्हीवर बातम्यातून पाहिलं असेल. खरंच एखाद्या गोष्टीचं राजकारण करून किती विचका करतो आपण ! मुंबईच काय पण जवळपास सगळ्याच शहरातून कबुतर नावाच्या पक्ष्यानं ज्याला कपोत, पारवा वगैरे सारखी आकर्षक नावं दिली गेली, त्यानं नाकी नऊ आणलेत. जिकडे पाहावं तिकडे कबुतरं दृष्टीस पडतात. ' समुंदर समुंदर यहांसे वहांतक...' असं एक गाणं आहे. त्या चालीवर ' कबुतर कबुतर यहांसे वहांतक...' असं गमतीनं म्हणावसं वाटतं. एकीकडे कबुतरांचा त्रास होतो म्हणून दारे, खिडक्या, गॅलरीला जाळ्या बसवायच्या आणि दुसरीकडे त्यांना खाद्य द्यायचा पण हट्ट धरायचा अशा तऱ्हेची दुटप्पी भूमिका आपणच घेऊ शकतो.
रस्त्यावरून चालताना एखाद्या चौकात शेकडो कबुतरं दाण्याच्या शोधात पंख फडफडवत एकदम उडाली की वाटतं जणू निळ्या आकाशात पांढऱ्या-राखाडी ढगांचा जल्लोष उठला आहे. डोळ्यांना सुखावणारा तो देखावा, पण आरोग्याच्या दृष्टीने मात्र गंभीर संकटाचा इशारा देणारा आहे. निसर्गाने या पक्ष्यांना उडण्यासाठी पंख दिले, आपलं अन्न स्वतः शोधण्याची प्रेरणा आणि शक्ती दिली आहे. जगण्यासाठी स्वातंत्र्य दिलं आहे. पण आपणच त्यांना आयतं अन्न पाणी देऊन परावलंबी बनवतो आहोत. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन आपण हा एक मोठाच अपराध करतो असंच म्हणावसं वाटतं.
कधी काळी आपल्या पूर्वजांनी कबुतरं पाळली ती संदेशवाहक म्हणून. युद्धात, संकटात ते धावून यायचे. आज मोबाईलच्या युगात त्यांची गरज नाही, शहरातल्या कबूतरखान्यांत आणि विविध चौकात कबुतरं मोफत मिळणाऱ्या अन्नावर जगतात. परिणामी त्यांची संख्या अनियंत्रित वाढली आणि त्यांच्यामागे आजारांची सावली पसरली. कबुतरांच्या पिसांमधून आणि विष्ठेतून सूक्ष्म जीवाणू हवेत तरंगतात. दिसायला निरागस असलेले हे पक्षी फुफ्फुसांवर आक्रमण करणारे अनेक आजार माणसापर्यंत पोहोचवतात. दमा, अलर्जी, डोळ्यांचे विकार वाढतात. आपण ज्यांना शांतीचं प्रतीक मानतो, तीच कबुतरं नकळत अस्वस्थतेचं कारण ठरतात. आज त्यामुळेच कबुतर जा जा जा असं म्हणण्याची वेळ आली आहे.
माणसाला पाळीव प्राण्यांविना राहवत नाही. एकटे राहणाऱ्या माणसांना कुत्रा, मांजर, पोपट यांच्यासारखे प्राणी सोबत करतात. त्यांचे सखे सोबती बनतात. ही माणसाच्या जीवनातील पोकळी भरून काढतात. त्यांना जीव लावतात पण त्याचबरोबर हे प्राणी आपल्यासोबत आजारांचा धोका घेऊन येतात. कुत्र्यांपासून रेबीज, मांजरांपासून टॉक्सोप्लाझ्मोसिस, सशांपासून रिंगवर्म, तर पक्ष्यांपासून फुफ्फुसांना बाधणारे आजार होऊ शकतात. माया ठेवणं चुकीचं नाही, पण ती जबाबदारीशिवाय धोकादायक ठरते. आपण पाळलेला प्राणी लसीकरणाशिवाय, स्वच्छतेशिवाय राहिला तर त्याची माया एका संकटाची सुरुवात बनते. त्याची सुरुवात आपल्यापासून होऊ शकते.
अनेकांना कबुतरांना दाणे टाकणं ही पुण्याई वाटते. चौकातल्या कबूतरखान्याभोवती गर्दी करून लोक दाणे टाकतात आणि समाधान मानतात की आपण ‘धर्मकार्य’ केलं. पण प्रत्यक्षात आपण त्यांना स्वावलंबनापेक्षा परावलंबनाची सवय लावतो. जंगलातला पक्षी स्वतः अन्न शोधतो, भूतदया करता करता ही महत्वाची गोष्ट आपण विसरून गेलो आहोत.
आपला धर्म सांगतो प्राणिमात्रांवर प्रेम करा, पण विज्ञान सांगतं – त्या प्रेमात जबाबदारी सुद्धा असली पाहिजे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय हा धार्मिकतेवर गदा आणणारा नसून, नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करणारा आहे असं मला वाटतं कारण सर्वात महत्वाचं आहे ते आपलं आरोग्य. या प्राणिमात्रांवर माया करण्याच्या आपल्या वृत्तीला एक नवीन विधायक वळण आपल्याला देता येईल. त्याचा आपण कधी विचार केला आहे का ? मोकळे चौक, मोकळी मैदाने पक्ष्यांना दाणे टिपताना पाहण्यापेक्षा ती हिरवीगार झालेली पाहणं कोणाला आवडणार नाही ? जंगल तोड करण्याऐवजी जंगलं हिरवीगार करणं, जंगल लागवडीचं दिवसेंदिवस आक्रसत चाललेलं क्षेत्र वाढवणं कोणाला आवडणार नाही ? मग पक्ष्यांना त्यांचं खाद्य जंगलात मिळेल. त्यांचा मधुर किलबिलाट ऐकायला मिळेल. त्यांचं सहजीवन अनुभवायला मिळेल. चिमण्या, कावळे, पोपट, मैना सर्वच पक्षी आनंदी होतील. वाघ, हरणं, माकड, गवे यासारखे प्राणी मानवी वस्तीत येणारच नाहीत. तेव्हा कबुतरांचा कळवळा येणारांनी झाडं लावण्याचा वसा घ्यावा. आणि केवळ कबुतरच नाहीत तर सर्वच पक्ष्यांना त्यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून द्यावा.
न्यायालयाचा निर्णय म्हणजे एखाद्या आरशात आपलं खरं रूप पाहिल्यासारखं आहे. आरोग्याच्या रक्षणासाठी तो अपरिहार्य आहे. श्रद्धा आणि माया या भावना टिकल्या पाहिजेत, पण त्या विज्ञानाच्या प्रकाशात आणि जबाबदारीच्या छायेत. कबुतरांच्या उडीतलं सौंदर्य आपल्याला पाहायचंच आहे, पण त्यामागे लपलेली आजारांची काळी छायाही नजरेआड करून चालणार नाही.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१८/८/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा