मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45

श्रीनिकेतनची स्थापना 

या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू करण्याचे ठरवले. त्याला त्यांनी श्री निकेतन असे सुंदर नाव दिले. श्री म्हणजे विकास किंवा कल्याण. श्री निकेतन म्हणजेच लक्ष्मीचे वस्तीस्थान ! आतापर्यंत अठरा विश्वे दारिद्र्य असणाऱ्या ग्रामीण भागात या माध्यमातून लक्ष्मीच्या पावलांचा प्रवेश होईल अशी त्यांची कल्पना होती. 

रवींद्रनाथांच्या युरोप दौऱ्यामध्ये त्यांना जो लिओनार्डो एल्म हर्स्ट या नावाचा तरुण भेटला होता, त्याची या श्रीनिकतनच्या कामात त्यांना मोलाची मदत झाली. एल्म हर्स्ट बद्दल मागील एका भागात मी आपल्याला सांगितले आहे त्याची आणि रवींद्रनाथांची भेट १९२० मध्ये न्यूयॉर्क येथे झाली. एल्म हर्स्ट हा कृषीअर्थशास्त्राचे शिक्षण घेणारा एक अत्यंत हुशार विद्यार्थी होता.  रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाने तो भारावला होता. त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहातील कविता त्याने वाचल्या होत्या. रवींद्रनाथांनाही हा उत्साही तरुण अतिशय आवडला आणि पहिल्याच भेटीत त्यांनी त्याला भारतात येण्याबद्दल निमंत्रण दिले होते. रवींद्रनाथांच्या मनात श्रीनिकेतन या संस्थेचा विकास करण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या भौतिक प्रगतीसाठी एल्म हर्स्टला बोलवण्याचा विचार होता. एल्म हर्स्ट हा खरोखरीच ध्येयवादी तरुण होता. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या शब्दाला जागून त्याने रवींद्रनाथांना एक तार केली आणि माझे शिक्षण पूर्ण झाले आहे मी आता भारतात येऊ का असे विचारले ? यावेळी रवींद्रनाथांना आर्थिक चणचण मोठ्या प्रमाणात भासत होती. आपल्या संस्थेचे कार्य पुढे चालवण्यासाठी पैशाची तरतूद कशी करावी याची विवंचना त्यांना होती. आणि अशा वेळी युरोपातून कोणी शिकवण्यासाठी येणार असेल तर त्या व्यक्तीला पगार तरी कसा द्यावा हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यामुळे रवींद्रनाथांनी एल्म हर्स्टला उलट तार पाठवली की आता पैसे नाहीत तेव्हा येऊ नकोस. हा प्रसंग फार बोलका आहे. या प्रसंगातून रवींद्रनाथ आणि एल्म हर्स्ट या दोघांचेही आरपार प्रामाणिक असलेले व्यक्तिमत्व आपल्याला स्पष्ट दिसते. 

पैसे नाहीत हे कारण एल्म हर्स्टला भारतात येण्यापासून रोखू शकले नाही. आपल्या पदरचे पैसे खर्च करून तो भारतात रवींद्रनाथांच्या मदतीसाठी धावून आला. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आपल्याजवळ पुरेसा पैसा नाही या गोष्टीचे रवींद्रनाथांना जराही वाईट वाटत नसे. त्याचे कारण हे होते की त्यांना हे माहिती होते की आपल्या कामाची किंमत गुणवत्तेवरून केली जाईल, संख्येवरून नाही. ग्रामीण भागातील समस्या जाणून घेऊन त्यावर प्रयोगाने अभ्यासाने अत्यंत काळजीपूर्वक उपाय शोधले पाहिजेत आणि मग ती योजना कार्यान्वित केली पाहिजे असे त्यांना वाटत होते. कार्याची ही ज्योत सदैव प्रज्वलित रहावे असे त्यांना वाटत होते. 

आपल्या घरातील पिढीजात अशा जमीनदारी आणि सावकारीच्या व्यवसायाच्या निमित्ताने रवींद्रनाथांचा लहानपणापासून ग्रामीण भागातील लोकांशी जवळचा संबंध आला होता. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांची उत्तम जाण होती.  ६ फेब्रुवारी १९२२ रोजी श्री निकेतनची स्थापना झाली. त्यांनी श्री निकेतनच्या उद्घाटन प्रसंगी केलेले भाषण त्याची साक्ष देते. ते म्हणतात, " खेडी जर समृद्ध व्हायची असतील तर त्यासाठी बाहेरील लोकांनी केलेली मदत फारशी उपयोगाची नाही. खेड्यातील लोकांनी स्वतःच आपल्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे असे त्यांना वाटत होते. बाहेरून पाणी आणण्यापेक्षा वाळवंटात जर एखादा झरा निर्माण झाला तर तो सतत पुरवठा करतो. असा झरा कधीच वाटत नाही असे त्यांचे म्हणणे होते.

" ग्रामीण समस्येच्या निवारणाकरता समोर ठेवलेला दृष्टिकोन हा एकसंघ असावा. तो विस्कळीत असू नये. ग्रामीण जीवनातल्या सर्व महत्त्वाच्या समस्या एकत्रितरीत्या सोडवता आल्या पाहिजेत. परंतु हे करीत असताना माणसाच्या सर्वांगीण प्रयत्नांना आवाहन केले पाहिजे. ग्रामसेवकाने केवळ बुद्धी, हात व तांत्रिक ज्ञान यांचाच वापर करू नये, तर त्याला त्याच्या कार्यात भावनिक आत्मीयताही वाटली पाहिजे. आरोग्य, बुद्धी, ज्ञान, काम आणि आनंदाची भावना एक दुसऱ्यात मिसळून जातील तेव्हाच मानवाचे कल्याण खऱ्या अर्थाने पूर्णत्वास पोहोचेल."

एल्म हर्स्टला आपले काम करण्यासाठी रवींद्रनाथांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि आपली कोणतीही मते त्याच्यावर लादली नाहीत. यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो. एल्म हर्स्टने देखील त्यांच्या तत्वांना अनुसरून
ग्रामीण भागातील पुनर्रचनेचे आपले कार्य धडाडीने सुरू ठेवले. या वाटचालीत ग्रामीण विकासाचा एक परिणामकारक असा कार्यक्रम लोकांसमोर आला. स्वतः रवींद्रनाथ आणि एल्म हर्स्ट यांच्यासोबत संतोष चंद्र मुजुमदार, गौरगोपाल घोष, कालीमोहन घोष, किम तारो कासहारा यांचेही या वाटचालीत योगदान होते. ही योजना इतकी सुंदर आणि प्रभावी ठरली की नियोजन आयोगाने सुद्धा त्यातील बऱ्याचश्या गोष्टी ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपल्या कार्यपद्धतीत समाविष्ट केल्या.

श्री निकेतन हे केवळ शैक्षणिक केंद्र नव्हते तर स्थानिक कला आणि हस्तकलांना उत्तेजन देणारे एक मोठे सांस्कृतिक केंद्र होते. पारंपारिक हस्तकलांच्या विकासासाठी श्री निकेतनचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर या ठिकाणी शेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि कुटीर उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. अशा तऱ्हेने विश्वभारती विद्यापीठाचा एक भाग असलेले हे श्री निकेतन ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत होते. केवळ शाळा किंवा विद्यापीठ स्थापन न करता ग्रामीण भागातील लोकांचाही विकास व्हावा, शेतीमध्ये शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रांचा वापर करावा, त्यांच्यामध्ये साक्षरता यावी, नवनवीन तंत्रांची आणि वैज्ञानिक शोधांची त्यांना माहिती व्हावी, स्वच्छतेचे महत्व पटावे, आजारांशी योग्य उपचाराने सामना करता यावा यासारखे अनेक उद्देश या माध्यमातून साध्य झाले. यातून रवींद्रनाथांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
१६/२/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...