मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 46

 उगवतीचे रंग

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 46

सहजपाठ : रवींद्रनाथांची अनमोल देणगी (१)

रवींद्रनाथांच्या स्वतःच्या शिक्षण विषयक काही कल्पना होत्या. मुलांना औपचारिक पारंपारिक शिक्षण देण्यापेक्षा नैसर्गिकरित्या ते कसे शिकतील यावर त्यांचा भर होता. त्या दृष्टीनेच त्यांनी शांतिनिकेतन मधील मुलांना शिकवले. रटाळ घोकंपट्टी त्यांना कधीच मान्य नव्हती. तर भोवतालचे वातावरण, निसर्ग यांचे निरीक्षण करता करता मुलांनी त्यातून सहज शिकावे असे त्यांना वाटत होते. त्यातूनच त्यांचे सहजपाठ निर्माण झाले. रवींद्रनाथ केवळ व्यासपीठावरून भाषण देणारे किंवा वृत्तपत्रात मोठ-मोठे शिक्षण विषयक लेख लिहिणारे शिक्षणतज्ज्ञ कधीच नव्हते. कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून आणि मुळापासून करणारे ते प्रायोगिक शिक्षणतज्ज्ञ होते. म्हणून केवळ शिक्षणसंस्था काढून ते शांत बसले नाहीत तर विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अतिशय सुंदर पाठ्यपुस्तके तयार केली. ही पाठ्यपुस्तके म्हणजेच सहजपाठ आणि हे सहज पाठ म्हणजे त्यांनी बंगालला दिलेली सर्वात मोठी देणगी असे म्हणावे लागेल ! मुळात ' सहजपाठ ' हे नावच किती सुंदर आहे ! सहजपाठ होणारे ते सहज पाठ !

पु ल देशपांडे आपल्या ' वंगचित्रे ' या पुस्तकात त्याबद्दल लिहिताना म्हणतात, " रवींद्रनाथांनी हजारो कविता लिहिल्या, नाटके लिहिली, कादंबऱ्या, प्रवासवर्णने' पत्रे, निबंध- खूप काही लिहिले; पण रवींद्रनाथ टागोर या माणसापुढे मी जर मनोमन लोटांगण घातले असेल तर प्राथमिक शाळेची ही पाठ्यपुस्तके रचल्याबद्दल ! ' वृद्धत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे ' असे केशवसुतांनी म्हटले आहे. पण शैशवाचे स्मरण म्हणजे काय ते टागोरांचे हे सहजपाठ वाचल्यावर कळते. ही पाठ्यपुस्तके म्हणजे रस, रंग, गंध, नाद यांच्या सृष्टीतील आनंददायक सहल आहे. बंगाल्यांच्या गेल्या चार पिढ्या ह्या पाठ्यपुस्तकातून शिकत आहेत. आज देखील सरकार कुठल्याही पक्षाचे असो, पाठ्यपुस्तके गुरुदेवांचीच ! 

रवींद्रनाथ लहानपणी शाळेत जे शिकले होते ते शिक्षण त्यांना नीरस आणि कंटाळवाणे वाटत होते. आपल्याकडील काय किंवा बंगालमधील काय पाठ्यपुस्तके सदैव उपदेशाचा डोस पाजणारी होती. खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करू नये, आळशीपणा करू नये यासारख्या उपदेशात्मक गोष्टी सतत सांगणारी आणि हे करू नको, ते करू नको अशा नकारात्मक गोष्टी सांगणारी पाठ्यपुस्तके अस्तित्वात होती. मुलांच्या बालविश्वाशी अत्यंत विसंगत अशा प्रकारची ही गोष्ट होती.

 ढग, पाऊस, फुलपाखरे, नदी, चांदण्या, पाखरे यासारख्या निसर्गाच्या घटकांमध्ये काही सौंदर्य असते आणि त्यातूनही आपली मुले सहजपणे शिकू शकतात याचा गंध ना शाळाखात्याला होता ना शिक्षणतज्ज्ञांना ! खेळ म्हणजे मुलांच्या आवडीची गोष्ट ! दैनंदिन नित्य खेळातून सुद्धा मुले सहजपणे शिकू शकतात याची  जाणीव शिक्षणखात्याला कधी झालीच नाही. पण या सगळ्या गोष्टींची दखल रवींद्रनाथांनी घेतली. त्यांच्या या पाठ्यपुस्तकांमुळे प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती झाली. खऱ्या अर्थाने ते ' गुरुदेव ' या उपाधीला पात्र होते. 

थोरांची चरित्रे, राष्ट्रप्रेम, सदाचार यासारख्या लहान मुलांच्या वयाला न पेलणाऱ्या गोष्टी त्यांनी आपल्या पाठ्यपुस्तकात ठेवल्याच नाहीत. या गोष्टींना त्यांचा विरोध होता अशातला भाग नव्हता. परंतु मुलांना सहजपणे कसे शिकता येईल, त्यांचे शिक्षण आनंददायी कसे होईल यावर त्यांचा भर होता. त्यांनी मुलांचे बालसृष्टीतील मित्र होऊन, त्यांच्या पातळीवर जाऊन या पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली. या पाठ्यपुस्तकातील एक एक धडा म्हणजे सुंदर शब्दचित्रच आहे ! सभोवतालच्या जगाचे निरीक्षण करता करता मुले सहजपणे यातून शिकत जातात आणि आपण काही शिकतो आहोत याची जाणीव न होता सहज शिकत जातात हे या पाठ्यपुस्तकांचे वैशिष्ट्य आहे. यातील पाठ गाता येतात, पाहता येतात, ऐकता येतात आणि अनुभवता येतात.

शांतिनिकेतनमध्ये त्यावेळी प्रख्यात चित्रकार नंदलाल बोस विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवत. त्यांच्या सुंदर चित्रांनी ही पुस्तके नटलेली आहेत. रवींद्रनाथांचे शब्द आणि नंदलाल बोस यांची बोलकी चित्रे यांचा सुरेख संगम या पाठ्यपुस्तकांमध्ये झाला आहे. 

पु ल देशपांडे यांनी शांतिनिकेतनमध्ये काही काळ वास्तव्य केले होते. या पुस्तकांबद्दल बोलताना ते म्हणतात, "माझ्या शांतीनिकेतन मधल्या वास्तव्यात या सहजपाठांनी माझे हरवलेले बालपण मला परत आणून दिले. ज्याला म्हणून बंगाली शिकायचे असेल त्याने सहजपाठाचे हे चार भाग पुन्हा पुन्हा वाचावेत. बंगाली भाषेच्या अंगाखांद्यावर खेळल्यासारखे वाटेल. सहजपाठ म्हणजे गुरुदेवांचे बंगालवर असलेले महान उपकार ! "

बंगालमधील खेड्यात राहणारी मुले मुली डोळ्यासमोर ठेवूनच रवींद्रनाथांनी हे सहजपाठ लिहिले. सकाळचे वर्णन ते किती सुंदर करतात ते पहा 

आलो हॉय - गॅलॉ भोय, चारी दिक झिक मिक -
( उजेड होतो, भय जाते, चारी बाजूला झुंजूमुंजू होते )

हे सगळे मुले गात गात आनंदाने म्हणू शकतात. सकाळ झाल्यानंतर गावातील माणसे कशी कामाला लागली याचेही चित्र सोप्या शब्दातून ते मुलांसमोर उभं करतात 

पाडे पेरू हरी हर
मधू राय बांधे घर
होडी हाके पातू पाल 
धान्य आणे जयलाल 
धरे सुकाणू दीनानाथ 
अविनाश रांधे भात. 

आपल्याकडे शाळेतील मुलांना कविता पाठ केल्या की परीक्षेला मार्क मिळतात एवढेच ठाऊक. परंतु त्यातून मिळणाऱ्या आनंदाला ही मुले पारखी होतात. कविता या चालीवर सुंदर गाता येतात, त्या म्हणताना नाचता येते त्या गात गात भाषा शिकता येते, याची जाणीवच आमच्याकडे करून दिली गेली नाही. बंगालमधील मुले खरोखरच भाग्यवान म्हणावी लागतील कारण रवींद्रनाथांनी त्यांना शेकडो सुंदर गाणी रचून दिली. त्या गीतांना सुंदर चाली लावल्या गेल्या. बंगाली माणसाचे बालपण या गीतांनीच समृद्ध झाले.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
१७/२/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...