उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ४८कर्मयोगी रवींद्रनाथ
कॅलिडोस्कोप किंवा शोभादर्शक यंत्र आपण सर्वांनी पाहिले असेल किंवा हाताळले असेल. ते आपण जसजसे फिरवू, तसतश्या वेगवेगळ्या नयनरम्य मनोहर आकृत्या दिसायला लागतात. प्रत्येक वेळी वेगळी आकृती ! गुरुदेव रवींद्रनाथांचे व्यक्तिमत्व देखील मला असेच कॅलिडोस्कोपसारखे वाटते. प्रत्येक वेळी वेगळे दिसते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आपण शोध घेऊ तेवढा कमी. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या आकाशात दिसणाऱ्या सगळ्या रंगछटा कागदावर प्रकट करणे थोडेच शक्य असते ! तसाच हा ' रवी ' ! त्याची किरणे इतकी विविध रंगांची आणि मनोहारी की शब्दात पकडणे अवघडच !
तुकाराम महाराजांच्या शब्दात त्यांच्याबद्दल बोलायचे तर ' बोले तैसा चाले 'असे हे व्यक्तिमत्व होते. समाजात सुधारणा घडवून आणण्याची इच्छा असणारा, शिक्षणात क्रांतिकारक बदल घडवून आणणारा, ग्रामविकासाचे विविध प्रकल्प हाती घेणारा, शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सदोदित प्रयत्नशील असणारा, साहित्यक्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारा, संगीत क्षेत्रातील जुन्या नव्या परंपरांची सांगड घालणारा, चित्रकलेतील प्रयोग करून स्वतःची नवीन शैली निर्माण करणारा हा अवलिया होता. केवळ पुस्तकी पांडित्य त्यांच्या जवळ नव्हते. किंबहुना पुस्तकी पांडित्याचा त्यांना तिटकाराच होता. त्यामुळे कोणतीही गोष्ट त्यांनी केवळ सांगितली नाही किंवा तिचा व्यासपीठावरून उपदेश केला नाही. ' आधी केले मग सांगितले ' असा हा कर्मयोगी. या लेखापासून त्यांचा उल्लेख ' गुरुदेव ' म्हणूनच आपण करूया.
गुरुदेवांचा काळ अनेक अंधश्रद्धा आणि जाचक रुढी परंपरा यांनी प्रभावित झालेला होता. अशा या काळात आपल्या मुलाचा रथिंद्राचा विवाह त्यांनी एका विधवा मुलीशी केला. त्यांनी ठरवले असते तर अनेक चांगल्या मुली त्यांच्या मुलासाठी चालून आल्या असत्या परंतु गुरुदेव केवळ इतरांना फुकाचा उपदेश करणाऱ्यातले नव्हते. त्यांनी स्वतःच एका विधवेशी आपल्या मुलाचा पुनर्विवाह करून समाजापुढे आदर्श घालून दिला. या मुलीचे नाव प्रतिमा. १९१० मध्ये ही प्रतिमा गुरुदेवांची सून म्हणून आली. त्यावेळी ती अगदी लहान होती परंतु शांतीनिकेतनशी आणि गुरुदेवांच्या कार्याशी ती एकरूप झाली. दुर्दैवाने तिला अपत्य होऊ शकले नाही परंतु शांतिनिकेतनमधील मुलांची ती आई झाली. गुरुदेवांवर सुद्धा तिने आईचीच माया केली. गुरुदेवांच्या पत्नी मृणालिनीदेवी वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षीच त्यांना सोडून गेल्या. त्यावेळी मुले लहान होती. आणि गुरुदेवांचा संसार उघड्यावर पडला होता. हा संसार सांभाळण्याचे महान कार्य या प्रतिमादेवीने केले.
शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन या गुरुदेवांनी स्थापन केलेल्या दोन महत्त्वाच्या संस्था. शांतिनिकेतनमध्ये बालविकासाचे कार्य चाले तर श्रीनिकेतनमध्ये ग्रामविकासाचे कार्य चाले. प्राचीन काळातील ऋषींनी नुसती वेदपुराणे लिहिली नाहीत तर शेती देखील केली. त्यांचे हात मातीत मळले. मातीत त्यांनी घाम गाळला. त्यांचे जीवन म्हणजे उक्ती आणि कृती यांचा सुरेख संगम होता. त्याच ऋषीकुलांचा वारसा सांगणाऱ्या परंपरेतील आधुनिक ऋषी म्हणजेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर.
तसे पाहिले तर गुरुदेवांचे घराणे हे जमीनदार घराणे होते परंतु सामान्य शेतकऱ्यांबद्दल त्यांना जिव्हाळा होता. त्यांच्या सुखदुःखाशी ते एकरूप झाले होते म्हणूनच स्वतः शेतीत राबण्यासाठी, त्यात घाम गाळण्यासाठी ते पुढे सरसावले. त्यात त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. त्यांनी नुसतीच शेती केली असे नाही तर ते त्यातील उत्तम जाणकारही होते आणि आपल्या कृषीविषयक प्रयोगातून त्यांनी अनेक चांगले निष्कर्ष आपल्या विद्यार्थ्यांपुढे आणि शेतकऱ्यांपुढे ठेवले.
जमीन किंवा शेती ही आपली आई आहे. तिला आपण जेवढे देऊ त्यापेक्षा अनेक पटींनी ती आपल्याला ते परत देते. त्यामुळे या काळया आईची हात राबवून मशागत कशी करावी याचे त्यांना उत्तम ज्ञान होते. ते केवळ धरतीची गाणी गाणारे भाट नव्हते. दौत आणि औत या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालल्या पाहिजेत या मताचे ते होते परंतु दुर्दैवाने इंग्रजी सत्ता आल्यानंतर इंग्रजांनी दौत आणि औत वेगळे केले. शेतकऱ्याचा आणि शिक्षणाचा संबंध तोडला. शहरात इंग्रजी शिक्षण घेणारी मुले शेतात राबायला किंवा कष्ट करायला कमीपणा मानू लागली. शहरी संस्कृती आणि ग्रामीण संस्कृती यात अंतर पडत गेले आपल्या समाजाचा किंवा देशाचा विकास करायचा असेल तर आधी खेड्यांचा विकास झाला पाहिजे हे तत्व गांधीजींनी प्रतिपादन करण्याच्या आधी अनेक वर्षे गुरुदेवांनी सांगितले होते.
गुरुदेवांनी ठरवले असते तर आपल्या मुलाला तत्कालीन श्रीमंतांप्रमाणे इंग्लंडमध्ये बॅरिस्टर होण्यासाठी पाठवले असते. परंतु त्याने कृषीविषयक शिक्षण घेऊन ग्रामीण भागात काम करावे आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्य करावे असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी त्याला कृषीविषयक आधुनिक शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला पाठवले. शेतीचे नवनवीन प्रयोग अमेरिकेमध्ये होत होते. शेतकऱ्यांनी शेतीचे उत्पादन वाढवले पाहिजे. त्यासाठी रसायनशास्त्राचे ज्ञान त्यांनी करून घ्यायला हवे असे त्यांना वाटत होते. नवी बीजे पेरा, नवीन अवजारे वापरा, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा असा नव्या युगाचा मंत्र या दार्शनिकाने शेतकऱ्यांना दिला.
परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालणारा हा आधुनिक ऋषी होता. भूतकाळाला वर्तमानकाळाशी जोडणारा एक अनोखा दुवा होता. समाजाच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहणारा हा कर्मयोगी होता. त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात पदार्थविज्ञानशास्त्रावर ग्रंथरचना केली. बुद्धीच्या विकासासाठी विज्ञान विचार करणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. विश्वभारतीतल्या प्रमथनाथ सेनगुप्त या फिजिक्सच्या प्राध्यापकांना बरोबर घेऊन विश्वपरिचय नावाचा आधुनिक विज्ञान कोश त्यांनी तयार केला. आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात हातात जपमाळ घेऊन न बसता अखंडपणे कार्यरत राहणारा हा कर्मयोगी होता.
' मऊ मेणाहुन आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे ' ही उक्ती सार्थ करणारे हे व्यक्तिमत्व होते. मातीत रमणारी ही बोटे काव्यलेखन आणि गायन वादनातही रमायची. घरामध्ये पाहुणे असतील तर गृहिणीला स्वयंपाकातही मदत करायची. अशा या नाजूक आणि कलाप्रेमी बोटांसोबतच कुस्तीचे डावपेच लढू शकणारे बलदंड बाहू देखील त्यांना लाभले होते. गुरुदेवांचे शरीर एखाद्या पंजाबी शेतकऱ्याप्रमाणे धडधाकट होते. त्यांना मल्लविद्या शिकण्यासाठी त्यांच्या वडिलांनी एक पहिलवान सुद्धा ठेवला होता. इथे भगवान कृष्णाची आठवण येते. कृष्णाची नाजूक बोटे बासरीचे मधुर स्वर देखील छेडत असत आणि अनेक राक्षसांना आणि मल्लांना अस्मान दाखवणारे त्याचे बळकट बाहू देखील होते.
प्रख्यात वनस्पती शास्त्रज्ञ डॉ जगदीशचंद्र बोस हे गुरुदेवांचे घनिष्ठ मित्र होते. पद्मा नदीत पद्मा नावाच्या आपल्या आवडत्या बोटीत बसून गुरुदेवांनी आपल्या आयुष्याची काही वर्षे काढली. या काळात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कष्टकऱ्यांच्या सुखदुःखांशी ते एकरूप झाले आणि याच काळात त्यांची साहित्य निर्मिती देखील झाली. या काळात शनिवार रविवारी डॉ जगदीशचंद्र बोस त्यांच्याकडे बोटीवर मुक्कामी असत. गुरुदेवांची नवीन कथा, कविता किंवा नाटक यांचे ते प्रथम वाचक किंवा श्रोते असत. दोघेही एका दृष्टीने संशोधक होते एक वनस्पतींचे रहस्य शोधणारा आणि दुसरा मानवी जीवनाचेच गूढ उकलण्याचा प्रयत्न करणारा.
विद्यार्थ्यांना मातृभाषेतच शिक्षण दिले पाहिजे. इंग्रजीतले ज्ञानभांडार, तत्त्वज्ञान, विचारधन मातृभाषेत विद्यार्थ्यांसाठी खुले केले पाहिजे असे त्यांचे मत होते. परंतु ते केवळ बोलणाऱ्यातले नव्हते. उत्तम इंग्रजी जाणत असताना सुद्धा व्यासपीठावरून ते बंगाली भाषेतच श्रोत्यांशी संवाद साधत. कलकत्ता विद्यापीठामध्ये पदवीदान समारंभात बंगालीतून भाषण करणारे गुरुदेव हे पहिले भारतीय विचारवंत होते. त्यावरून त्यांची तथाकथित इंग्रजाळलेल्या शिक्षित लोकांनी कुचेष्टा केली. परंतु गुरुदेवांना त्याची पर्वा नव्हती. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते गुरुदेवांचे !
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३/३/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा