उगवतीचे रंग
कहीं ये वो तो नहीं...
काही दिवसांपूर्वी संगीतकार मदन मोहन यांचा जन्मदिन होता. त्यादिवशी त्यांची आणि लतादीदींची खूप गाणी मनसोक्त ऐकली. एक गाणं मात्र मनात खोल रुतून बसलं... एखादं सुंदर मनमोहक कारंजं असतं ना.. ! त्याच्या तळाशी पाणी असतं पण ते पाणी आतून वर येतं आणि सुंदर आकार आणि सुंदर नर्तन करतं. मनाला प्रसन्नता देतं. त्याच्याकडे कितीही वेळ पाहिलं तरी मन भरत नाही. तसेच या गाण्याचे शब्द हृदयाच्या गाभाऱ्यातून उत्स्फूर्तपणे वर येत होते. एखादा अनाहत नाद जसा आतून फुलून वर यावा तसेच या गाण्याचे शब्द राहून राहून सारखे मनात घोळत होते. गाणं मनात रेकॉर्ड झालं होतं आणि प्रतिध्वनी जाणिवेच्या पातळीपर्यंत पोहोचून धडक देत होता. या कारंजाला वेगळ्या संगीताची गरज नव्हती.
गाण्याची सुरुवात किती हळुवार केली आहे लतादीदींनी...! जरासी आहट होती है... हे हळुवार शब्द येतात आणि मग आपण त्या गाण्यात गुंततच जातो. कैफी आजमी हे सुंदर या गीताचे कवी. आपल्या प्रियकराची वाट पाहणाऱ्या प्रेयसीच्या अंतर्मनात प्रवेश करून तिच्या अमूर्त भावनांना शब्दात बांधणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. पण ते अवघड काम कवीने सहज केले आहे. जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो तेव्हा आपली मनस्थिती किती नाजूक, हळुवार आणि संवेदनशील होते. मन वेडं होतं. प्रत्येक आवाजाला ( जरासी आहट ) असं वाटतं की तोच तर आला नाही ना ? कहीं ये वो तो नहीं ...?
या गीतात दोनच कडवी आहेत पण प्रत्येक कडवं अप्रतिम ! प्रत्येक कडव्यातलं सौंदर्य आणि गोडी वेगळी ! पहिल्या कडव्यात कवी म्हणतो...
छुप के सीने में कोई जैसे सदा देता है
शाम से पहले दिया दिल का जला देता है
है उसी की ये सदा, है उसी की ये अदा
कहीं ये वो तो नहीं..."
तो दुसरीकडे कुठे नाही, हृदयातच लपलेला आहे. तिथूनच म्हणजे अंतर्मनातून त्याचा आवाज येतो आहे. संध्याकाळ झाली की दिवेलागण होते पण याची किमया तर एवढी की संध्याकाळ होण्यापूर्वीच हृदयातील दीप त्याच्यामुळे प्रज्वलित होतो. हृदयातील अंधार दूर होतो. त्याचाच हा आवाज, त्याच्याच हालचालींची ही परिचित चाहूल...! मनाला, हृदयाला प्रकाशमान करणारी अशी ही प्रिय व्यक्ती !
दुसऱ्या कडव्यात कवी म्हणतो...
शक्ल फिरती है निगाहों में वोही प्यारी सी
मेरी नस-नस में मचलने लगी चिंगारी सी
छू गई जिस्म मेरा किसके दामन की हवा
कहीं ये वो तो नहीं..."
आता ती अंतर्बाह्य त्याच्या रंगात रंगून गेली आहे. तिच्या नजरेमध्ये आता फक्त ' तो ' आहे त्याची प्यारी, प्रिय छबी आहे. त्याशिवाय तिला दुसरं काहीच दिसत नाही. शरीराच्या रोमारोमात तो भिनलेला आहे. तो येण्याची चाहूल आता केवळ बाह्य राहिली नाही, ती चाहूल आतून येते आहे. तिचा रोम रोम पुलकित झाला आहे. म्हणून ती म्हणते मेरी नस नस मे मचलने लगी चिंगारी सी... त्याच्या येण्याचा संदेश घेऊन येणारा वारा माझ्या अंगाला जणू स्पर्शून गेला आहे...! इतक्या सुंदर, हळुवार आणि तरल भावना घेऊन हे गीत आपल्या हृदयाचा ठाव घेतं. कैफी आजमी यांचे अर्थवाही शब्द, मदन मोहन यांचं कर्णमधुर आणि नादावणारं संगीत आणि लतादीदींचा स्वर्गीय आवाज यांचा त्रिवेणी संगम इथे आपल्याला अनुभवायला मिळतो.
अशाच प्रकारची विरहणीची उत्कट प्रेमाची भावना अनेक अभंग आणि भक्तिगीतांतून आपल्याला पाहायला मिळते. संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात असे अभंग किंवा विराण्या येतात. मीराबाईंचे अनेक अभंग असे आहेत. अवचिता परिमळु झुळकला अळुमाळू किंवा पैल तो गे काऊ कोकताहे... या सारख्या रचनांतून ज्ञानेश्वर माऊली प्रेम आणि भक्तीचा आदर्श आपल्यासमोर ठेवतात. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे तत्वज्ञान मराठीत आणले. पण ते कधीही कोरडे तत्वज्ञान सांगत नाहीत. त्यांचे तत्वज्ञान भक्तिरसाने आणि प्रेमरसाने ओथंबलेले आहे. आत्मरूपाचा साक्षात्कार झाल्याची अनुभूती त्यातून प्रकट होते.
' कहीं ये वो तो नहीं ' यासारखे भास इथेही होतात. पण इथे या गीतांमध्ये परमेश्वरप्राप्तीचा विषय असल्याने एका वेगळ्याच उंचीवर ही गीते आपल्याला घेऊन जातात. ' पैल तो गे काऊ कोकताहे..' या अभंगात कावळ्याचे ओरडणे हा शुभ शकुन असून तो त्याच्या येण्याचाच सांगावा घेऊन आला आहे, असे त्या विरहिणीला वाटते. इतकी त्याच्या दर्शनाची ओढ तिला लागली आहे. अशी उत्कट भक्ती केली तर ' तो ' येणे दूर नाही, अशक्य नाही असा शुभ शकूनच जणू माउली आपल्याला सांगतात. फक्त तो ' काऊ ' पैलतीरावर आहे. त्याच्यापर्यंत पोहोचायचे तर ' ऐलतीर ' सोडावं लागणार आहे असेच जणू माऊली सुचवतात.
' अवचिता परिमळु झुळकला अळुमाळू ' या विरहगीतात देखील ' कहीं ये वो तो नही .. ' सारखी भावना आपल्याला जाणवते. अवचित सुगंध येतो. तो सुगंध ' त्याच्या ' येण्याचाच सांगावा घेऊन येतो. ( मी म्हणे गोपाळु आला गे माये... )इथेही ती अंतर्बाह्य त्याच्या रंगात रंगलेली आहे. हा ' परिमळ ' सुगंधाचा राजा आहे. त्याने अंतर्बाह्य तिला लपेटून घेतले आहे. आत वेगळे आणि बाहेर वेगळे असे काही राहिलेच नाही. तिच्या दृष्टीपुढे केवळ तोच आहे.
तो सावळा सुंदरू , कासे पीतांबरू
लावण्ये मनोहरू देखियेला...
हे अद्वैत आहे, आत्मानंदाचा अनुभव आहे.
' कहीं ये वो तो नहीं ' मधील आणि या ज्ञानेश्वर माऊलींच्या विराण्यात आणखी एक साम्य मात्र आहे. लतादीदींचा स्वर्गीय आवाज या गीतांना लाभला आहे. तो आपल्याला एका वेगळ्या वातावरणात घेऊन जातो. आषाढी एकादशी जवळ आली आहे. विठ्ठलाच्या भक्तीत सारे तल्लीन झाले आहेत. अशा परिस्थतीत एखाद्या भक्ताला ' कहीं ये वो तो नहीं ...' सारखा भास झाला तर तो किती भाग्यवान ! अशी अनुभूती आपल्या सर्वांना येवो या कामनेसह लेखणीला विराम देतो.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२/७/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
..."
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा