मुख्य सामग्रीवर वगळा

अनोखे अंदमान - भाग १

 उगवतीचे रंग

अनोखे अंदमान - भाग १

अंदमान म्हणजे निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न !अंदमान म्हणजे निसर्गानं भरभरून दिलेलं दान ! अंदमान म्हणजे क्रांतिकारकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. असं हे अनोखं अंदमान कधी एकदा बघायला मिळतं असं झालं होतं. लहानपणापासून अंदमानबद्दल ऐकत आणि वाचत आलो होतो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांचे बंधू बाबाराव सावरकर आणि अन्य क्रांतिकारकांना अंदमानच्या भयानक काळ कोठडीमध्ये यातनांना तोंड देत काळ कंठावा लागला होता. अंदमानच्या भोवती सगळीकडे समुद्र. पाणीच पाणी चहूकडे ! अशा ठिकाणी ज्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे असे कैदी पळून पळून जाणार तरी कुठे ? शिवाय भोवती घनदाट जंगल, वन्य श्वापदांची भीती ! सुटकेचा कोणताही मार्ग नाही. मातृभूमीपासून हजारो कोस दूर. एकदा शिक्षा झाली आणि अंदमानच्या तुरुंगात रवानगी केली की जिवंत परत जाण्याची शक्यता जवळपास संपलेलीच. म्हणून तर कदाचित इथल्या शिक्षेला काळ्यापाण्याची शिक्षा असे म्हणत असावेत.

पण प्रत्यक्षात इथे खरोखरच काळे पाणी आहे का ? छे छे !अंदमान सारखे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारे, निळे अथांग पाणी, सुंदर आणि स्वच्छ आभाळ अन्य कुठे क्वचितच पाहायला मिळायचे ! इथला निसर्ग, हिरवीगार वनराई, खारफुटीची जंगले विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी या सगळ्या गोष्टींमुळे अंदमान खरोखरच अद्वितीय आणि अनोखे ठरते. 

आपल्या देशाबद्दल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची एक सुंदर कविता आहे. ' भारत जमीं का टुकडा नही, जीता जागता राष्ट्रपुरुष हैं. ' अंदमान बद्दल सुद्धा मला असेच म्हणावेसे वाटते. अंदमान केवळ जमिनीचा एक तुकडा नाही तर भारत वर्षाचे प्रतिनिधित्व करणारा एक जिवंत सळसळता भूभाग आहे. विविध जातीधर्माचे लोक इथे एकत्रितपणे सुखाने नांदत आहेत. इथे आपल्याला भारताच्या संमिश्र संस्कृतीचे दर्शन घडते. 

तसं प्रत्यक्षात भारताच्या भूमीपासून हजार बाराशे किलोमीटर दूर असलेलं हे ठिकाण भारताचा एक अविभाज्य भूभाग आहे. अंदमान आणि निकोबार बेटे हे केंद्रशासित प्रदेश आहेत. अंदमानला जाण्यासाठी केवळ दोनच पर्याय आपल्याला उपलब्ध असतात. पहिले म्हणजे विमानप्रवास किंवा सागरी मार्गाने जलप्रवास. अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर ही हवाई मार्गाने तसेच जलमार्गाने आपल्या देशाशी जोडली गेली आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आदी ठिकाणाहून आपण पोर्ट ब्लेअरला पोहोचू शकतो. जहाजाने पोर्ट ब्लेअरला पोहोचण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे तिथे जाण्यासाठी हवाई मार्गाने जाणे जास्त सोयीचे आहे. आपल्या वेळेनुसार आपण त्याचे नियोजन करू शकतो. आपल्या उपलब्ध वेळेप्रमाणे सहा किंवा सात दिवस त्यांचा अंदमान पाहण्यासाठी पुरेसे होतात.

मी लोकसत्ता दैनिकात अंदमान यात्रेची जाहिरात पाहिली पुणे येथील श्री आनंद दवे हे अंदमानला सहल घेऊन जाणार होते. त्यांच्यासोबत आम्ही जाण्याचे ठरवले मी माझी पत्नी सौ श्रद्धा, माझे व्याही श्री आणि सौ दिंडोकार, सौ श्रद्धाची मोठी बहीण श्रीमती जयाताई मैराळ अशा पाच जणांची नाव नोंदणी आम्ही श्री आनंद दवे यांच्याकडे केली. आमच्या सोबत या सहलीमध्ये श्री आनंद दवे यांच्यासह एकूण २९ जणांचा सहभाग होता. 

२० फेब्रुवारी २०२५ रोजी आम्ही पुणे येथून आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आमचा प्रवास रात्रीचाच होता. विमान प्रवास दोन टप्प्यात होता आधी आम्ही चेन्नईला पोहोचणार होतो आणि तिथून दुसऱ्या विमानाने पोर्ट ब्लेअरला. चेन्नई विमानतळावर उतरल्यानंतर आम्हाला काही तास पुढील विमानाची वाट पहावी लागली आणि चेन्नई येथून पहाटे पुढील विमानाने आम्ही पोट ब्लेअरला रवाना झालो. 

पोर्ट ब्लेअरला पोहोचेपर्यंत छान उजाडले होते. समुद्रावरून आमचे विमान जात होते. खिडकीतून खाली पाहिल्यानंतर अंदमान बेटांची लांब रांग दिसत होती. सकाळी बरोबर साडेसात वाजता आमचे विमान अंदमानच्या पवित्र भूमीवर उतरले. अंदमानचे विमानतळ छोटे परंतु सुंदर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हवाई अड्डा असे या विमानतळाचे नाव आहे आम्ही आमचे सामान घेऊन बाहेर पडलो तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भव्य पुतळा नजरेस पडला. या भूमीवर त्यांच्या झालेल्या या प्रथमदर्शनाने मनाला धन्य वाटले. त्यांना वंदन केले. आम्हाला घेण्यासाठी तेथील प्रेम या नावाचा नियोजित प्रतिनिधी विमानतळावर हजर होता. त्याच्याबरोबर आम्ही हॉटेल ब्ल्यू सी मध्ये पोहोचलो.

आमची बाकीची मंडळी अजून यायची होती. त्यांचे विमान हैदराबादहून येणार होते. ते सकाळी साडेनऊ वाजता पोहोचणार होते. तोपर्यंत आम्ही फ्रेश होऊन चहा नाश्ता घेतला आणि विश्रांती घेतली. दुपारच्या जेवणानंतर तीन वाजता आम्ही अंदमान येथील सेल्युलर जेल ला भेट देण्यासाठी निघालो. ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२/४/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...